2021 चा सातारा भूषण पुरस्कार चेतना सिन्हा यांना जाहीर.
सातारा येथील रा .ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांतर्फे दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2021 गेली अनेक वर्षे स्त्री सबलीकरणासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि माणदेशी महिला सहकारी बँक व माणदेशी फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ .चेतना सिन्हा यांना जाहीर करण्यात आला आहे .
मुंबईतील गाला कुटुंबात जन्मलेल्या चेतना कॉलेज शिक्षण घेत असतानाच लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आणीबाणी विरोधी आंदोलनात सक्रिय सहभागी झालेल्या त्या आंदोलनाच्या यशस्वी त्यानंतर ग्रामीण भागात कायमस्वरूपी काम उभे राहिले पाहिजे यासाठी कार्यरत असणाऱ्या गटात त्यांच्या सहभाग होता मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ शेतकरी संघटनेची आंदोलने यातूनच त्यांचा परिचय म्हसवडच्या विजय गुरव यांच्याशी झाला विजय चे विजय कुमार आणि गुरव चेसिन्हा असे माध्यमांनी नामकरण केले आणि त्यांची सहधर्मचारिणी म्हणून चेतना गाला-सिन्हा म्हसवडला आल्या .
तेथील महिलांना सक्षम करण्यासाठी बँक स्थापनेचा विचार करून त्यांनी तसा प्रयत्न सुरू केला. अनेक अडचणींवर मात करून महिलांना संघटित करून शेवटी 1997 ला माणदेशी महिला बँक स्थापन झाली. डेली बँकिंग, डोअर स्टेप बँकिंग ,शेळ्या,मेंढी, खरेदीसाठी कर्ज अशा नवनवीन संकल्पना आणि ही बँक ग्रामीण महिलांची आज आधार बनली आहे. माणदेशी चेंबर ऑफ कॉमर्स ,माणदेशी फाउंडेशन, व्यसनमुक्ती उद्योगिनी प्रशिक्षण असे नवनवीन उपक्रम राबवत यांनी अक्षरशः हजारो माणदेशी महिलांना सक्षम केले आहे . कुटुंबे संपन्न व समृद्ध केली आहेत .कम्युनिटी रेडिओ असेही नवनवीन उपक्रम यशस्वी केले आहेत .त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय व जागतिक पातळीवरती घेतली गेली आहे .2018 मधील दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये त्या एकाच सभेच्या अध्यक्ष होत्या व तसाच बहुमान त्यांनी अर्जंटीना मधील डब्ल्यू ट्वेंटी संमेलनातही प्राप्त केला होता.
भारत सरकारच्या नारीशक्ती सन्मान या सर्वोत्तम स्त्रीसन्मानाने त्यांना माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले आहे .त्यांचा हा सेवाभावी प्रवास सर्वांना प्रेरक ठरणार आहे.
1991 पासून प्रतिवर्षी अर्थ ,कला ,विज्ञान ,साहित्य, अध्यात्म, सामाजिक कार्य अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्र अगर त्या कार्यक्षेत्रात राहून कार्य करणाऱ्या व्यक्तीस सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते .पुरस्काराचे हे 31 वे वर्ष असून यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. शिवाजीराव भोसले, ह .भ .प .बाबा महाराज सातारकर ,शाहीर साबळे, निळकंठराव कल्याणी ,डॉ.रणजीत जगताप, डॉ .नरेंद्र दाभोळकर, धावपटू ललिता बाबर, गिरीश कुबेर, ह.भ.प. चारुदत्त बुवा आफळे आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर ,सूजित शेख आणि ट्रस्टचे विश्वस्त अशोक ,अच्युत, उदयं, प्रद्युम्न ,डॉ.चैतन्य गोडबोले यांच्या समितीने ही निवड केली आहे. रुपये 30 हजार व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून दिवाळीनंतर तो समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल ,अशी माहिती गोडबोले ट्रस्टचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कर सल्लागार चित्रपट निर्माते साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते अरुण गोडबोले यांनी दिली आहे.