तरच समाजकारणाचा “विजय” होईल …
मारुती शिरतोंडे
सांगली ;
काही माणसं पैशाच्या पाठीमागे पळतात तर काही माणसं मानवतेच्या दिशेला वळतात. पैशाची भूक असणाऱ्या माणसांना शाश्वत सुख मिळतं, असं काहीही नाही. पण स्वतःभोवती माणूसकीची खोप केलेल्या माणसाला आनंदाची झोप मात्र नक्कीच लागते. काहींच्या नजरेत पैसा खूप मोठा असतो तर काहींच्या दृष्टीने एकमेकांच्या सुखदुःखात धावून येणारा माणूस मोठा असतो. आयुष्यभर पैसा-पैसा केलेल्या माणसाला म्हातारपणात त्याच्या जवळची माणसं सुद्धा विसरतात. चार खांदेकरी भेटणं अवघड होऊन जातं. पण जी माणसं माणसांसाठी झटतात, काम नसताना सुद्धा एकमेकांना भेटतात, लोकांच्यात जाऊन आणि लोकांच्यात राहून परस्परांच्या समस्या सोडवण्यासाठी हातात हात घालून एकमेकांना आपुलकीने साथ देतात, तीच माणसं सगळ्यांना जवळची वाटतात. अशा माणसांना कशाचीच कमी पडत नाही आणि पैशावाचून त्यांचं काहीच अडत नाही. कारण समाजाला संसार मानणारी माणसं सर्वसामान्यांच्या काळजातलं घर असतात. समाजहित हीच ज्याच्या जगण्याची रीत आहे असा आटपाडी तालुक्यातील शेटफळेचा एक सच्चा समाजसेवक म्हणजे विजयकुमार पोपट देवकर.
दुष्काळाने अखंड पिडलेल्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे या गावी विजयचा जन्म झाला. वडील मुंबईला माथाडी कामगार. विजयच्या आई-वडिलांना एकूण दोन मुले आणि एक मुलगी. त्यातील थोरला मुलगा विजय प्रचंड खेळकर स्वभावाचा असल्याने आणि चाळीतल्या वातावरणात मॅच होत नसल्याने आई-वडिलांनी त्याला गावीच आजी-आजोबा जवळ ठेवले. दूध दुभतं खाऊन आणि तालमीत जाऊन विजय लहानाचा मोठा होत होता. 1993 साली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी दुष्काळी परिषदेसाठी शेटफळेला आले होते. गावात जोशपूर्ण वातावरण तयार झालं होतं. झांजपथकाचा आवाज रोमांचकारी माहोल बनवत होता. गावातून रोमहर्षक मिरवणूक निघाली होती. तेव्हा आठ वर्षाच्या लहानग्या विजयने पोटतिडकीने घोषणा दिली आणि सगळ्यांनी त्याच्या आवाजाला प्रतिसाद दिला. कोरड्या दुष्काळात सुद्धा घोषणांचा पाऊस पडू लागला. विजयचा आवाज गर्दीला भिडू लागला. नागनाथअण्णांनी विजयच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. त्या बाप माणसाच्या थापेनं विजयच्या अंगात चैतन्याची लहर उसळली आणि समाजकार्याची त्याला विशेष गोडी लागली. गावगाड्यात लग्नापासून ते रक्षाविसर्जनापर्यंत जात पात न मानता विजय लोकांना मदत करू लागला. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात झोकून देऊ लागला. एकदा खिशात एकही रुपया नसताना विजयने गावातील पोरांना गोळा करून गावात दहीहंडीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा आख्खं गाव जमलं होतं. संपूर्ण गावाचे विजयवर लक्ष वेधले होते. त्यावेळी तरुणांची फळी विजयच्या भोवती मजबूत होऊ लागली. विजय पोरांसाठी झोपेतून उठून धावून जाऊ लागला. गरजेला पडू लागला. इथेचं विजयच्या समाजसेवेचे बाळकडू रूजत गेले.
बारावीपर्यंतचे शिक्षण गावात संपवून विजय पदवीच्या शिक्षणासाठी आटपाडीला गेला. शाहीर जयंत जाधव यांच्या रसवंती गृहाजवळ तो गप्पा मारत थांबत होता. त्यामुळे त्यांच्याशी त्याची अगदी निकटची ओळख झाली. तिथेच त्याला चळवळीतली अनेक माणसं भेटत होती. त्यांचे विचार ऐकून विजयला समाजबदलाची ओढ लागली. त्या काळी विद्यार्थी शिष्यवृत्ती बरेच दिवस उलटून गेले तरीही मिळालीच नव्हती. वाट पाहून विद्यार्थ्यांचे डोळे थकले होते. समस्त विद्यार्थी वर्ग चिंतेत होता. विजयने तो प्रश्न हातात घेऊन विद्यार्थ्यांची समिती तयार केली. शिष्यवृत्तीच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा पातळीपासून विद्यापीठापर्यंत यशस्वी लढा दिला. साडेसतरा लाख रुपयांची थटलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाने परिसीमा गाठली. ज्याच्या त्याच्या तोंडावर विजयचं नाव येऊ लागलं आणि विजय विद्यार्थी नेता झाला. कॉलेज च्या प्रत्येक उपक्रमात तो सहभागी असायचा. त्यात सांस्कृतिक कार्यक्रमात तर विजय नेहमीच अग्रभागी असायचा. पदवीच्या पहिल्या वर्षी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात 22 पैकी एकूण 17 कार्यक्रमात विजयचा सहभाग होता. त्यामुळे वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे असलेल्या अलका कुबल यांच्या हस्ते विजयला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. विजय सगळीकडेच चमकत होता. जयंत पाटील यांच्या हस्ते त्याला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं आटपाडी तालुकाध्यक्ष पद मिळालं. टी सिरीजची निर्मिती असलेला महिमा रेवणसिद्धाचा नावाचा चित्रपट सुद्धा त्याला त्याकाळात मिळाला. त्याने अभिनय केलेल्या 'दुष्काळावर मात' या एकांकिकेला युवा महोत्सवात सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात विजयची जोमाने घौडदौड सुरू झाली.
दीनदुबळ्या गोरगरिबांसाठी विजय काम करत होता. दैनंदिन जीवनात लोकांसमोर येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विजय सदैव तयार असायचा. लोकहितासाठी विजयने 'माणवैभव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची' स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास वाटप, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम विजयने राबवले. भागातील नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी प्राध्यापक विश्वनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली "माणवैभव" या दिवाळी अंकाची निर्मिती केली. आज पर्यंत मा.शरद पवार, सदाशिव अमरापुरकर, आर. आर. पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, नारायण राणे अनिलभाऊ बाबर यांसारख्या दिग्गज मान्यवरांच्या हस्ते माणवैभव दिवाळी अंकाचे प्रकाशन झालेले आहे. तर विठ्ठल वाघ, फ. मु. शिंदे, भालचंद्र नेमाडे, इंद्रजित भालेराव या प्रतिभावंत साहित्यिकांनी माणवैभवचा दर्जा उंचावला आहे.
विजयच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना अचानक कामानिमित्त विजयला शिक्षण सोडून मुंबईला जावे लागले. आटपाडीत बस स्टँडजवळ विजयला निरोप देण्यासाठी शंभर-दीडशे कार्यकर्ते जमले होते. ट्रॅव्हल्स आटपाडी येथून झरे मध्ये पोहोचली तर तिथे सुद्धा विजयचे मित्र गोळा झाले होते. आपल्यावरील मित्रप्रेम पाहून विजयला त्या रात्री मुंबईत पोहचेपर्यंत झोप लागली नाही. शिवाय जेवण करण्याची सुद्धा इच्छा झाली नाही. पण जड अंतकरणाने विजय मुंबईला गेला आणि माथाडी कामगार झाला. 19 वर्षाच्या वयात एक क्विंटलची गोणी पाठीवरून वाहू लागला. कारखान्यातील पोत्यांची थापी पायावर पडून विजयसोबत काम करणाऱ्या साखरे मामांचा पाय मोडला. साखरे मामा म्हणजे पन्नाशी गाठलेला माणूस. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. हॉस्पिटलचे बिल भागवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. विजयने हे सगळं पाहिलं होतं. अशा परिस्थितीत त्याने सर्व कामगारांना एकत्र केले. प्रत्येकाने आपापल्या पगारातून साखरे मामांना मदत करूया असे आवाहन दिले. सर्व कामगारांनी विजयचे ऐकले आणि साखरे मामांचे हॉस्पिटलमधील सर्व बिल भागवले. तेव्हा कुठे विजयचा जीव भांड्यात पडला. खेडेगाव सोडून मुंबईत आला असला तरी विजयची सामाजिक जाणीव मात्र तितकीच तीव्र होती. मुंबईतीलच एका रिक्षावाल्याने विजयची हुशारी पाहून त्याला पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला आणि विजय मुंबई सोडून पुन्हा आपल्या जन्मगावी शेटफळेला आला.
गावाकडे आल्यावर विजयने पुन्हा त्याच उत्साहाने शिक्षण आणि समाजसेवेचा ध्यास घेतला. जि. प. सदस्य तानाजी पाटील आणि अण्णासाहेब पत्की यांच्या माध्यमातून अनेकांना घरकुल, शेततळी, शिलाई मशीन मिळवून दिले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विजयने पहिल्यांदाच मृतदेहाला खांदा दिला. ज्या वयात मुलं मृत व्यक्तीजवळ जात नाहीत, मातीला जात नाही, त्या वयात विजयने खांदा दिलेला पाहून लोकांना त्याच्याविषयी विलक्षण आपुलकी वाटू लागली. आज पर्यंत विजयने जवळजवळ 170 लोकांना खांदा दिला आहे. 48 वेळा स्वतः रक्तदान केलं आहे. लोकांच्या दुःखात निस्वार्थी धावून येणारा तो प्रामाणिक माणूस आहे. त्याकाळात विजयने आपल्या संस्थेच्या वतीने 27 हजार लोकांचे डोळे मोफत तपासले. अडीचशे लोकांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन केले. दुष्काळात ठीकठिकाणी पाणपोईची सुविधा उपलब्ध केली. अपंग, विधवा, परितक्त्या महिला आणि ज्येष्ठांना पेन्शन मिळवून देण्यासाठी त्याने सरकारी कार्यालयात अनेक हेलपाटे घातले आणि त्यांना पेन्शन मिळवून दिली. विजयने प्रत्येक गोष्टीत समाजाशी आपली सामाजिक बांधिलकी जपली. एकदा तो मुंबईवरून परत येताना कराडजवळ सूर्लीच्या घाटात अपघात होऊन डंपर दरीत पडलेला त्याने पाहिला. रात्रीचे 7 वाजले होते. सगळीकडे अंधार पसरला होता. घाटातून जाणारी वाहने थांबत होती. लोकं दरीत वाकून बघत होती. खालून ड्रायव्हरच्या ओरडण्याचा आवाज येत होता. वर लोकांची गर्दी जमली होती. लोकांच्यात चुळबूळ सुरू होती पण भीतीने दरीत उतरायला मात्र कोणीच तयार नव्हते. अशा परिस्थितीत विजय एकटाच समोर आला आणि दरीत उतरला. ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत डंपर मध्ये अडकलेल्या एकजणाला दरीतून बाहेर काढत तो वर येऊ लागला. ते दोघे जखमी झाले होते. विजयने त्यांना आधार दिला आणि तो त्यांना घेऊन दरीतून बाहेर आला. तेव्हा तिथे गर्दी करत उभा असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. विजयच्या अंगावर काटा आला आणि हाच क्षण विजयला खूप प्रोत्साहन देणारा ठरला. त्यामुळे आजही कुठे अपघात झाला तर बघ्यांच्या गर्दीत विजय स्वतः पुढे होऊन अपघात झालेल्या व्यक्तींना नेहमीच मदत करतो. म्हणूनच अपघात झाल्यानंतर विजयच्या संपर्कातील शेकडो माणसं पोलिसांना फोन करण्याऐवजी पहिला फोन विजय देवकरला करतात.
गावात प्रबोधन मोहीम राबवण्यात विजयचा नेहमीच पुढाकार असतो. आतापर्यंत विजयने सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापुरकर, निवृत्ती महाराज इंदुरीकर, सिंधुताई सपकाळ, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अभिनेते विजय चव्हाण, दीपक शिर्के, बाळ धुरी, डीसीपी गजानन राजमाने, डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांसारख्या मान्यवरांना गावात बोलवून लोकप्रबोधन केले आहे. गावच्या मराठी शाळेतील दहा मुली दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः विजयने उचलली आहे. विजय शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य असताना गावची शाळा स्वच्छ सुंदर शाळा प्रकल्पात जिल्ह्यात दुसरी आली आहे. विजयची ही सर्व कामं गाव उघड्या डोळ्यांनी पाहत होता. म्हणूनच जानेवारी 2021 च्या निवडणुकीत विजयने लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामाचा डोंगर पाहून मतदारांनी त्याला 193 मतांचे लीड देऊन ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आणले.
निवडून आल्यावर चार महिन्यातच विजयने दोन कोटी 40 लाखांचे तीन बंधारे मंजूर करून आणले. तसेच शेटफळे गावाच्या विकासासाठी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याकडून 10 लाख रुपयांचा निधी आणला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत विजयने घरोघरी मास्क, सॅनिटायझर व गरजूंना किराणामालाचे किट वाटून लोकांना खुप मदत केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र शेटफळे गाव हॉटस्पॉट झाले. त्यामुळे विजयने पुढाकार घेऊन ग्रामपंचायत आणि आरोग्य उपकेंकेंद्रामार्फत राज्यात प्रथमच मिनी कोविड सेंटर उभारले आणि छोट्या ग्रामपंचायतीही कोविड सेंटर उभारू शकतात हे सबंध महाराष्ट्राला पहिल्यांदाच दाखवून दिले. कोविड पेशंटना बेड, ब्लड आणि ऑक्सीजन पुरवण्यासाठी विजय रात्रंदिवस पळू लागला. यंत्रणा हालवू लागला. कोविडमध्ये मनाने पुरत्या खचून गेलेल्या पेशंटच्या जवळ बसून विजय त्यांना जेवू घालत होता. खूप लोकांनी या सेंटरला औषधे, ऑक्सीजन मशीन, सॅनिटायझर मास्क अशी सर्व प्रकारची मदत केली. तहसीलदार, प्रांताधिकारी, एसपी, डीवायएसपी या सर्वांनी शेटफळेच्या कोविड सेंटरला भेट दिली आणि विजयच्या पुढाकाराचे कौतुक केले.
एके दिवशी विजयने आटपाडीत एका पेशंटला दहन दिलं. तिथेच एका मित्राचा "आईला जास्त त्रास होतोय", म्हणून विजयला फोन आला. विजय लगेच त्या मित्राच्या आईला घेऊन आटपाडीच्या सरकारी दवाखान्यात आला. तिथून पेशंटला डॉक्टरांनी तासगावला जायला सांगितले. म्हणून त्या पेशंटला घेऊन ऍम्ब्युलन्सने विजय तासगावला गेला. तिथे त्या पेशंटला ॲडमीट केलं. तोपर्यंत दुसऱ्या एका मित्राचा फोन आला. एका पेशंटची ऑक्सीजन लेवल 80 झाली होती. विजय तिथून लगेच 50 किमी चा प्रवास करुन आटपाडीच्या सरकारी दवाखान्यात गेला. तिथली ॲम्बुलन्स दुसऱ्या एका पेशंटला घेऊन गेली होती त्यामुळे यांना ऍम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. मग विजयने प्रायव्हेट गाडी घेऊन . तिथल्या डॉक्टरांनी विजयला मदत केली. विजयने प्रायव्हेट गाडीत पेशंटला झोपवले. डॉक्टरांनी ऑक्सीजन लावून दिला. विजय पेशंटला घेऊन सांगलीला आला आणि रात्रीच्या अडीच वाजता मिरज सिव्हिलला पेशंटला ऍडमिट केले गेले. मध्यरात्र सरून गेली होती. मुसळधार पाऊस पडत होता. सकाळपासून विजयच्या पोटात काहीच नव्हतं. तरी विजयने न जेवता आणि न झोपता संपूर्ण दिवस पेशंटच्या सेवेत घालवला होता. कारण समाज सेवेतच विजयचा भलामोठा आनंद दडला होता.
आजकाल राजकारणात पैशावर मतं विकत घेतली जात आहेत. पैशापुढे माणूस खुजा झालाय. माणूस माणसातून वजा झालाय. अशी स्थिती सगळीकडे असताना विजयचे समाजकारण भल्याभल्यांना याड लावणारे आहे. विजयचं समाजासाठी झगडणं जिगरबाज आहे. त्यामुळेच विजयला लोकांनी प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं. कारण त्याचं समाजकारण तळागाळात रुजलं होतं. विजय सारखी बेभान होऊन समाजकार्य करणारी माणसं आहेत म्हणूनच समाज निश्चिंत आहे. अशी माणसं आजच्या तरूण पिढीसमोरचा फार मोठा आदर्श आहेत. माणसांच्या ह्रदयात घर करणारा विजय जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा त्याच्याबद्दलचा आदर नेहमीच द्विगुणित होत राहतो. म्हणूनच सामान्यांच्या जगण्याशी निखळ, निर्मळ आणि निर्विवाद नातं जोडणारा विजय लोकांच्या नजरेतला निस्वार्थी देवमाणूस आहे.
मारुती शिरतोडे