घ्या समजून राजे हो…
बाळासाहेबांची शिवसेना आता शिल्लक राहिली नाही…
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
गेले दोन दिवस शिल्लक शिवसेना म्हणजेच उभाठा शिवसेनेत जी काही चालू आहे ते बघता बाळासाहेबांची शिवसेना आता शिल्लक राहिली नाही या म्हणण्यावर सहज शिक्कामोर्तब होते आहे.
झाले असे की उद्धवपंत ठाकरे यांचे हीज मास्टर्स व्हॉइस म्हणजेच शिवसेनेचे वैश्विक प्रवक्ते संजय राऊत यांनी घोषणा केली की आमची शिवसेना महाआघाडीतील पक्ष असला तरी लोकसभेत महाराष्ट्रात आम्ही ४८ पैकी २३ जागा लढणारच. याची कारणमिमांसाही त्यांनी दिली २०१९ मध्ये म्हणे भारतीय जनता पक्षाशी युती असताना शिवसेनेने ४८ पैकी २३ जागा लढवल्या होत्या. त्यातील १८ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. त्यामुळे आम्ही यावेळीही गेल्या वेळी लढलो त्या २३ जागांवर लढणार आणि विजयी देखील होणार असा दावा राणा भीमदेवी थाटात संजय राऊत यांनी करून टाकला.
संजय राऊत यांनी हा दावा करताच सध्या काँग्रेसवासी असलेले माजी पत्रकार शिवसैनिक संजय निरुपम हे देखील मैदानात उतरले. संजय निरुपम हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत मुंबईतील सहा जागांपैकी एका जागेवर संजय निरुपम लढले होते आणि निवडूनही आले होते. त्यामुळे ती जागा तर काँग्रेस लढणारच आणि २३ जागांचा दावा आम्हाला मान्य नाही अशा आशयाचे विधान करून निरुपम यांनी खळबळ उडवून दिली.
निरुपम यांच्या या दाव्यानंतर सध्या संजय विरुद्ध संजय अशी लढाई सुरू झालेली दिसते आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळणार की काय असे दिसताच शिल्लक शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे मैदानात उतरले. त्यांनी सांगितले की आम्हाला हव्या त्या जागांसाठी आम्ही महाआघाडी तोडण्याचे पाप करणार नाही. (जसे महायुती तोडण्याचे पाप केले तसे) म्हणजेच ज्या जागा आमच्या वाट्याला येतील तेवढ्याच आम्ही लढवू. त्यासाठी महाआघाडीतील नेत्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवू.
ज्यावेळी संजय विरुद्ध संजय हा वाद चालू होता, त्यावेळी वैश्विक प्रवक्ते संजय राऊत सांगत होते की जागा वाटपाचा प्रश्न दिल्लीत सोडवला जाईल. आताही उद्धवपंत ठाकरे म्हणत आहेत की आम्ही सर्वांशी चर्चा करून प्रश्न सोडवणार. आता महाआघाडीतील घटकपक्ष बघितले तर काँग्रेस शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिल्लक शिवसेना यांच्यात बैठक होऊन महाआघाडीचा निर्णय होणार. महाराष्ट्रात महाआघाडीचे नेतृत्व आजही शरद पवारांकडे आहे. त्यामुळे चर्चेसाठी बैठकी सिल्वर ओकला होणार हे ओघानेच आले. इथे चर्चा करून जागावाटप ठरलेही तरी त्यावर काँग्रेस हायकमांडचे शिक्कामोर्तब लागेलच. म्हणजे सोनिया राहुल आणि खर्गे यांच्या दरबारात प्रकरण जाणार. शेवटी ही चर्चा दिल्लीला जाऊनच करावी लागेल हे स्पष्ट दिसते आहे. त्यातही या जागा वाटपात संजय राऊत म्हणतात तशात २३ जागा मिळतीलच याची कोणतीही खात्री नाही. जर शिल्लक शिवसेना २३ जागांवर अडली तर आघाडी तुटणार हे निश्चित आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आघाडी तुटू देणार नाही असे उद्धवपंत छातीठोकपणे सांगत आहेत. याचाच अर्थ कोणत्याही प्रकारची तडजोड करून जे काही पदरी पडेल ते पवित्र करून घ्यायचे असे उद्धवपंतांनी ठरवले आहे हे स्पष्ट होते आहे.
मग प्रश्न असा येतो की वैश्विक प्रवक्ते संजयराव राऊत हे २३ जागांसाठी दंड का का थोपटत होते? जर उद्धवपंत कोणतीही तडजोड करायला तयार आहेत तर संजय राऊत यांनी असे दंड थोपटण्याचे काहीच कारण नव्हते. म्हणजे संजय राऊत यांनी उद्धव पंतांना न विचारताच दंड थोपटून सांगून टाकले असा अर्थ काढता येतो. संजय राऊत आजकाल न विचारताच मनाला येईल ते माध्यमांसमोर बोलायचं असाच प्रकार करत आहेत हा निष्कर्ष यातून काढता येतो.
अर्थात या प्रकरणात आणखीही एक आयाम आहे. कदाचित उद्धव पंतांनीच संजय राऊत यांना २३ जागांची घोषणा करायला सांगितले असावे. मात्र प्रकरण अंगलट येते आहे असे बघताच उद्धवपंत हात वर करून मोकळे झाले. त्यातून संजय राऊत यांना त्यांनी चक्क तोंडघशी पाडले आहे. आता या दोन निष्कर्षांपैकी खरे काय आणि खोटे काय हे उद्धवपंत आणि संजयराव हे दोघेच सांगू शकणार. त्यांनी कधीतरी हे महाराष्ट्राला खरे काय ते सांगावे इतकीच अपेक्षा आहे.
यावेळी शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होते. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत अनेकदा अशा वेगवेगळ्या युत्या आणि आघाड्या केल्याव. मात्र तिथे त्यांचा शब्द अंतिम असायचा. तडजोड करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. मला आठवते शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची दीर्घकाळ युती होती. त्या युतीत बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम असायचा. जागा वाटपात बाळासाहेब सांगायचे तेवढ्या जागा शिवसेना घ्यायचीच. तिथे कोणतीही तडजोड नसायची.
मग काही जागा अदलाबदल करायच्या असतील किंवा वाढवून हव्या असतील तर मग भाजपचे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे दोघेही बाळासाहेबांच्या नाक दू-या काढायला जायचे. त्यांना प्रेमाने समजावून थोडाफार फायदा आपल्या पदरात हे दोघे मेहुणे पाडून घ्यायचे.
विशेष म्हणजे या सर्व चर्चा करण्यासाठी मुंडे आणि महाजन हे स्वतः मातोश्रीवर जायचे. बाळासाहेब किंवा त्यांच्या वतीने शिवसेनेचा कोणीही प्रतिनिधी कधीच महाजनांच्या फ्लॅटवर किंवा भाजपच्या प्रदेश कार्यालयात जातांना दिसला नाही.हा बाळासाहेब यांचा दरारा होता. फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांच्या बाबतीतही हीच परिस्थिती होती. प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली. त्या राष्ट्रपतीपदी जाणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत आणि पहिल्या महिला आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देण्याचा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्णय घेतला. त्यावेळी देखील सर्व चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मातोश्रीवर जात होते. कोणीही असो आणि कितीही मोठा असो बाळासाहेब त्याच्याकडे चर्चेला गेले नव्हते.
बाळासाहेबांच्या निधनानंतर मात्र परिस्थिती बदललेली आहे. बाळासाहेब २०१२ मध्ये निवर्तले. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुका आल्या. पाठोपाठ विधानसभेच्याही निवडणुका आल्या. यावेळी भारतीय जनता पक्षासोबतची युती भाजपनेच तोडली. परिणामी शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले. नंतर भाजप सत्तेत आल्यावर शिवसेना देखील नव्याने युती करून सत्तेत सहभागी झाली. मात्र यावेळी भाजपचे कोणीही मोठे नेते मातोश्रीवर चर्चेसाठी गेले नव्हते. शिवसेनेचेच नेते फडणवीसांकडे चकरा मारत होते.
हाच प्रकार २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळेसही झाला. परिणामी त्यावेळी देखील शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नव्हती. परिणामी महापालिकेची सत्ता टिकवता टिकवता उद्धवपंतांच्या तोंडाला फेस आला होता. त्यावेळी जर भाजपने विनाअट पाठिंबा दिला नसता तर शिवसेनेचे काही खरे नव्हते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी मात्र देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे दोघेही मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी झालेल्या तडजोडीनुसारच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकानंतर उद्धव पंतांनी लगेचच यु टर्न घेतला आणि भाजपशी असलेली युती तोडली. त्यानंतर सत्तेसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा दोन पक्षांशी आघाडी केली होती. महाआघाडी या नावाने हे सरकार स्थापन झाले होते. मात्र त्यासाठी संजय राऊत हे उद्धवपंतांच्या वतीने शरद पवारांकडे सिल्वर ओक वर चकरा मारत होते. उद्धवपंत सुद्धा स्वतः शरद पवारांशी चर्चा करायला सिल्वर ओकला जाऊन आले अशी माहिती मिळाली. नंतर काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेचे आदित्य ठाकरेंसह काही नेते दिल्लीत सोनिया दरबारी देखील गेले होते. नंतर जोवर महाआघाडी सरकार अस्तित्वात होते, तोवर सोनिया दरबारी चकरा सुरूच होत्या. सोबतीला संजयराव राऊत हे सिल्वर ओक वर पाणी भरण्यात आनंद मानत होते. हे बघता इतकी वर्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःची जी प्रतिष्ठा जपली होती ती प्रतिष्ठा उद्धवपंत आणि संजय राऊत या दोघांनी मिळून पार धुळीला मिळवली हे स्पष्ट होते.
आताही महाआघाडी झाली. मात्र त्यासाठी शरद पवारांकडेच शिवसेनेच्या नेत्यांना पाणी भरावे लागते आहे. वस्तुतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आज सारखेच खिळखिळे झाले आहेत. मात्र असे असले तरी पवारांचे जे राजकीय वजन आहे ते लक्षात घेत उद्धवपंतांनाच सिल्वर ओक वर जावे लागते आहे.
आणि आता तर महाआघाडी टिकवण्यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधी ज्या काही जागांचे तुकडे समोर फेकतील ते घेऊन आघाडी टिकवायची या निष्कर्षावर उद्धवपंत आलेले दिसतात. सहाजिकच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा साथ मिळाला तर थोड्याफार काही जागा शिवसेनेला निवडून आणता येतील. अन्यथा २०१९ मध्ये १८ खासदार निवडून आले होते. त्यातले पाचच सध्या शिल्लक आहेत. ज्या पाच जागा १९मध्ये गमावल्या त्यातीलही आनंद अडसूळ सारखे काही लोक एकनाथ शिंदेंच्या तंबूत पोहोचले आहेत. हे बघता स्वबळावर जर उद्धवपंत लढले तर दोन-तीन जागा तरी मिळतील किंवा नाही अशी शंका घेण्यास निश्चित वाव आहे. त्यामुळे महाआघाडीचे गठन करायचे, जमल्यास इंडिया आघाडीतही जायचे, आणि जे काही पदरी पडेल ते पवित्र करून घ्यायचे असाच उद्धव पंतांचा डाव दिसतो आहे. विशेष म्हणजे या चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी हे मातोश्रीवर येणार नाहीत, तर उद्धव पंतांनाच दिल्लीच्या चकरा माराव्या लागणार आहेत.
हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर आता बाळासाहेबांची ठाम निर्णयावर चालणारी शिवसेना शिल्लक राहिलेली नाही हे स्पष्ट दिसते आहे. आता कसेही करून सत्ता मिळवायची आहे आणि त्यासाठी कशीही आणि कितीही लाचारी पत्करावी लागली आणि कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरी करायच्या या निष्कर्षावर उद्धवपंत आलेले दिसत आहेत.
त्यासाठी बाळासाहेबांच्या वैचारिक निष्ठाही त्यांनी गुंडाळून ठेवल्या आहेत.ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आयुष्यभर शिव्या घातल्या, ज्या शरद पवारांना बारामतीचा ममद्या आणि मैद्याचं पोतं अशा शब्दात बाळासाहेबांनी हिणवलं त्याच पवारांकडे पाणी भरण्याची वेळ उद्धवपंतांवर आली आणि ज्या भाजपसोबत मैत्री करून शिवसेनेने राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभाग मिळवला त्याच भाजपला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत अभद्र युती करायची इथपर्यंत उद्धवपंत ठाकरे आणि त्यांचे सहकारी येऊन पोहोचलेले आहेत.
सत्तेसाठी काहीही असे म्हणत उद्धव पंतांनी या तडजोडी केल्या आणि भविष्यातही तडजोडी करण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे. याचाच अर्थ हे सर्व काही त्यांना मान्य आहे. त्यांना मान्य असेलही, मात्र शिवसेनेच्या मतदारांना हे मान्य आहे का याचा विचार त्यांनी करायला हवा. असा विचार करून ते पुढे गेले तरच भविष्यात बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना उभी राहू शकते. अन्यथा अशा तडजोडी करून शिवसेनेचे काही फारसे भले होईल असे वाटत नाही.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे…,? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो…!





