ग्रामीण भागात कारभारणींच्या योगदानाला हवे बळ
अंग मेहनतीची अवजड कामे करुनही स्वावलंबी नाही
विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल
त-हाडी:- ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील महिला वर्षभर शेतीत राबतात. प्रसंगी अंग मेहनीतीची अवजड कामेही त्या करतात. शेतीबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन बनण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे, बाजार पेठांतील भावांमुळे त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे कमी कालावधीची व कमी खर्चाची पिके घेऊन तंत्रशुद्ध शेती त्यांना करता यावी, म्हणून त्यांच्या योगदानाला बळ देण्याची गरज आहे. खरीप असो की रब्बी हंगाम, शेतीत महिलांचे योगदान किती मोठे असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, किंबहुना मोठे योगदान देऊनही महिला श्रेयापासून दूरच राहत असल्याचे दिसून येते. संकटांशी आणि आव्हानांशी सामना करण्याची उपजत वृत्तीच त्यांना शेतीत काम करण्याचे बळ देत असते. शेतीशिवारात मशागतीसह काडी कचरा वेचणे, निंदणी, कोळपणी, पेरणी, बियाणे तयार करण्यासह उत्पादन येईपर्यंत महिलांचा सहभाग अधिक असतो.
चौकट:-
विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल
देशातील प्रत्येक मालावर किमान विक्रीमूल्य छापलेले असते. मात्र, शेतीमालावर कोणतेही मूल्य नसते. शेतीमालाला चांगले दर मिळण्यासाठी विक्री व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी विदेशी थेट गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देऊन पर्यायी शेतीमाल विक्रीची व्यवस्था उभारण्याची आज नितांत गरज आहे.
चौकट:- सततची नापिकी आणि बँकांच्या कर्जाला कंटाळून घरातील कर्ता पुरूष आज आत्महत्या करत आहेत. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी आणि मुले शेती करत संसाराला सावरत आहेत. परंतु, शासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे त्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सोनल खोंडे महिला शेतकरी







