*घ्या समजून राजेहो…**भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर करण्यासाठी उद्धोपंतांनी मथुरा आणि काशीचा प्रश्न हाती घ्यावा*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव पंथ ठाकरे हे सध्या आपले अस्तित्व दाखवण्यासाठी संधी शोधत असतात. तशी संधी त्यांना आधी अयोध्येतल्या राम मंदिरातील कथित घोटाळ्यामुळे मिळाली. त्या पाठोपाठ दिल्लीत नीट परीक्षेतील घोटाळ्यात प्रकरणी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यावरून मिळाली.
या दोन्ही संधींचा फायदा कसा करून घेता येईल हाच त्यांचा प्रयत्न चालू आहे. नीट परीक्षेत झालेल्या पेपरफुटीमुळे देशात प्रचंड खळबळ उडाली होती. ती संधी साधत नव्यानेच समाज माध्यमावर जन्माला आलेल्या कॉकरोच जनता पार्टीने देशव्यापी आंदोलन छेडले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ही कॉक्रोच जनता पार्टी मागणी करत होती. त्यातच ईशान्यतले नेते सोनम वांगचुक हे या आंदोलनाच्या समर्थनात उतरले आणि त्यांनी दिल्लीत जंतर-मंतरवर उपोषण सुरू केले. त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळायला देखील सुरुवात झाली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धवपंतांनी मुंबईत शिवाजी पार्कवर एक तरुणांची सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी आम्हाला फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको, तर आम्हाला आता नरेंद्र मोदींचे सरकारच हाकलायचे आहे.
त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार अशी राणा भीमदेवी घोषणाही त्यांनी करून टाकली.लोकशाहीत कोणालाही कोणतीही घोषणा करता येते. अगदी नागपूरच्या लोखंडी पुलाखाली बसणाऱ्या एखाद्या विकलांग भिकाऱ्याने मी उद्या जाऊन नरेंद्र मोदींचा खून करणारच, अशी घोषणा तिथेच चार भिकाऱ्यांसमोर केली तरी, ती लोकशाही आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष होते. तसेच उद्धवपंतांनी आम्हाला मोदींनाच हाकलायचे आहे अशी घोषणा केली, तर त्याकडेही दुर्लक्ष केले जाऊ शकते. एका काळात भारतीय जनता पक्षाने या देशातून काँग्रेसला हद्दपार करायचे असा चंग बांधला होता. त्यावेळी भाजपचे फक्त दोन खासदार निवडून आले होते. मात्र त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि हळूहळू पक्ष वाढवला. परिणामी १९९८ मध्ये ते मित्रपक्षांशी तडजोड करून सत्ता मिळवू शकले होते. नंतर पुन्हा त्यांनी प्रयत्न जारी ठेवले आणि २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष केंद्रात संपूर्ण बहुमताने विजयी झाला होता. हा इतिहास ताजा आहे. जर दोन खासदार असलेला भारतीय जनता पक्ष केंद्रातील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकून तिथे स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत येऊ शकतो, तर मग तीन खासदार सध्या हाताशी असलेल्या शिल्लक शिवसेनेने आम्हाला मोदींची सत्ता उलथवायची आहे, असा दावा केला तर सकृतदर्शनी त्यात वावगे काहीही वाटत नाही. प्रयत्न केले तर त्यांना अशक्य काहीही नाही असे म्हणता येईल.
अर्थात भारतीय जनता पक्षाची १९८४ ची परिस्थिती आणि शिल्लक शिवसेनेची आजची परिस्थिती यात प्रचंड तफावत आहे. त्यावेळी देखील भारतीय जनता पक्ष हा देशव्यापी पक्ष होता देशभरात प्रत्येक लोकसभा क्षेत्रात त्यांनी आपले उमेदवार उभे केले होते, आणि बऱ्याच मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार किमान दुसऱ्या क्रमांकावर होते, आणि थोड्या फरकाने पराभूत झाले होते. त्यांच्या मागे आधीच्या भारतीय जनसंघाची पुण्याई उभी होती.
शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भक्कम नेटवर्क संपूर्ण देशभरात त्यांना सहकार्य करायला उभे होते. त्याचा फायदा भाजपने वेळोवेळी घेतला. त्याशिवाय भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी जनसामान्यांच्या प्रश्नांवर जनजागृती केली आणि त्यातून ते जनमत आपल्या बाजूला वळवू शकले. १९८७-८८ मध्ये त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उचलला. देशभरात रामशीला पूजन केले. ठीकठिकाणी समविचारी पक्षांना सोबत घेतले. परिणामी २ वरून ८९ वर ते पोहोचले होते. राम मंदिराचा मुद्दा त्यांनी अखेरपर्यंत लावून धरला होता. त्याशिवाय इतरही मुद्दे त्यांनी वेळोवेळी हाताळले. देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा मुद्द्यांवर देखील त्यांनी जनजागरण केले. त्याशिवाय अणु करारावरून निर्माण झालेल्या परिस्थितीतही त्यांनी योग्य तो फायदा उचलला. १९८४ ते २०१४ या ३० वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणीला प्रचंड महत्व दिले होते.
परिणामी प्रत्येक ठिकाणी त्यांनी पक्ष मजबूत केला. त्याचाच फायदा २०१४ मध्ये त्यांना मिळाला होता. त्यात तुलनेत शिवसेनेला आज महाराष्ट्र बाहेर कुठेही अस्तित्व नाही. मधल्या काळात त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन अस्तित्व जमवण्याचा प्रयत्न निश्चित केला. मात्र तिथे त्यांना फारसे यश मिळाले नाही. याचे मूळ कारण असे होते की शिवसेना मराठी माणसासाठी काम करणारी संघटना अशी तिची प्रतिमा तयार झाली होती. ती प्रतिमाच त्यांना बऱ्याच ठिकाणी आडवी येत होती. जरी मराठी माणूस हा मुद्दा बाजूला ठेवून ते हिंदुत्वाकडे वळले, तरी मराठी माणूसपण अधून मधून उफाळून यायचेच. त्यामुळे इतक्या वर्षात शिवसेना महाराष्ट्रा बाहेर कुठेही जाऊ शकलेली नाही.
ज्या संघटनेला एक राज्य वगळता कुठेही स्थान नाही ती स्वबळावर तरी देशाची सत्ता उलथवू शकत नाही हे निश्चित. शिवाय याप्रमाणे भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भक्कम नेटवर्क कायम मदतीला येत होते, तसे कोणतेही नेटवर्क आज शिल्लक शिवसेनेच्या पाठीशी नाही, किंवा शिवसेना तसे नेटवर्क उभी करू शकलेली नाही, हे वास्तव देखील नाकारता येत नाही.अशा स्थितीत देशातील भाजप विरोधी पक्षांची मोट बांधून त्यांच्यासोबत जाऊन शिल्लक शिवसेना मोदींचे सरकार हद्दपार करण्याचा प्रयत्न निश्चित करू शकते. मात्र गेल्या काही वर्षात देशात विरोधी पक्षांच्या ज्या अशा निवडणूकपूर्व आघाड्या झाल्या आहेत, त्यावर देशातील मतदारांचा फारसा विश्वास राहिलेला नाही. त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. याला कारणेही अनेक आहेत देशात जे छोटे छोटे पक्ष आहेत, त्या प्रत्येक पक्षाचा नेता हा आज पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघतो आहे.
त्यामुळे या सर्व मोदी विरोधकांची आघाडी बनली तरी प्रत्येक जण पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिल आणि अशा परिस्थितीत ती सत्ता किती काळ टिकेल हा प्रश्नच आहे. याचा अनुभव देशातील मतदारांनी यापूर्वी घेतलेला आहे. त्यामुळेच मतदार अशा आघाड्यांना प्राधान्य देत नाहीत. आजच्या परिस्थितीत जी २०२४ मध्ये विरोधकांची इंडी आघाडी बनली होती, त्यात अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि महाराष्ट्रात शरद पवार शिवाय स्वतः उद्धवपंत ठाकरे हे सर्वच पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, हे वास्तव लपून राहिलेले नाही. अशावेळी या प्रत्येकाला जर पंतप्रधान करायचे झाले ,तर दर चार महिन्यांनी पंतप्रधान बदलावे लागतील. अशावेळी जे राजकीय आणि प्रशासनिक अस्थैर्य देशात निर्माण होईल, ते देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारे असेल हे निश्चित. मतदारांना याचा अनुभव आहे.
त्यामुळे मतदार असे आघाडीचे प्रयोग मान्य करणार नाहीत हे उघड आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर तर कुठेच स्थान नाही, पण महाराष्ट्रात तरी त्यांची काय अवस्था आहे याचा विचार त्यांनी केला आहे का? स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे हीज मास्टर व्हॉइस संजय राऊत ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र असे दररोज सकाळी ओरडून सांगत असले, तरी महाराष्ट्र ठाकरेंच्या किती मागे आहे हे नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिले आहे. आज विधानसभेत तर त्यांची दयनीय अवस्था आहेच, पण या मुंबई महापालिकेच्या जोरावर त्यांची सत्तेसाठीची अर्थव्यवस्था चालत होती, ती मुंबई महापालिका देखील त्यांच्या हातून गेली आहे. हे बघता ज्यांना आज देशात तर सोडा पण महाराष्ट्रात देखील स्थान नाही, ते भाजपची सत्ता कशी उलथवणार हा देखील प्रश्नच आहे. भारतीय जनता पक्षाने राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन देशभरातील हिंदू मतदार एकत्र केला होता.
त्यायोगे आपली संख्या त्यांनी २ वरून ३०२ वर नेली होती. असाच एखादा प्रयोग जर उद्धवपंतांच्या शिल्लक शिवसेनेला करता आला, तरच त्यांना भविष्यात काही करणे शक्य होऊ शकते. सध्या अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित चोरी प्रकरणात त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन उभे केले आहे. नुकतेच नागपुरात येऊन ते आंदोलन करून गेले. त्यानंतर त्यांना जर हिंदुत्वाची खरोखरी इतकी चाड असेल तर त्यांनी अयोध्यातील राम मंदिराशिवाय आता मथुरा आणि काशी इथल्या मंदिरांचे प्रश्न हातात घ्यावे असा सल्ला जनसामान्यांकडून दिला जातो आहे. ज्याप्रमाणे मोगल आक्रमकांनी अयोध्येतील राम मंदिर पाडले, त्याचप्रमाणे मथुरा येथील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर तसेच काशी येथील महादेवाचे मंदिर यालाही मुघलांनी क्षती पोहोचवली आहेच. तिथे मंदिर परिसरातच मशिदी उभ्या केल्या गेल्या आहेत. काशीतील ज्ञानवापी मंदिराबाबत न्यायालयात वाद देखील सुरू आहे. त्यामुळे उद्धवपंतांनी आता मथुरा आणि काशी ही हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू करावे.
त्यासाठी त्यांनी देशभर दौरा करून जनमत जागृत करावे. तसे जर केले तर देशातील बहुसंख्य हिंदू त्यांच्या बाजूने उभा राहील. इतकेच काय पण कट्टर भाजपवाले देखील या मुद्द्यावर शिवसेनेसोबत येतील. तसेच हिंदूंची श्रद्धास्थाने पुनुरुज्जीवित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील तुमच्या बाजूने ताकद उभी करेल हे नक्की. अर्थात तुम्हाला या मंडळींचा पाठिंबा हवा असेल तरच. त्यामुळे आता देशात नरेंद्र मोदींचे सरकार उद्धवपंतांना उलथवून टाकायचे असेल तर त्यांनी ताबडतोब मथुरा आणि काशी त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील च्या हिंदूंच्या मंदिरांवर असे परकीय आक्रमणामुळे हल्ले झाले आहेत, आणि ती मंदिरे ध्वस्त झाली आहेत, त्या मंदिरांचे प्रश्न हाती घ्यावे. त्यांना जनमताचा पाठिंबा निश्चित मिळेल आणि देशातून भाजपाला सत्तेच्या बाहेर करण्याचे त्यांचे स्वप्न भविष्यात कदाचित साकार होऊ शकेल हे नक्की. अर्थात कोरोना काळात मातोश्रीवर बसून फेसबुक लाईव्ह करणारे उद्धवपंत आता जनमत जागृत करण्यासाठी देशव्यापी दौरा करतील का हा देखील प्रश्न मनात येतो.
कारण अद्यापही ते अयोध्येतील राममंदिर पूर्ण झाल्यावर दर्शनाला गेलेले नाहीत. तरीही त्यांनी प्रयत्न करावे असा आमचा त्यांना आपुलकीचा सल्ला आहे. वाचकहो पटतय का तुम्हाला हे…..?त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो…या मुद्द्यांवर वाचकांची स्पष्ट आणि परखड मते अपेक्षित आहेत. त्याचे स्वागतच होईल.







