कापूस विकेना अन् पिसवा पिच्छा सोडेना भाववाढीच्या अपेक्षेने घरात साठवून ठेवलेल्या कापसाने शेतकऱ्यांची उडाली झोप
त-हाडी :- कापसाला यावर्षी भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. कापसावर केलेल्या खचर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यंदा कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिना संपत आला तरी कापूस विकला नाही.आता घरात साठवून ठेवलेल्या कापसामध्ये किडे तयार होत असून या पिसामुळे शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांच्या अंगाला खाज सुटण्याचे प्रमाणवाढले आहे.
ग्रामीण भागात या रुग्णच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.कापसाला जास्त भाव मिळत नसल्याने विकता देखील येत नाही तर दुसरीकडे त्याच्यातील पिसामुळे अंगाला सुटणाऱ्या खाज मुळे कापूस घरात ठेवायलाही आता शेतकरी तयार नसल्याचे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.
कापसाला चांगला भाव येईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेल्या कापसात पिसवा झाला आहे. त्यांच्या चाव्यांनी शेतकऱ्यांची रात्रीची झोप उडावली आहे. पिसवा चावल्याने संपूर्ण शरीरावर लाल फोड येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मागील वर्षी कापसाच्या भावाने दहा हजारांचा उंबरठा ओलांडून प्रति क्विंटल १४ हजार असा उच्चांकही गाठला होता.
यंदा शेतकऱ्यांचा कापूस बाजारपेठेत येण्यास सुरुवात होताच भावात मोठी घसरण झाली आहे. सद्यस्थितीत कापसाला प्रति क्विंटल 6500 ते 6700 पर्यंत भाव मिळत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी एक किंटल पांढऱ्या सोन्याच्या उत्पादनासाठी किमान दहा हजार रुपये खर्च आला. तर सध्या कापसाला प्रति क्विंटल 6500 हजारांपर्यंतच भाव मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार कसे, असा सवाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
सरकारने शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावे, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला. मात्र भावात वाढ होण्याऐवजी भाव कमी होत असल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
भाववाढीच्या प्रतीक्षेत अनेकांनी कापूस घरीच साठवून ठेवला आहे. असे असले तरी उसनवारीची परतफेड करण्यासाठी अनेक शेतकरी सध्या आपल्याकडील कापूस विक्री करीत आहे. एकूणच शिरपूर तालुक्यातील विविध भागांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षा आहे.







