कापसाची मारामार, व्यापारी दारोदार..! बाजारपेठ ओस
त-हाडी : सध्या पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ ओस पडली आहे. यंदा कमी पावसामुळे मुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे यंदा उत्पादन कमी झाले. त्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. खरेदी केंद्रावर कापसाची आवक थंडावली आहे.
सुरुवातील निसर्गाने साथ दिल्याने कापसासह अन्य खरीप पिकांची चांगली वाढ झाली, पण नंतर संततधार व अतिवृष्टीच्या पावसामुळे ‘फुलपगड्या’ संपूर्ण गळाल्या, मात्र नवीन पालवी फुटलीच नाही. त्यामुळे कापूस उत्पन्न कमी झाले. मागील वर्षाच्या तुलनेत एका बॅगमागे दीड ते दोन क्विंटल उत्पन्न घटले आहे. कापसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या घरामध्ये असलेल्या कापसाच्या थप्या पडून आहे. मात्र, दर कमी मिळत असल्याने कापूस घरात आणि व्यापारी दारात अशी गत झाली आहे.
काटा बंद पडण्याची शक्यता…
सध्या कापसाला साडेसहा ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत असून शेतकऱ्यांची मनःस्थिती दहा ते बारा हजार भाव मिळाल्यास विकण्याची झालेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवकच नाही. व्यापारीही आता गावागावांत जाऊन कापसाचा शोध घेत असून, शेतकरीही प्रतिसाद देत नसल्याने या व्यापायांचा काटा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
व्यापारी गावोगावी…
दसऱ्यापासून फुलणारी पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ अडीच ते तीन महिने होऊनही थंडावली आहे. आतापर्यंत फक्त दहा ते बारा टक्के कापूस विक्रीस आलेला असल्याचे कापूस खरेदी केंद्रावरील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा असल्याने खरेदीलाही प्रतिसाद नाही. व्यापारी कापसाकरिता गावोगावी जात असून, त्यांनाही शेतकरी कापूस देत नसल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागत असल्याचे चित्र आहे.
दर वाढत नसल्याने चिंता….
आंतरराष्ट्रीय बाजारात इतर देशांच्या तुलनेत भारतीय कापसाची किंमत उंच असून दहा ते बारा हजार रुपये बेल्स (गठान) मिळत आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळत नाही.
आजघडीला सेंटचा दर ७९ ते ८५ दरम्यान दोलायमान असल्याने निर्यातदारांनाही अचूक अंदाज येत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले असून कापूस बाजारपेठ विश्लेषकही संभ्रमात असल्याचे सांगितले आहे. भाववाढ होत नसल्याने कापूस विकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.
१५ ते २० क्विंटल संकलन…..
सद्य:स्थितीत शिरपूर तालुक्यात कापूस संकलन केंद्रांवर दररोज १५ ते २० क्विटल कापूस जमा होत आहे. शिरपूर तालुक्यातील कापूस प्रामुख्याने गुजरात व मध्य प्रदेशमध्ये विक्रीस जात असतो, मात्र सध्या गुजरातमधील कापूस मागणी मंदावली असल्याचे समजते आहे. शिरपूर तालुक्यात जवळपास ०८ ते १० कापूस खरेदी केंद्रे /संकलन केंद्रे आहेत. येथील उत्पादन मुख्यतः विक्रीसाठी गुजरात व मध्य प्रदेशमध्ये पाठवले जाते. मात्र सध्या गुजरातमधील कापूस मागणी असण्याचे सांगण्यात येत आहे.