पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!
ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम
केसरी वृत्तसेवा, आटपाडी
ई-पीक पाहणी करण्याचे अधिकार असलेल्या संबंधित यंत्रणेकडूनच शेतकऱ्यांना वेळेत सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पीक पाहणीच्या नोंदी वेळेत न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पीकविमा, अनुदान आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. वारंवार कार्यालयात फेऱ्या मारूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने ई-पीक पाहणी अनिवार्य केली असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही वेळेत जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. पीक पाहणीतील विलंबाचा फटका मात्र थेट शेतकऱ्यांनाच बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन प्रलंबित ई-पीक पाहणी पूर्ण करावी, जबाबदार अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात आणि शेतकऱ्यांना वेळेत न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.





