लाल मिरचीचा ठसका सर्वसामान्यांना बसणार महागाईचा फटका – चटका
त-हाडी:- गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वसामान्याच्या घरामध्ये रोजच्या जेवणात लाल मिरची आढळून येते. जेवणामध्ये कुठलाही तिखट पदार्थ बनवायचा असेल तर लाल मिरची ची गरज लागतेच. मिरची शिवाय तिखट पदार्थ बनवणे अशक्यच आहे. त्यामुळे लाल मिरची प्रत्येक स्वयंपाक घरातील एक अविभाज्य घटक आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच गृहिणी साठवणीचे पदार्थ तयार करण्यासाठी लगबग करताना दिसून येत आहेत. या साठवणीच्या पदार्थांमध्ये लाल मिरचीची पावडर हा एक महत्त्वाचा तिखट पदार्थ असतो.
जिल्ह्यात सर्वत्र लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट आणखीन कोलमडणार आहे. आधीच मागच्या हप्त्यामध्ये पन्नास रुपयाने गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्य गृहिणी कडून संताप व्यक्त केला जात आहे. महागाईच्या दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्यांना चटके सोसावे लागत आहेत. त्यातच लाल मिरचीचे दर वाढल्याने गृहिणी मधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील काही महिन्यापासून वातावरणाचा सततच्या बदलामुळे रब्बीसह इतर पिकावर ही वातावरणाचा परिणाम झालेला आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसलेला आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या लाल मिरचीचे प्रमाण कमी असल्याने मिरचीचे दर वाढल्याचे बोलले जात आहे. या महिन्यात मिरचीच्या दरात क्विंटल मागे तीन ते चार हजार रुपयाची वाढ झाल्यामुळे एक किलो मागे तीस ते पन्नास रुपये वाढले असल्याचे सांगितले जात आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्याचे जगणे मुश्किल झाल्याचे दिसून येत आहे.
चौकट:- आधीच मागच्या हप्त्यामध्ये गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे आणि आता लाल मिरची दर वाढत आहेत. त्यामुळे घर चालवणे मुश्किल होत चालले आहे.
सुनंदाबाई पाटील
गृहिणी त-हाडी
चौकट:- वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले जात आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई ही सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब आहे. महागाई जर आटोक्यात आली नाही तर सर्वसामान्यांची जगणे मुश्किल होईल.
ज्योती पवार
गृहिणी तोंदे