जत तालुक्यात भटक्या समुदायातील कुटुंबांना मदत
माणगंगा न्यूज जत:-
देशभरातील कोरोना महामारी परिस्थिती पाहता कोरो इंडिया मुंबई या संस्थेने जत दुष्काळी तालुक्यामध्ये ३०० हून अधिक कुटुंबाना कोरोना काळात मदत केली आहे. कोरो इंडिया, मुंबई व ग्रामीण विकास संस्था, कोसारी आणि सहयोग सोशल फौंडेशन अचकणहळी या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत कोसारी, गुळवंची, प्रतापूर, शेगाव, बागलवाडी, हिवरे, कुंभारी ,जत, देवनाळ, अचकणहळी, निगडी येथील अत्यंत गरजू भटक्या समुदायातील, देवदासी, तृतीयपंथी, पाल मारून राहणारी कुटुंबे अशा कुटुंबांना महामारीच्या काळात किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
कोरो इंडिया या संस्थेने आतापर्यंत देशामध्ये अनेक राज्यात संविधानाने दिलेले हक्क व अधिकार, पाणी प्रश्न, महिला अधिकार, आदिवासीचें प्रश्न, शिक्षण, व त्याचबरोबर झोपडपट्टी भागातही रोजगार, आरोग्य शिक्षण यावर कार्य सुरू आहे. या संस्थेच्या मार्गदर्शनाने ग्रामीण विकास संस्था व सहयोग सोशल फौंडेशन या संस्था जत भागामध्ये पाणी प्रश्न आणि हक्क व अधिकार यावर काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये आरोग्य, रोजगार, अन्नसुरक्षा या मोहिमेद्वारे हक्क व अधिकारावर सध्या चांगले काम सुरू आहे. कोरोना टाळेबंदीच्या कारणाने सर्वसामान्य कुटुंबांना जो त्रास होतो,यासाठी त्यांचे हक्क व अधिकार यावर या तिन्ही मोहिमेच्या माध्यमातून सध्या चांगले कार्य सुरू आहे.
या सामाजिक चळवळीमध्ये कोरो इंडियाचे सूर्यकांत कांबळे,वैशाली रायते, बाळासाहेब रणपिसे,सचिन लवटे, स्वाती सावंत, माधव गडदे यांचे मार्गदर्शन लाभते.त्याचबरोबर संस्था प्रतिनिधी म्हणून विवेक टेंगले, प्रशांत कांबळे, सुरज मणेर, सागर गुजले, विक्रम कांबळे हे काम करतात.