*आठवणींच्या हिंदोळ्यावर…* *किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा* *आजीवन सदस्यांच्या* *निष्कासनाचा*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.गेल्या काही महिन्यांपासून विदर्भातच विदर्भ साहित्य संघ, त्याची निवडणूक, नवीन कार्यकारिणी, , जुन्या भानगडी आणि अर्धवट असलेले संकुल या विषयाची चर्चा साहित्य वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये देखील रंगते आहे.
आता येत्या रविवारीच साहित्य संघाची वार्षिक आमसभा आहे. त्यामुळे तर या चर्चांना जास्तच जोर चढला आहे. विदर्भ साहित्य संघाचे अर्धवट असलेले संकुल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या यावर सध्या जोरात चर्चा सुरू आहे. ती चर्चा काही आजची नाही. या प्रकरणात २००२ साली साहित्य संघाच्या काही आजीवन सदस्यांनी जोरदार आवाज उठवला होता. त्यात अस्मादिक देखील होते. विशेष म्हणजे या प्रकारात सहा आजीवन सदस्यांना कायमचे निष्कासित करण्यात आले होते. त्यातही मी देखील होतो. त्यामुळे आज त्या काळातल्याच आठवणी शेअर करायचे ठरवले आहे.
विदर्भ साहित्य संघाचा मी आजीवन सदस्य १९८३ मध्येच झालो होतो. त्यावेळी विदर्भ साहित्य संघात मी अधून मधून जात देखील असे. तिथल्या अनेक पदाधिकाऱ्यांशी माझे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध होते. १९९२ मध्ये साहित्य संघाची जुनी इमारत पाडून तिथे नवीन भव्य संकुल उभे राहणार ही घोषणा झाली होती. त्यावेळी विकासक शेवाळकर डेव्हलपर्स यांनी त्याचा महत्वाकांक्षी मसुदा देखील जाहीर केला होता. नंतर १९९५ मध्ये ती इमारत पडली गेली आणि संकुलाचे बांधकाम सुरू झाले.संकुलाचे बांधकाम तीन वर्षात पूर्ण होणार असे सांगण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात सात वर्षे झाली तरी कामकाज पूर्ण होण्याचा पत्ता नव्हता. त्यामुळे २००२ च्या जुलै महिन्यात झालेल्या वार्षिक आमसभेत काही सदस्यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केले होते. मला आठवते यापूर्वी साहित्य संघाच्या वार्षिक आमसभेला मी कधीच जात नसे. मात्र त्या दिवशी माझे निकटचे स्नेही दिनकरराव देशपांडे यांचा फोन आल्यामुळे मी देखील त्या आमसभेत गेलो. तिथे डॉ. कुमार शास्त्री डॉ. वि.स. जोग, अनिल शेंडे, चंद्रशेखर उदास ज्ञानेश वाकुडकर प्रभृतींनी या प्रकरणात साहित्य संघाला धारेवर धरायला सुरुवात केली. त्या आमसभेत वातावरण चांगलेच तापले होते.
मात्र साहित्य संघाचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश द्वादशीवार आणि कार्याध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उडवाउडवीची उत्तरे देत होते.नंतर संकुलाच्या प्रकरणात आवाज उठवणारी ही सगळी मंडळी एकत्र जमली आणि या विषयावर आता रान पेटवायचे असे ठरले. त्यानुसार डॉ. कुमार शास्त्री यांनी पत्रकार भवनात एका पत्र परिषदेचे आयोजन केले होते. त्या पत्र परिषदेत मी देखील उपस्थित होतो.
ही पत्र परिषद होताच वातावरण चांगलेच तापले. यात साहित्य संघ कार्यकारिणी उघडी पडण्याची भीती होती, तसेच विकासक आशुतोष शेवाळकर आणि त्याचे वडील साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्राचार्य राम शेवाळकर हे देखील अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे साहित्य संघाने या पाच सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. याच दरम्यान दै. तरुण भारत मध्ये मी एक लेख लिहिला होता. “गेले ते दिन गेले” या शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखात विदर्भ साहित्य संघाच्या आधीच्या धनवटे रंग मंदिराचे वैभव कसे होते आणि आता ते वैभव, तिथल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळी या कशा संपल्या आहेत यावर भाष्य केले होते. त्यामुळे साहित्य संघातील मंडळी अधिकच चिडली आणि त्यांनी माझ्यावर देखील कारवाई करायचे ठरवले.
त्या दरम्यान एक दिवस सकाळी मला विदर्भ साहित्य संघाचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि माझे मित्र डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा फोन आला आणि आज संध्याकाळी आपण धरमपेठ कॉफी हाऊस मध्ये भेटूया असे त्यांनी सुचवले. त्यानुसार त्या दिवशी मी जेव्हा कॉफी हाऊस मध्ये जोशींना भेटलो तेव्हा तिथे त्यांनी माझ्यावर देखील कारवाई करून आजीवन सदस्यत्व रद्द करण्यात येऊ शकते ही माहिती दिली. त्यावर त्यांनी एक पर्याय सुचवला आणि त्यानुसार मी केल्यास माझ्यावरील कारवाई टळू शकेल असेही सांगितले.मात्र मी त्यांना सांगितले की गेल्या १९ वर्षापासून मी साहित्य संघाचा आजीवन सदस्य असलो तरी माझ्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही, आणि मला निष्कासित केले तरी माझ्या आयुष्यात फारसा फरक पडेल असे वाटत नाही.
माझे साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींबाबतचे प्रेम तसेच राहील. त्यामुळे जर साहित्य संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना माझ्यावर कारवाई करायची असेल तर जरूर करू द्या. मी त्यात कोणतीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे डॉ श्रीपाद जोशी देखील निराश झाले. ठरल्यानुसार मला देखील कारणे दाखवा नोटीस मिळाली. मी त्याला उत्तर दिले नाही. मात्र तत्कालीन अध्यक्ष सुरेश द्वादशीवार यांना एक व्यक्तिगत पत्र टाकले होते. अर्थात त्यांनी त्याची दखल घेतली नाही हा भाग वेगळा. त्यामुळे मग एका कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होऊन डॉ. कुमार शास्त्री, डॉ. वि.स.जोग, दिनकरराव देशपांडे, योगेश बऱ्हाणपुरे, अनिल शेंडे आणि अविनाश पाठक म्हणजेच अस्मादिक यांची सदस्यता कायमची रद्द करण्यात आली, असा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यात आम्ही न्यायालयात दाद मागू ही भीती असल्यामुळे विदर्भ साहित्य संघातर्फे न्यायालयात कॅविएट देखील दाखल करून ठेवले होते. अर्थात तरीही आम्ही सहा निष्कासित न्यायालयात गेलोच. त्यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ एड. चंद्रशेखर माडखोलकर आम्हाला मदत करत होते.
धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. मग आम्ही उच्च न्यायालयात देखील दाद मागितली होती. त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य संघाच्या घटनेनुसार आम्ही अपील करून आमसभेत ठेवावे अशी ही मागणी केली होती. डिसेंबर २००२ मध्ये झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात मी तत्कालीन काँग्रेस आमदार हुसेन दलवाई यांना सांगून विधान परिषदेत साहित्य संघ प्रकरणात औचित्याचा मुद्दा देखील उपस्थित केला होता. नंतर साहित्य संघाच्या मंडळींनी हुसेन दलवाईंवर त्यांच्या सासऱ्यांकडून दबाव आणून आता त्यांनी पुढे हा मुद्दा उपस्थित करू नये ही व्यवस्था देखील केली होती. हे खुद्द हुसेनभाईंनीच मला सांगितले होते. यावेळी या सहा निष्कासित सदस्यांना सहकार्य करणाऱ्या आजीवन सदस्यांना देखील नोटिसा पाठवून तुमच्यावर देखील कारवाई होऊ शकते हे संकेत देण्यात आले होते. शिवाय या प्रकरणात सहभागी असलेल्या सदस्यांची नोकरीतील पदोन्नती रोखण्यासाठी प्रयत्न झाल्याचे देखील बोलले गेले. इथे काही तरी काळेबेरे असल्यामुळेच हे दबावतंत्र वापरले असावे ही शंका घेण्यास वाव आहे.
याच दरम्यान २००३ च्या जानेवारी महिन्यात आम्ही धरमपेठ शाळेच्या सभागृहात एक सभा देखील घेतली होती. यात डॉ. द.भी. कुळकर्णी, डॉ. यशवंत मनोहर अशा मान्यवरांनी साहित्य संघाच्या विरोधात भाषणे देखील केली होती. ती सभा देखील प्रचंड गाजली होती.त्यानुसार २००३ च्या जुलै महिन्यात झालेल्या आमसभेत ही आमची अपिले ठेवण्यात आली आणि आम्हाला आम सभेत बोलावण्यात देखील आले. यापूर्वी साहित्य संघाच्या आमसभेत कधी ५०-५५ च्या वर सदस्य उपस्थित राहत नव्हते. मात्र यावेळी कार्यकारिणी आणि संबंधितांनी गावोगावी फोन करून जवळजवळ ३०० सदस्य बैठकीला उपस्थित केले होते. ते सदस्य अतिशय आक्रमक देखील होते.
त्या आमसभेत प्रत्येकाला पाच मिनिटे वेळ देण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यावेळी मी, डॉ. जोग, योगेश ब-हाणपुरे आणि दिनकरराव देशपांडे यांनी आपापली पाच मिनिटे डॉ. कुमार शास्त्री यांना देण्याचे ठरवले कुमार शास्त्री यांनी आम सभेसमोर आमची बाजू मांडली. नंतर अनिल शेंडे आपली बाजू मांडायला उभे राहिले असता त्यांच्या पहिल्याच वाक्यावर आमसभेत गदारोळ करण्यात आला आणि त्या गोंधळातच आम सभेने आमचे निष्कासन योग्य असल्याचा ठराव पारित करून घेतला. सर्व घटनाक्रम बघता हे पूर्वनियोजित असावे अशीही शंका त्यावेळी घेतली गेली.त्यानंतर साहित्य संघाचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश द्वादशीवार यांनी पत्र परिषदेत आमसभेने हे निष्कासन मान्य केल्याची घोषणा केली. त्यावेळी उपाध्यक्ष असलेले डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे देखील पत्र परिषदेत उपस्थित होते. त्यांनी देखील साहित्य संघाची बाजू कशी योग्य आहे, तसेच निष्कासित सदस्यांचे कुठे आणि काय चुकले आणि त्यांच्यामुळे आम्हाला कसा त्रास होतो आहे, तसेच यात आमची कशी बदनामी झाली आहे, हे आवर्जून सांगितले होते. आता मात्र साहित्य संघाचे अध्यक्षपद न मिळाल्यामुळे श्रीपाद भालचंद्र जोशी हे या संकुलाच्या विरोधात बोलत आहेत. त्यावेळी मात्र कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी या संकुल निर्मितीला मान्यताही दिली होती हे विशेष.या प्रकारावर मी लगेच “तोंडघशी पडलेले प्रा. सुरेश द्वादशीवार” हा एक लेख ही लिहिला होता.
तो लेख त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. द्वादशीवारांची कर्मभूमी असलेल्या चंद्रपुरातून मला अनेकांचे फोन देखील आले होते. सदर लेख माझ्या दाहक वास्तव या पुस्तकात समाविष्ट केला आहे.या काळात एक पत्रकार म्हणून मी साहित्य संघातील हा संकुलाचा गैरप्रकार या विषयावर विविध वृत्तपत्रांमधून व्यापक लेखन केले होते. २००५ मध्ये मनोहर म्हैसाळकर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष झाले. त्यावर देखील “अवाङ्मयीन व्यक्ती साहित्य संघाची अध्यक्ष कशी होऊ शकते?” म्हणून मी प्रकाशित करत असलेल्या दिवाळी अंकात एक परिसंवाद देखील घेतला होता. त्यात दस्तूर खुद्द मनोहर म्हैसाळकरांना देखील मी सहभागी करून घेतले होते. या परिसंवादासह आणखी एक साहित्यविषयक परिसंवाद जोडून पुढे पुस्तक रूपात प्रकाशन झाले. त्याला सुरेश द्वादशीवार यांचीच प्रस्तावना घेतली होती. या पुस्तकाला नशिबाने महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला होता. साहित्य संघाच्या एकूणच सर्व कारभारावर टीका करणारे म्हणजेच थोडक्यात साहित्य संघाला फटाके लावणारे लेखन त्या काळात मी खूप केले. २००२ ते २०१० पर्यंत मी हे लेखन सातत्याने करीत होतो
. मला आठवते २००७ मध्ये नागपुरात विदर्भ साहित्य संघाच्या यजमानत्वाखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या आयोजनात देखील मी भरपूर फटाके लावले होते. या संमेलनाच्या अयशस्वीतेबद्दल मी लिहिलेला लेख माझ्या दाहक वास्तव या पुस्तकात समाविष्ट देखील आहे. माझ्या या लेखनामुळे नानासाहेब शेवाळकर माझ्यावर बरेच नाराज देखील झाले होते. अर्थात त्यांनी ती नाराजी कधी दाखवली नाही हा त्यांचा मोठेपणा. त्या काळात मी रामटेकच्या गडावरून हा दिवाळी अंक प्रकाशित करत असे. नानासाहेबांनी मला कायम दिवाळी अंकासाठी लेख देऊ केले होते.
माझ्या दाहक वास्तव या पुस्तक प्रकाशन समारंभातही इथे आले होते. २०१० नंतर मी विदर्भ साहित्य संघाच्या मागे लागणे थांबवले. नंतर आपण निष्कासित झालो हा मुद्दा देखील विसरून गेलो होतो. विदर्भ साहित्य संघ हा आपल्या आयुष्यात काही बदल घडवेल अपेक्षेने मी तिथे आजीवन सदस्य कधीच झालो नव्हतो. त्यामुळे त्या निष्कासनामुळे देखील माझ्या आयुष्यात कोणताही फरक पडला नाही. पुढे २००७ मध्ये ज्यावेळी नागपूरच साहित्य संमेलन झाले. त्यावेळी डॉ. वि.स. जोग आणि योगेश बऱ्हाणपुरे यांना साहित्य संघात नव्याने सदस्यता देण्यात आली होती. त्यावेळी मी आणि दिनकरराव देशपांडे यांना देखील नव्याने सदस्यता देण्याचा विचार होता असे मला कळले होते. ख्यातनाम युद्धकथा लेखक विंग कमांडर अशोक मोटे यांनी ती माहिती मला दिली होती. ज्यावेळी ही चर्चा झाली त्यावेळी मोटे तिथे उपस्थित होते आणि अविनाश आणि दिनकररावांचा तुम्ही विचार करणार असाल तर त्या दोघांचाही सदस्यत्वाचा चेक मी आता लगेच देतो असेही त्यांनी सांगितल्याचे ते मला बोलले होते. मात्र त्यावेळी मी आणि दिनकरराव देशपांडे यांनी अशी भूमिका घेतली की आम्हाला सदस्यता द्यायची असेल तर नव्याने देऊ नका. आमचे जुने निष्कासन रद्द केल्याचा ठराव घ्या मग आम्ही साहित्य संघाचे सदस्य होऊ, ही भूमिका अशोक मोटेंना आम्ही कळवली होती. तसेच साहित्य संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांशी देखील मी हा मुद्दा बोललो होतो. त्यामुळे त्यावर पुढे काहीच झाले नाही.आता या घटनेला २३ वर्षे लोटली आहेत.
आधी सांगितल्याप्रमाणे साहित्य संघाचे सदस्यत्व माझ्या आयुष्यात कोणताही बदल घडवणार नव्हते, याची मला कल्पना होती, आणि आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा कधीच महत्त्वाचा मुद्दा नव्हता. आता साहित्य संघात सत्ता बदल झाले आणि जुनेच वाद नव्याने पुढे आले आहेत. संकुलात काहीतरी घोटाळा आहे हे समोर येते आहे. त्यामुळे या प्रकारात आवाज उठवणाऱ्या सहा जणांनी जो मुद्दा मांडला होता तो चुकीचा नव्हता हे निश्चित झाले आहे. आता पुढे काय होते ते बघायचे आहे. मात्र या सर्व प्रकारात आता बदलत्या स्थितीत ज्या काही चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे त्या काळातल्या माझ्या सर्व आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. म्हणून त्या शेअर केल्या आहेत.







