अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा:अर्थतज्ज्ञ अनिल बोकील
सांगली येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचा मेळावा संपन्न
सांगली/प्रतिनिधी:
‘आपणाला सन्मान पाहिजे, भीक नको! आपणच ठरवणार,सरकार कोणाचे बनवणार! जाती-पाती,धर्माच्या पलीकडे जाऊन अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा’ असे आवाहन अर्थक्रांतीचे जनक व अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी सांगली येथे केले.
अर्थक्रांती भारतीय ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान सांगली जिल्हा यांच्या वतीने आयोजित ‘सन्मान ज्येष्ठांचा, सोहळा अर्थक्रांतीचा’ या ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
अर्थक्रांतीचे राष्ट्रीय अध्यक्ष व समन्वयक विजय देशमुख- दबडगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संरक्षक भारत विकास संगम, माजी खासदार बसवराज पाटील कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, लातूर येथील राष्ट्रीय सचिव प्रशांत देशपांडे, प्रवीण शुक्ला, पी.के.पाटील, प्रकाश बन्सल, सचिव जोशी, बार्शी येथील डॉ. दुधाळ, औरंगाबाद येथील सय्यद, पुणे येथील विठ्ठल चौधरी,वृषाली मरळ, ईश्वर चौधरी, एम.डी. पाटील, मजत सर,आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महाराष्ट्र गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
‘व्यक्तीला ना पक्षाला,जातीला ना धर्माला आमचे मत या प्रस्तावाला’ या सूत्राला धरून आणि आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती’ या प्रस्तावाला निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवण्यासाठी हा अर्थक्रांती सांगली जिल्हा ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे यांनी स्वागत केले.आटपाडी तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांनी आभार मानले.सूत्रसंचालन कडणे दादा यांनी केले.
ज्येष्ठांचे विशेष कार्यगौरव, समाजसेवा व उद्योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या गोविंद भास्कर परांजपे, सुधीर शामराव नाईक, सर्जेराव रामचंद्र यादव, रोनक रजनीकांत शहा, सौ.सुनिता रावसाहेब बने यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील,जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत पाटील, कार्याध्यक्ष डॉ. विजयकुमार स्वामी, सचिव गजानन पाटील, कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे, कायदेशीर सल्लागार ॲड.किरण पाटील, सदस्य अरविंद चांडवले, भगवान पाटील, प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मणराव खटके, ज्येष्ठ नागरिक मित्र सचिन थोरात, सुभाष पवार, चंद्रकांत कुलकर्णी, प्रा. इंद्रायणी पाटील,सौ.अर्चना मुळे,आर.एश.मोहिते, हणमंतराव पाटील,डी.पी.सावंत, सुभाष शिंदे, तानाजी पाटील, बबन मुळीक, शंकर कदम, मामा कुलकर्णी, आनंदराव पाटील, विठ्ठल पाटील, डॉ. तानाजी चव्हाण, रामभाऊ जगदाळे,ॲड.माळी, दीपक गुरव, सचिन थोरात, बबन शिंदे, सुभाष खराडे,वसंतराव यादव, वैभवी कुलकर्णी,अशोक पाटील,डी.के.मोरे, निवास शिंदे, चंद्रकांत कुलकर्णी, नेवरीकर सर, कमाने सर,यांच्यासह संपूर्ण टीमने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.
प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक,अर्थक्रांतीचे जनक,अर्थतज्ज्ञ अनिल बोकील बोलताना म्हणाले,पैसा नावाची गोष्ट आता आपल्या आयुष्यात अशी घुसलेली आहे की, आपली सर्व नाती, आता ती त्यातच बांधली गेलेली आहेत. पैशावर आता राजकारण होऊ लागलं. जातीचं, धर्माचं, वेगवेगळ्या भाषेचं आणि माणसाचे पण तुकडे व्हायला लागले. हातात नसलेला आपला जन्म हा बघता बघता आपल्या पायातल्या बेड्या झाल्या. काहीजणांना त्याचा खूप मोठा आनंद मिळाला, सौख्य मिळाले, आधार मिळाला. परंतु फार मोठी आपली भाऊ-बहीण मागे पडली, जी माणूस म्हणून जन्माला आली आणि तेवढेच फक्त आपण विसरलो आणि आपण त्याला वेगवेगळी ठिगळं, वेगळ्या वेगळ्या चिठ्ठ्या लावल्या, जातीच्या, धर्माच्या आणि फक्त आपण त्यातला माणूस विसरलो. आपण कधीही देव नव्हतो, आपण कधीही दानव पण नव्हतो, आपण मानव आहे, माणूस आहे, आपणाला माणसाचे कायदे हवेत. आज पैसा सगळ्या कुटुंबाला पसरून माणसा माणसाला तोडतोय.
आपल्या देशातील एक टक्के लोक आहेत, त्यांच्याकडे देशातील 40% संपत्ती आहे. वरचे जे दहा टक्के लोक आहेत, त्यांच्याकडे त्यांच्याकडे देशाची 72 टक्के संपत्ती आहे. आणि या देशांमधील जे खालचे 50% लोक आहेत, त्यांच्याकडे पूर्ण संपत्ती देशाची तीन टक्के संपत्ती आहे. जे पराकोटीचे प्रश्न तयार झाले. माझ्या बाल्यावस्थेत देशच गरीब होता, शेतीवर अवलंबून होता. पूर्वी शेतकरी समृद्ध होता. धान्याचे दाणेही आपण आता पैशाकडे बांधून टाकले. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनाच ते खायला मिळायला लागले, जे निसर्गाने दिलेल्या आहे. खेड्यापाड्यातही हिशोब व्हायला लागले,काही माणसे उपाशी झोपायला लागली. पूर्वी मापन पद्धतीत माणसाचं मन मोठं होतं. पैशाने माणसाचा स्वार्थ जागा केला.
स्वार्थ आणि परमार्थ या दोन बाजू असून परमार्थाचेही एक अर्थशास्त्र आहे. सर्वांचा स्वार्थ एकत्र येऊन जो अर्थ तयार होईल, तो परमार्थ! या देशांनी परमार्थ शब्द पिढ्यानपिढ्या ऐकला. या देशात त्याचं लक्षातच आलं नाही की, त्याचा अध्यात्माशी संबंध नाही, त्याचा अर्थशास्त्राशी संबंध आहे. आज आपल्या आयुष्याची एवढे वर्षे घासल्यानंतर,कष्ट केल्यानंतर वयाच्या साठीच्या पुढे आता पहिली भीती वाटायला लागली की, आता या वयात हाताशी मुलेबाळे नाहीत तर जगणं कसं जगायचं? दवाखाने मरू देत नाहीत, आणि परिस्थिती जगू देत नाही, अशी आजची केविलवाणी परिस्थिती आहे.परंतु याच उत्तरही सोपं आहे. जसे विषावर उत्तर विषच आहे, तसे पैशाच्या या विषावर पैसा हाच एक उत्तर आहे.फक्त तो स्वार्थाकडून परमार्थाकडे ! जगाच्या आठशे कोटी लोकांचा स्वार्थ पूर्ण होईल, त्यात माझा स्वार्थ असणारच. जातीपातीचे तुकडे फक्त राजकारणातच आपल्यात आले आहेत. देशांमध्ये पैसा प्रचंड तयार झाला आहे, परंतु त्याचे योग्य वाटप होत नाही. एकाच झाडाचा अर्धा भाग जास्त पाणी मिळतोय म्हणून सडायला लागलेला आहे आणि अर्ध्या भागाला पाणी मिळत नाही म्हणून सुकायला लागलेला आहे. एकाच शरीरात अर्ध्या बाजूला सर्व रक्त आहे, दुसऱ्या बाजूला रक्तच नाही.
या सरकारकडे मी काय मागणार? ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती का आहोत? रस्त्यावरील भिकारी जरी असेल आणि त्याने एक बिस्किट पुडा जरी विकत घेतला तरी त्यांनी सरकारला कर दिलेला आहे, तो म्हणजे जीएसटी.खालचे 50 टक्के लोक ज्याच्याकडे तीन टक्के संपत्ती आहे, तो देशाच्या जीएसटीच्या 66 टक्के जीएसटी हे 50% लोक देत आहेत. आज सर्व सरकारी नोकरांच्या आमदार खासदारांच्या पेन्शन बघितल्या तर दीड टक्का सरकारी नोकरांच्या पेन्शन एक एक लाख रुपये पर्यंत आहेत. देशातील शंभर टक्के लोकांनी कर दिलेला आहे, म्हणून हा आपला हक्क आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आमच्या मतांवर ही लोकशाही चालते आहे. तुम्ही आम्ही जर मत दिले नाही तर हे सरकार होऊ शकत नाही.लोकशाही तुम्ही आम्ही जिवंत ठेवली आहे, आपल्या मतावर हा देश चालू आहे. आपण फक्त मानलं पाहिजे, आमचे 140 कोटी लोकांचे कुटुंब! आम्हाला भेदभाव मान्य नाही. ना जात को, ना धर्म को, मेरा व्होट इस प्रोग्राम को.
आत्ताच्या राष्ट्रपती खूप संवेदनशील आहेत.
आपण ठरवणार, सरकार कोणाचे बनवणार? आपणाला सन्मान पाहिजे, भीक नको! दर महिन्याला दहा हजार रुपये मिळाले पाहिजेत, हा माझा अधिकार आहे! आम्हाला कोणती गोष्ट मोफत नको! आम्हाला आमच्या हक्काची गोष्ट हवी आहे! हे जर पैसे दहा हजार रुपये आमच्या खात्यामध्ये आले, तर यावर आपला देश चालेल! हा पैसा तरुणांच्या हातात जाईल.तुम्हा आम्हाला आज एकत्र यायला हवं!
आपण एका गोष्टीवर एकत्र यायला पाहिजे, आपल्या हक्काची गोष्ट, भिकेची नको! मी दिलेला आहे, ते मला मिळालं पाहिजे! हक्काने मिळाला पाहिजे! हे राष्ट्रपतींच्या समोर मांडणी केलेली आहे.हे सरकारकडूनच कायदा करून घेणार आहोत. आपणाला आपल्या हक्काचा सन्मानाचा शेवटचा दिवस गोड व्हायला हवा.आपला जन्म हातात नाही,पण मृत्यू मात्र सर्वांचा सुंदर असेल, हे जर घडलं तर! मुलाबाळांची पण काळजी संपेल, जेव्हा तुम्हाला खात्री मिळेल, तुम्हाला हे मिळणार आहे, तेव्हा पैशाच्या मागे कोण पळणार नाही! आपल्याला पेन्शन हवी!आपणाला सन्मान हवा! ॲट्रॉसिटीच्या कायद्यात सर्वांना आणावे! कुणीही आमचा अपमान करू शकणार नाही,आम्हाला आतापर्यंत कोणते आरक्षणाची गरज नाही! रेल्वे संरक्षण खात्यासारखे आम्हाला मंत्रालय वेगळे द्यावे! त्यामुळे राजकारण्याची आपल्याकडे बघायची दृष्टी बदलेल! आपणाला या देशात बदल घडवायचे आहेत! हा देश चुकीचा म्हणून तक्रार करायची नाही, हा देशच आपला आहे, आपणालाच बदलायचा आहे!
2024 ची निवडणूक जवळ यायला लागली आहे, आपण जर जाती-पाती, धर्माच्या पलीकडे गेलो आणि आम्ही जर उमेदवाराला सांगितलं हा एक प्रस्ताव घेऊन काम करा, आपला हा मताचा हक्क आपण राबवायला हवा.शेवटी अनिल बोकील म्हणाले,आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपली लढाई यशस्वी होईल, जीत हमारी होगी, हम होंगे कामयाब!
माजी खासदार बसवराज पाटील बोलताना म्हणाले, आपण तपस्या करून सरकार पुढे ज्या बाबी आहेत, त्यामध्ये आपल्या हक्कासाठी दहा हजार रुपये सन्मानधन, आमच्या पंधरा कोटी लोकांसाठी मंत्रालय, त्याचबरोबर इतर विशेष सुविधा आदि सर्व गोष्टींसाठी
एकदा आपण बसून ठरवू व भारताचे पंतप्रधान आणि आणखी ज्यांना भेटायचे आहे, त्यासाठी सारी शक्ती लावू.
फक्त आपण पंधरा कोटी नाही, तर कुटुंबातील सर्वांची ताकद लावली तर ७५ कोटी लोक आहेत. परंतु आपल्याला आपल्या ताकतीचा अंदाज नाही.
आपल्यामध्ये ताकद आहे, बुद्धी आहे,अनुभव आहे, याला योग्य दिशेने वापरा. कुटुंबामध्ये चांगले वातावरण निर्माण करणे, घरामध्ये अत्यंत आवश्यक आहे. याही गोष्टीकडे आपण जबाबदाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे.आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय संघटन बनवून एवढ्या मोठ्या मेहनतीने साऱ्या देशातील 15 कोटी लोकांसाठी काम केलेले आहे. हे काम ही चळवळ आहे, त्याचे एक तंत्र आहे, त्यासाठी आम्ही एकत्र बसून काम करू. शक्ती लावू आणि मोठ्या कार्यासाठी सहकार्य करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.
अर्थक्रांतीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख-दबडगावकर बोलताना म्हणाले, आपल्या एका मताचे मूल्य डोक्यात घ्या. जो तुमच्याकडे मत मागण्यासाठी येणारा उमेदवार आहे, त्याला जर तुम्ही लिखित मागितलं, ‘या प्रस्तावाला मी निवडून आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करेल’, ‘नाही प्रयत्न केला तर हाच माझा राजीनामा समजावा’ असं प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे.हजार-पाचशे अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका. जात, धर्म बघायचा नाही, आपणाला फक्त अर्थक्रांतीचा हाच प्रस्ताव याने संपूर्ण देश बदलणार आहे, केवळ देशच नाही, तर संपूर्ण जग यामुळे बदलणार आहे.अशा प्रकारचा हा प्रस्ताव आहे.तो तुमच्या सांघिक शक्तीवर, तुमच्या मताच्या शक्तीवर विजयी होणार आहे. ‘जेष्ठाच्या वोट बँकेचा विजय असो’
सांगलीमधील हा मेळावा जगातील पहिला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा मेळावा आहे.असे शंभर मेळावे संपूर्ण देशामध्ये आयोजित करायचे आहेत.