रक्षाबंधनातून जपला माण-खटावच्या बंधांचा स्नेह; सौ. सोनिया गोरे यांनी बांधल्या बांधवांना राख्या
दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक नाते अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधनाचा सण बोराटवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या सुविद्य पत्नी तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी बोराटवाडी येथील निवासस्थानी उपस्थित बांधवांना राखी बांधून औक्षण केले.
“माण-खटाव हा केवळ मतदारसंघ नसून माझा परिवार आहे. या परिवारातील असंख्य भाऊ मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर प्रेम आणि विश्वास ठेवून सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतात. या नात्यातील आपुलकी आणि विश्वास हीच आमची खरी ताकद आहे,” अशी भावना सौ. सोनिया गोरे यांनी यावेळी व्यक्त केली.रक्षाबंधनाच्या निमित्ताने उपस्थित बांधवांच्या मनगटावर राखी बांधताना त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधला.
या वेळी परिसरातील बांधवांनीही सौ. सोनिया गोरे यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व जनसेवेच्या कार्याला पाठिंबा व्यक्त केला. “राखीचा धागा हा केवळ एक धागा नसून तो प्रेम, विश्वास, संरक्षण आणि आपुलकीचे प्रतीक आहे. मतदारसंघातील माझ्या या सर्व भावंडांनी दिलेले प्रेम आणि विश्वास ही माझी मोठी ताकद आहे. या प्रेमाची परतफेड जनसेवेच्या माध्यमातून करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असे सौ. सोनिया गोरे यांनी सांगितले.
माण-खटावच्या विकासाच्या वाटचालीत जनतेचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असून, भाऊ-बहिणीच्या या स्नेहबंधातून निर्माण झालेली आपुलकीची नाती आगामी काळातही अधिक दृढ होत राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमामुळे मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी स्नेह, आपुलकी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या रक्षाबंधन स्नेह मिलन कार्यक्रमास मतदारसंघातील पदाधिकारी, मान्यवर लोकप्रतिनिधी, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






