स्वतःच्या डोळ्यातील मुसळ आमदारांना कधी दिसेल? – पत्रकार कांतीलाल कडू यांचे मनोगत
पनवेल: नागपूर अधिवेशनात आ. प्रशांत ठाकूर यांनी उरणच्या चिटफंड विषयी प्रश्न उपस्थित केला. त्याला काही अर्थ आहे, असे वाटत नाही. गृहमंत्री त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. याचा स्पष्ट अर्थ की, दोन्ही आमदार आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांची ही खेेळी आहे. रायगडचे ठेवीदार, गुंतवणूकदारांची चिटफंडात फसगत झाली आहे, त्यांना सरकार आणि त्यांचे आमदार होलसेलमध्ये मूर्ख बनवतात. केवळ ठेवीदारांची सहानुभूती मिळावी, इतकाच त्यामागील त्या दोन्ही आमदारांचा हेतू आहे.
हे दोन्ही आमदार आणि त्यांचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री ढोंगी आहेत. कर्नाळा बँक घोटाळ्याविषयी तीन अधिवेशनात तीन वेळा आलटून पालटून दोन्ही आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. पाच वर्षात आतापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्याचे धारिष्ठ त्यांच्या गृहखात्याने दाखविले नाही.
महाआघाडीनेसुद्धा ते कर्तृत्व दाखविले नाही. बँकेचे अधिकारी सुताणे, वडके यांना सीआयडीने पनवेल संघर्ष समितीच्या रेट्याने अटक केली. ५२ हजार ठेवीदारांना विम्याचे पैसे मिळाले हीसुद्धा पनवेल संघर्ष समितीची कर्तबगारी आहे. आमदार प्रशांत ठाकूर हे श्रेय लाटणारे ‘बोंबल्या विठोबा, ठोंब्या विठोबा’ आहेत. या बोंबल्या, ठोंब्याने पत्रकार परिषद घेवून, संघर्ष समितीला बँकेचा परवाना रद्द केल्यावर बेंबीपासून विरोध केला होता.
पण दोन्ही आमदारांचे काही लोंबते म्हणतात, आमच्या साहेबांनी पैसे परत मिळवून दिले. तसे बोलले की, पक्षात पदे मिळतात. मग हे लोंबते छातीठोक आरोळी ठोकतात. अजितदादा पवार म्हणतात ते बरोबर आहे. ते म्हणतात ‘पुढार्यांच्या गाडीचे दरवाजे उघडणारे, मोठ्याने घोषणा देणारे आणि पुढे पुढे शेपटीचा गोंडा हलविणार्यांना गावात, प्रभागात कुत्रं देखील विचारत नसतो’. त्यांचा अनुमान, प्रचिती आणि अनुभव याबाबतीत तरी तंतोतंत खरा आहे.
उरण चिटफंडातून फसवणूक झालेले ठेवीदार, ग्राहक आणि दलाल अशी विभागणी आहे. यातील बहुतांश दलालांना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने उमेदवारी दिली होती. जासई ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपा उमेदवारांना पोलिसांनी ऐन निवडणुकीत तपासकामी उचलले तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर कुणी केला. त्या सेटिंगमध्ये कोण कोण होते. पोलिसांना कुणी फोन केले हे उरणकरांना ठाऊक आहेच. तेव्हा उगीच उरणच्या चिटफंडाची नौटंकी वाजवू नये. किती कोटींचा घोटाळा झाला, याविषयी ठोस माहिती नसताना सभागृहात तोंड उघडायचे आणि अज्ञान प्रकट करायचे हा पनवेलचे मतदार, नागरिकांचा अवमान आहे. त्यापेक्षा आ. प्रशांत ठाकूर यांनी नको तिथे नाक खुपसण्यापेक्षा उरण मतदार संघात त्यांच्या वडिलांनी सातशे कोटींची सिडकोच्या लाटलेल्या जमिनीच्या महाभ्रष्टाचारावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावा. उरणचे आमदार ते बालदी की टमरेल…? त्यांनी त्यांच्या मतदार संघातील जमिन घोटाळ्यावर तोंड बंद का ठेवले आहे? सरकारी जमिन लाटली तरी हे लबाड लांडगं गप्प कसे? उरणला या लबाडानेसुद्धा असाच जमिन घोटाळा केला आहे. ठाकुरांच्या भानगडी बालदींनी काढल्या की बादलींची सगळी लफडी ठाकूर इतर आमदारांच्या तोंडून बाहेर काढतील. मागे दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी सभागृहाकडे स्व:संरक्षणार्थ पिस्तूल बाळगणार्या पत्रकारांची माहिती मागितली होती. मेटे कधीच पत्रकारांच्या विरोधात गेले नव्हते. पण, कुणाच्या तरी विनंतीवरून त्यांनी सभागृहाकडे माहिती मागविली होती, मागील अधिवेशनात. हाती काहीच लागले नाही.
विधानसभा, विधानपरिषदेच्या एकाही आमदारांना रामबागचा सातशे कोटींच्या जमिन घोटाळ्याविषयी सभागृहात प्रश्न उपस्थित करावा, असं वाटत नाही. इतके सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी निलाजरे आणि असंवेदनशील असतील तर महाराष्ट्राची लूट करण्यात ते सगळे सामील आहेत, असे म्हणायला वाव आहे. किमान शिवसेनेच्या आमदारांना तरी लाज वाटली पाहिजे. त्यांच्या उद्धव ठाकरेंचे बंगले दाखवायला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर मुलुंडच्या नागडेबाबांसोबत मुरुडला थयथयाट करीत होते. त्यांना ही हुकमीसंधी आहे. पण त्यांनाही ठाकुरांनी गळाला लावले की काय, अशी शंका घ्यायला खूप मोठा वाव आहे. कॉंग्रेस नेते, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे या दोन्ही दिग्गजांचे दानव नृत्य सुरु आहे. त्यांचेही डोळे कसे उघडत नाहीत.
आमदार प्रशांत ठाकूर, त्यांचे वडील भूमाफिया माजी खासदार रामशेठ ठाकूर, बंधू परेश ठाकूर आणि आमदार पुत्र अमोघ ठाकूर यांनी भ्रष्टाचाराचा वारसा कायम ठेवून हजारो कोटींचा, अगदी तेलगीच्या स्टॅम्प पेपरला लाजवेल असा घोटाळा केला आहे आणि तरीही सरकार मांजरासारखे डोळे मिटून दूध पीत असेल तर हे सरकार राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी ताबडतोब बरखास्त केले पाहिजे.
ठाकुरांच्या महाघोटाळ्यात सहभागी असलेले सिडको अधिकारी, कर्मचारी, वक्ङ्ग बोर्डाचे संचालक, ट्रस्टचे विश्वस्त यांची चौकशी करून सर्व दोषींना तात्काळ बेड्या ठोकायला हव्यात. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत दाखवून ठाकूर आणि त्यांच्या पापाच्या भागीदारांना कारागृह दाखवायला हवे.
उरण चिटफंड, कर्नाळा बँक घोटाळ्यापेक्षा आ. प्रशांत ठाकूर आणि कुटुंबियांचा जमिन घोटाळा खूप मोठा आहे. गंभीर, भयंकर आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा आहे. भाजपाचे उरणचे आमदार महेश बालदी हे सुध्दा महाखलनायक आहेत. त्यांनी केलेल्या जमिन घोटाळ्याविषयी उरण सामाजिक संघटनेने शड्डू ठोकले आहे. परंतु, भाजपा वॉशिंग मशीनमध्ये भ्रष्टाचाराचे डाग असल्याशिवाय कुणी टिकत नाही, अशी धारणा निर्माण करण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. हे दोन्ही आमदार डाकू आहेत, लुटारू आहेत आणि सरकारी, खासगी, ट्रस्ट, वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटून गब्बर बनलेले आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. इतरांच्या डोळ्यातील कुसळ कसे दिसते हा प्रश्न आहे. एकीकडे भ्रष्टाचारी, चोर, लुटारुंच्या टोळीला अभय द्यायचे. त्याशिवाय स्वतःची फुटलेली तुंबडी शिवून शिवून भरायची आणि दुसरीकडे सभागृहात दिंडोरा पिटून ‘तो मी नव्हेच’च्या लखोबा लोखंडेच्या भूमिकेत टोपी फिरवत राहायचे, हे त्यांचे धंदे आहेत.
उरण चिटफंडात भाजपाचे पदाधिकारी लाभार्थी आहेत. कुणाला चारचाकी गाड्या तर कुणाला किंमती मोबाईल मुख्य आरोपीने वाटप केले आहेत. हे सर्व लाभार्थी सहआरोपी असताना, त्यांना एकप्रकारे क्लीन चिट देण्यासाठी ठाकूरांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
पेण अर्बन बँकेच्या गुन्हेगारांना प्रशांत ठाकूर आणि फडणवीस यांनी अभय दिले होते. त्यांना पक्षात घेतले. नगर परिषदेत निवडून आणले. अद्याप ठेवीदारांना त्यांची फुटकी कवडी ते देवू शकलेले नाहीत. जे स्वतःच माफिया आहेत, भ्रष्टाचारी आहेत त्यांनी दुसर्या टोळीकडे अंगुलीनिर्देश करायचे म्हणजे स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्यांचे पाहायचे वाकून असा कारभार आहे. पण हे तरी किती दिवस चालणार. आता ते स्वतःच नागडेबाबांसारखे रामबाग आणि इतर जमिन घोटाळ्यामुळे नागडे झाले आहेत.







