*घ्या समजून राजेहो..**राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे शिवधनुष्य पेलावे…* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.नीट परीक्षेतील पेपर फुटी मुळे झालेले तरुणाईचे आंदोलन, त्यात धर्मेंद्र प्रधानांना द्यावा लागलेला राजीनामा आणि नंतरची परिस्थिती या विषयावर सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची वक्तव्ये सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.
त्यातील एक वक्तव्य संघाचे सह सरकार्यवाह अतुल लिमये यांचे जंतर-मंतर वरील आंदोलनाकडे केवळ तरुणाईचा उद्रेक म्हणून न बघता देशद्रोही कृत्य म्हणून बघावे असे केलेले आवाहन, आणि त्या पाठोपाठ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशातील जेन झी शी संवाद साधणारे कार्यक्रम घेणार असल्याची केलेली घोषणा, या दोन्ही मुद्द्यांवर वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. त्यामुळे आज याच विषयावर ही माझी मते मांडायची असे ठरवले आहे. सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी या आंदोलनाला देशद्रोही कृत्य असे संबोधले आहे. असे मत व्यक्त करणारे ते काही पहिलेच व्यक्ती नाहीत.
त्या आंदोलनात जे काही घडले ते बघून यापूर्वी देखील काही अभ्यासकांनी ते मत उघडपणे व्यक्त केले आहे. तरुणाईचे आंदोलन उभे झाले ते नीट परीक्षेतील पेपर फुट आणि त्यामुळे रद्द झालेली परीक्षा, परिणामी तरुणांच्या भवितव्यावर होणारे बरेवाईट परिणाम या मुद्द्यांवर. हे बघता या आंदोलनात फक्त नीट परीक्षेत झालेले कथित घोटाळे, त्यासाठी परीक्षा पद्धतीत करावयाच्या सुधारणा, आणि एकूणच देशातील शिक्षण पद्धतीत माजलेली बजबजपुरी या विषयावर मते व्यक्त झाली असती आणि घोषणा दिल्या गेल्या असत्या तर ते समजण्याजोगे होते. मात्र या आंदोलनात भारत तेरे टुकडे होंगे, कलम ३७० पुनर्स्थापित करा, या आणि अशाच इतर अवांतर मुद्द्यांनाही हात घातला गेला. दुसरे असे की या आंदोलनात सहभागी झालेली फक्त तरुणाईच होती किंवा त्यातही नीट परीक्षेमुळे पीडित असलेले विद्यार्थीच होते असे नाही, तर बरीच असामाजिक तत्वे तिथे शिरल्याचा आरोप केला गेला. त्याशिवाय या आंदोलनाला ज्या विविध संघटनांनी पाठिंबा दिला त्यांचे वेगळे असलेले लक्ष्य यापूर्वीच स्पष्ट झालेले होते
. हे बघता या देशविरोधी संघटनांना तरुणाईच्या आंदोलनाच्या आडून आपले हिशोब चुकते करून घ्यायचे होते, किंबहुना अशा देश विरोधी शक्तींनीच हे आंदोलन स्पॉन्सर केले होते हे स्पष्ट दिसते. अतुल लिमये यांनी आपल्या भाषणात देशाचे संविधान मान्य झाल्यानंतर केलेल्या भाषणात “ग्रामर ऑफ अनार्की” म्हणजेच अराजकतेचे व्याकरण याचा उल्लेख केला होता. बाबासाहेब हे देखील म्हणाले होते की इंग्रजांचे राज्य होते तेव्हा आंदोलने सत्याग्रह मोर्चे उपोषण हे ठीक होते. मात्र आता आपण संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारलेली आहे. त्यामुळे या लोकशाही पद्धतीत संसद किंवा विधिमंडळात प्रश्न सोडवता येतात येतील. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणे हे चुकीचेच ठरेल. सध्या आपल्या देशात नेमके तेच सुरू आहे. आज संसदेचे अधिवेशन सुरू होऊन तिसरा आठवडा आला आहे.
मात्र या अधिवेशनात विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज काहीही होऊ शकलेले नाही. त्याचवेळी विरोधक रस्त्यावर गोंधळ घालत आहेत. सुरक्षा व्यवस्थेचे लक्ष चुकवून विरोधी पक्ष नेते पंतप्रधानांच्या बंगल्यासमोर जाऊन आंदोलन करायला बसतात आणि तिथे गोंधळ घालतात. हे अराजकतेचे व्याकरण नाही तर काय? ज्यांना संसदीय लोकशाही व्यवस्थेतील प्रचलित पद्धतीनुसार आपले प्रश्न सोडवायचे नाहीत, किंवा प्रश्नच निरर्थक असल्यामुळे केवळ दबाव तंत्र वापरूनच सोडवायचे आहेत, तेच हे अराजकतेचे व्याकरण उपयोगात आणू शकतात. अर्थात हे माझे मत नाही तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनीच व्यक्त केलेले मत आहे.
त्यामुळे याच परिप्रेक्ष्यात अतुल लिमये यांनी मांडलेल्या विचारांकडे सकारात्मक नजरेने बघणे गरजेचे ठरते. नीट परीक्षेतील कथित घोटाळ्यासंदर्भात जंतरमंतरवर झालेले आंदोलन हे जेन झी चे आंदोलन म्हणून ओळखले गेले. या जेन झीने किंवा या आंदोलना आडून तिथे गोंधळ घालणाऱ्यांनी जो काही प्रकार केला तो काही शोभनीय असा नव्हता. विशेषतः पंतप्रधानांच्या दिवंगत आईंबद्दल अश्लील शिवीगाळ करणे हे निंदनीयच होते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विद्यार्थ्यांना माफ करण्याचे धोरण स्वीकारले आहे. ते योग्यच म्हणावे लागेल. त्याच वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सरकारने तरुणांशी संवाद साधायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
त्यानुसार त्यांनीच तरुणांशी संवाद साधण्याचे ठरवले असून या मालिकेतील पहिला कार्यक्रम उद्या ६ ऑगस्टला मुंबईत होत आहे. तिथे १६ ते १९ वर्षे वयोगटातील २००० तरुणांशी डॉ. भागवत संवाद साधणार आहेत. सरसंघचालकांचे हे पाऊल स्तुत्य असेच म्हणावे लागेल. तरुणांशी संवाद साधून त्यांचे मन जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणे हेच सध्या उचित ठरणार आहे. आजचे तरुण हे उद्याचे देशाचे कर्ते करविते राहणार आहेत.
त्यामुळे त्यांचे मत जाणून घेणे आणि त्यांना योग्य दिशादर्शन करणे हे गरजेचेच ठरणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तरुणाईचे मन जाणून घेण्यासाठी असे कार्यक्रम घ्यावे लागणार हे जुन्या पिढीतील संघ स्वयंसेवकांना कुठेतरी खटकणारेच ठरणार आहे. डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, तेव्हा त्यांनी बाल आणि तरुणांना राष्ट्र प्रेमाचे धडे देऊन त्यांची मने संस्कारित करणे हेच मुख्य ध्येय ठेवले होते. “अखंड अविरत या ध्येय्यास्तव घडवू ही जीवने, दिसा दिसाला, क्षणाक्षणाला संस्कारु ही मने” या तत्त्वावर संघाची वाटचाल सुरू झाली होती. त्यानुसार त्या काळात संघात तरुण आणि बाल मोठ्या संख्येत येत होते. त्यावेळी संघात आधी शारीरिक खेळ खेळले जायचे आणि मग थोडा वेळ शांत बसून त्यांना विविध प्रेरक कथा सांगणे किंवा सध्या घडत असलेल्या घटना आणि एकूणच समाजव्यवस्थेवर तरुणांशी चर्चा करणे हे त्या काळात संघात नियमित चालत होते. त्यामुळे देशातील किमान काही वर्ग तरी राष्ट्रीय विचारांनी संस्कारित होत असे. अनेकदा मग हे संस्कारित झालेले तरुण समाजाच्या भिन्न क्षेत्रात जाऊन आपल्या कामाचा ठसा देखील उमटवत असत.
मात्र १९८० नंतरच्या कालखंडात देशातील मध्यमवर्गीय कुटुंबामधला बाल आणि तरुण हा जीव घेण्या करिअरच्या स्पर्धेमध्ये गुंतला. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच वेगवेगळ्या शिकवण्या आणि वेगवेगळे क्लासेस या चक्रात हे सर्वच बाल आणि तरुण अक्षरशः भरडले गेले. परिणामी त्यांना असे काही उपक्रम करणे शक्यच होत नव्हते. १९८० पूर्वीच्या काळात शाळा किंवा कॉलेज आटोपले की मुलांना भरपूर वेळ असायचा. त्यात कुठेतरी उनाडक्या करत फिरण्यापेक्षा संघात गेला तर चांगले संस्कार तरी होतील म्हणून मायबाप मुलांना शाखेत पाठवायचेच. मात्र या जीवघेण्या स्पर्धेमुळे ते प्रकार बंद झाले. परिणामी देशभरात बाल आणि तरुणांच्या संध्याकाळच्या संघ शाखा हळूहळू कमी होत गेल्या आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.
मला आठवते २००० साली संघात खांदेपालट झाला. सरसंघचालक म्हणून रज्जूभय्या यांची कारकीर्द संपून के सुदर्शन हे नवे सरसंघचालक झाले. त्यावेळी त्यांच्या पहिल्या पत्रपरिषदेत मी याबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. तेव्हा उत्तर देताना सुदर्शनजींनी ही वस्तुस्थिती मान्य करत संघ याबाबत आवश्यक ती पावले उचलत आहे असेही सांगितले होते. नंतर संघानेही याबाबतीत विचार करून नवे नवे उपक्रम राबवलेले आहेत. दैनंदिन शाखा कमी झाल्या असल्या तरी साप्ताहिक मिलनाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यातून संघ बालांना आणि तरुणांना आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र ते प्रयत्न अपुरे पडत आहेत असे चित्र दिसते आहे. साप्ताहिक मुलांना मिलनात तरुणाई भलेही येत असेल पण बालवर्ग दुरावतो आहे हे नाकारता येत नाही. हा बालच उद्याचा तरुण आणि परवाचा देशाचा सक्षम नागरिक बनणार आहे. त्यामुळेच पूर्वी समाजात संघ स्वयंसेवक हा एक संस्कारीत व्यक्ती म्हणून बघितला जात असे आणि समाजाच्या विभिन्न क्षेत्रात हे संस्कारित स्वयंसेवक पुरेसे कामही करत असत. त्याचा परिणाम समाजावर दिसून येत असे. आज जेन झी किंवा जेन अल्फा म्हणून ओळखली जाणारी पिढी आहे, ती संघापासून पूर्वीच्या तुलनेत बऱ्यापैकी दूर गेलेली जाणवते आहे.
या पिढीला २०१० पूर्वी या देशात काय परिस्थिती होती, काय काय घडले आणि त्याचे परिणाम काय काय झाले, याचे पुरेसे भानही नाही. देशात मोदी सरकार आले त्यापूर्वी त्यावेळी आजची जेन झी ही १४ ते १७ वर्षांची होती, तर जेन अल्फा ही जेमतेम दोन वर्षांची होती. त्यामुळे भूतकाळाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलेलाच नाही. परिणामी सद्य परिस्थितीत ते कसेही भरकटू शकतात, आणि नेमके आज तेच होते आहे, हे जंतर मंतर च्या घटनेमुळे दिसून आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर आंदोलन संपवून परत जाणारी तरुणाई ही आता आमचे पुढचे टार्गेट नितीन गडकरी आहेत असे सांगत असल्याचे वृत्तवाहिन्यांनी दाखवले. आता या तरुणाईला गडकरींशी काय देणे घेणे? तरीही ते असे बोलतात, याचाच अर्थ हे आंदोलन स्वयंप्रेरित नव्हते तर स्पॉन्सर्ड .होते हे दिसून येते.
याच पार्श्वभूमीवर संस्कारीत तरुणाई घडवणे हे देशासमोरील प्रमुख आव्हान राहणार आहे ते पेलण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेन झी शी संवाद साधण्याचे हे पाऊल उचललेले आहे, हे निश्चितच स्वागतार्ह म्हणावे लागेल. मात्र तेवढ्यानेच होईल असे वाटत नाही. या उपक्रमातून सरसंघचालक आणि संघाचे इतर अधिकारी या देशातील तरुणाई कोणत्या मार्गावर विचार करते आहे त्याचा अंदाज निश्चित घेऊ शकतील. मात्र त्यांना योग्य दिशा दर्शन करणे हे शिवधनुष्य संघाला पेलावे लागेल. तसे झाले तर ही भरकटलेली तरुणाई पुन्हा योग्य मार्गाला लागून राष्ट्र कार्यात सक्रिय होऊ शकेल हे निश्चित. या विषयावर आपली सर्वांची स्पष्ट आणि परखड मते अपेक्षित आहेत. त्याचे स्वागतच होईल. वाचकहो तुम्हाला पटतंय का हे…? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो…







