कु. आकांक्षा विरकर यांना राज्यपालांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी – वरकुटे मलवडी
माण तालुक्यातील सुपुत्र , माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख , शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिरा भाईंदर व नागोबा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. शंकरभाई विरकर यांची कन्या व नागोबा फाउंडेशनच्या ट्रस्टी कु.आकांक्षा विरकर यांना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील सागा फिल्म्स फाउंडेशनतर्फे आयोजित दुसऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण सोहळा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी दि. १६ एप्रिल रोजी राजभवन येथे संपन्न झाला.
यावेळी राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार सुधाकर श्रुंगारे , सागा फिल्म्स फाउंडेशनचे संस्थापक सागर धापटे – पाटील यावेळी उपस्थित होते.
समाजाच्या अनेक क्षेत्रात आज नैतिक र्हास होताना दिसत आहे. स्वार्थाचा विचार बळावत आहे. स्वतः पलीकडे जाऊन आपल्या परिसरासाठी , समाजासाठी व देशासाठी थोडे जरी काम केले तरीही समाज उन्नत होईल. या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर , झाशीची राणी लक्ष्मीबाई व सावित्रीबाई फुले यांच्या श्रेष्ठ कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.
राज्यपाल पुढे बोलताना म्हणाले अहिल्या देवी होळकर या दूरदृष्टी लाभलेल्या शासक होत्या असे सांगून अहिल्यादेवींनी उत्तराखंड येथील बद्रीनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे देखील काम केले होते याचे स्मरण राज्यपालांनी दिले. आज देखील समाजात अन्न, वस्त्र, औषध व निवाऱ्यापासून वंचित लोक आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने समाजसेवेचे छोटेसे कार्य जरी केले तरी देखील समाज जिवंत राहील.
कु. आकांक्षा विरकर हिला सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कु.आकांक्षा विरकर हिने कुंटुंबियासोबत हा पुरस्कार राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारला.
माणदेशी कन्या व सामाजिक कार्यकर्त्या कु.आकांक्षा शंकर विरकर हिच्या बरोबर महाराष्ट्रातील अनेक नामवंत व किर्तीवंत लोकांना पुरस्कार प्रदान केले आहेत. यामध्ये भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील, हास्य अभिनेते भाऊ कदम, सूत्रसंचालक व निवेदिका डॉ. समीरा गुजर , किर्तनकार ह.भ.प.सुदामभाऊ गोरखे कान्हा गुरुजी (जीवन गौरव), समाजसेविका डॉ आयुषी देशमुख, भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी अंकिता डोळस सोमणे, समाजसेविका अनघा बंडगर, डॉ स्वागत तोडकर, माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, पत्रकार रेखा खान, इस्कॉन राजगडचे सुंदर प्रभुजी याच्यासह ३० जणांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
कु. आकांक्षा विरकर हिला पुरस्कार मिळाल्याबद्दल माण तालुक्यासह मुंबईतून अभिनंदन होत आहे.