महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे, पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय झरे. या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे विरळी ता.माण या ठिकाणी दिनांक २३ फेब्रुवारी ते ०१ मार्च २०२३ या कालावधीत संपन्न होत असून या शिबिराच्या पाचव्या दिवशी विचारपुष्प गुंपण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्वप्नील चोपडे, (संचालक, महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली) हे उपस्थित होते.
माणसाचे आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक सुदृढता नसून आरोग्याची व्याख्या म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक व आध्यात्मिक या सर्व प्रकारचे स्वास्थ्य म्हणजेच ‘आरोग्य’ होय. तसेच माणसाने पहाटे चार वाजता उठून आपल्या दिनचर्येस सुरुवात करावी. कारण सकाळी ०३:४० ला ब्रह्ममूहूर्त असतो.
सूर्यास्तानंतर १४ मुहूर्त असतात. त्यातील १४ वा मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त. एक मुहूर्त हा १ तास ३६ मिनिटांचा असतो. त्याच पद्धतीने चांगले आरोग्य म्हणजे व्यक्तीच्या स्नायू मध्ये ताकद असायला हवी, शरीराला लवचिकता हवी, तसेच चिवटपणा ही माणसांमध्ये असावा ही चांगल्या आरोग्याची लक्षणे आहेत.
सायकल चालवणे, डोंगरावर चढणे, डोंगरावरून उतरणे हे हृदयाचे व्यायाम आहेत. हे व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका बऱ्याच अंशी टळू शकतो. आरोग्याला सर्वात घातक म्हणजे मोबाईलचे व्यसन आहे. ते कमी केल्यास नक्कीच चांगले आरोग्य मिळण्यास मदत होईल. परंपरा ह्या महत्त्वाच्या आहेत त्या पाळल्या पाहिजेत पण योग्य त्या ठिकाणी, त्यामध्ये लवचिकता आणायला हवी असेही ते म्हणाले. त्यानंतर अध्यक्ष म्हणून उपस्थित असणारे संस्थेचे संचालक, श्री.ए.एस.पडळकर म्हणाले की, मानसिक स्वास्थ्य बिघडले की घरात, गावात, समाजात शांती राहत नाही.
त्याचबरोबर आई-वडील, गुरुजन यांचे संस्कार लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि माणसाला जशा चांगल्या आरोग्याची, विचारांची आवश्यकता आहे त्याच पद्धतीने चांगली संगती ही तितकीच महत्त्वाची असते. लिंबाच्या झाडाजवळ चंदनाचे झाड असेल, तर लिंबाच्या झाडालाही त्या चंदनाच्या झाडाचे काही अंशी गुण दिसून येतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही.ए. खिलारी यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य, आर.एच. पाटील यांनी केले. आभार प्रा.डी.एस. देवकुळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विरळी गावच्या लोकनियुक्त सरपंच नीलमताई घुटुकडे, रामहरी घुटुकडे, शिवाजी नलवडे तसेच प्रा.एन.डी. पाटील प्रा.एस.डी. मुलाणी, प्रा.एम.एस. शिंगाडे, विरळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.