बोगस हजेरी लावून रोजगार हमीचे काम पूर्ण….
माजी सरपंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोजगार हमीच्यां कामावर…
आटपाडी प्रतिनिधी
शेटफळे ता. आटपाडी येथील माजी सरपंच रोजगार हमीच्या कामावर जात असलेले दाखवून बोगस मस्टर काढला आहे. तर याच कामाबद्दल राज्य सरकारकडून सरपंच व ग्रामसेवक यांना पुरस्कार मिळाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की एखाद्या गावचे सरपंच बनायचं असेल तर काय काय करावे लागतं ते जे सरपंच झालेत त्यांना चांगलंच माहित आहे. आजच्या काळामध्ये रोजगार हमीच्या कामावर जाणारे कुटुंब आणि त्यातील व्यक्ती सरपंच असणार ही बाब आश्चर्यचकित आहे.
परंतु सरकारी चौकशी अहवाल सांगत आहे की शेटफळे गावचे माजी सरपंच हे सहकुटुंब रोजगार हमीच्या कामावर जातात .आणि याची चौकशी करणारे व अहवाल सादर करणारे ग्रामरोजगार सेवक आणि ग्रामसेवक यांनी उत्कृष्ट काम केले म्हणून त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य सरकारकडून सन्मान होतो. ही बाब कोणालातरी पटेल का ?
पण दस्तूर खुद्द सरपंच व त्यांचे कुटुंब रोजगार हमीवर कामाला जातात त्यांच्या नावाचा मस्टर निघतो आणि त्याच ग्रामपंचायतला शासनातर्फे पुरस्कार दिला जातो. म्हणजे शासनाचा कारभार किती भोंगळ पद्धतीने चालतो याचं उत्तम उदाहरण आहे.
शेटफळे गावातील रानमळा ते तडवळे जाणारा रस्ता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मुरमीकरण करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. हे काम 27 जानेवारी 2022 ते 24 जुलै 2022 या दरम्यान झाल्याचे कागदपत्रांमध्ये नोंद आहे. या रस्त्याचं काम मजुरांऐवजी यंत्राच्या साह्याने केले होते ही बाब येथील स्थानिक नागरिक प्रकाश गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिली होती. व या कामाची चौकशी व्हावी म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती आटपाडी यांना 6 ऑक्टोबर 2022 रोजी लेखी पत्र देऊन मागणी केली होती .
मात्र त्यांच्या या मागणीला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना 13 ऑक्टोबर 2022 रोजी लेखी पत्र देऊन रोजगार हमी कामातील भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती.
मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये स्थानिक पातळीवर ग्राम रोजगार सेवक किरण महामुनी व ग्रामसेवक लखन सनदी यांना दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी च्या पत्राने चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
त्यानुसार शेटफळे चे ग्रामविकास अधिकारी एल. ए .सनदी यांनी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की त्यांना मिळालेल्या 13 सप्टेंबर 2022 च्या पत्रानुसार त्यांनी 14 एप्रिल 2022 रोजी प्रत्यक्ष कामावर जाऊन कामावर हजर असलेल्या मजुरांचे जिओ टॅगिंग फोटो व हजर असलेल्या मजुराकडून सदर कामावर काम करत असल्याबाबतचे पत्र त्यांच्या स्वाक्षरीसहित घेतले आहे. असा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे .
मात्र स्वाक्षरीसहित घेतलेले पत्र या पत्रावर नमूद केले आहे की या कामावरती सदरचे मजूर हे मागील सहा सात महिन्यापासून काम करत आहेत. मात्र हे काम जानेवारी महिन्यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि एप्रिल महिन्यामध्ये संपले आहे असे पत्रामध्ये सहा-सात महिने लिहिलेले आहे. त्यामुळे या पत्राच्या सत्यते बाबत शंका निर्माण होत आहे.
त्याचबरोबर रोजगार सेवक व ग्रामसेवक यांना सप्टेंबर महिन्यामध्ये चौकशी आदेशाचे पत्र दिले आहे. परंतु यांनी एप्रिल महिन्यांमधील तारीख टाकून चौकशी अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे या अहवाला वर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
विशेष म्हणजे शेटफळे गावचे माजी सरपंच त्यांचे वयोवृद्ध वडील त्यांची पत्नी विद्यालयांमध्ये शिक्षण घेणारा मुलगा हा रोजगार हमीच्या कामावर काम करत असल्याचं व त्यांना नियमित वेतन मिळाल्याचं कागदपत्रांमध्ये नोंद आहे.
शिवाय याच कामावर अशा अनेक मजुरांची नावे आहेत की ज्यांना मोठी शासकीय पेन्शन मिळते .त्यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट व शिक्षक यांची पेन्शन मिळते. शिवाय यामध्ये अनेक व्यवसाय करणाऱ्या युवकांची ही नावे आहेत.
रोजगार हमी या योजनेअंतर्गत गरीब गरजू नागरिकाला शंभर दिवसाचा हमखास रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिली जाते. मात्र या योजनेमध्ये शासकीय नोकरदार किंवा पेन्शनदार यांना यामध्ये सामील करता येत नाही असा नियम असताना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसवून मस्टर काढला आहे .
गाव पातळीवर काम करणारे शासकीय कर्मचाऱ्यांनी दिलेला अहवाल चुकीचा आहे किंवा बरोबर आहे हे पडताळून न पाहता वरिष्ठ अधिकारी यांनी तक्रारदार यांना तोच अहवाल सादर केला आहे. ज्या शासकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावरती शासकीय कामकाज नियमानुसार चालवण्याची जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी जर अशा पद्धतीने बेजबाबदारपणे पार पाडत असतील व अशा चुकीच्या कामाबद्दल सुद्धा शासन स्तरावर चुकीच्या लोकांचा सन्मान केला जात असेल तर मग या ठिकाणी इमानदार नागरिकांनी तक्रार करावी की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकट – रोजगार हमीच्या ज्या कामावर सरपंच व त्यांच्या कुटुंबाची हजेरी लावून पगार काढला आहे अशाच बोगस कामाचा महाराष्ट्र शासनाकडून ग्रामसेवक,रोजगार सेवक यांना पुरस्कार मिळाला आहे.