बँकांमध्ये लागल्या ग्राहकांच्या रांगा
केवायसी करा नाहीतर खाते बंद होणार; बँकांतर्फे प्रक्रिया झाली सुरू
सीकेवायसी संदर्भात २०१६ पासून आरबीआयने बँकांना सूचना
त-हाडी : बँक खाते सुरक्षित राहावे, यासाठी बँकांतर्फे ग्राहकांची वेळोवेळी केवायसी केली जाते. बँक खात्याची सुरक्षितता आणखी वाढविण्यासाठी सीकेवायसी (सेंट्रल नो युवर कस्टमर) करणे गरजेचे आहे. ती नसल्यास तुमचे खाते बंद पडणार आहे. त-हाडीसह परिसरात सीकेवायसी करण्यासाठी ग्राहकांच्या बँकांमध्ये रांगा लागल्या आहेत.
आरबीआयच्या सूचनांनुसार, बँकांतर्फे ही प्रक्रिया केली जात आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकेसह खासगी बँकांमध्ये ज्यांनी सीकेवायसी केले नाही. त्यांचे खाते बंद करण्यात येत असल्याची माहिती बँकांतर्फे देण्यात आली आहे.
सीकेवायसी संदर्भात २०१६ पासून आरबीआयने बँकांना सूचना केलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर १ एप्रिल २०१७ पासून बँकांमध्ये जी खाते उघडली त्यांची सीकेवायसी आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर त्या ग्राहकांचा १४ अंकी युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड तयार होतो. याचे काम सरसाई या नोडल कंपनीला देण्यात आले आहे. या संदर्भात ४ जानेवारीला आरबीआयने बँकांना पत्र काढून हे काम पूर्ण करण्याची सूचना केली. त्यानुसार सर्वच बँकांतर्फे ग्राहकांशी संपर्क करून सीकेवायसी करून घ्या, असे फोन करण्यात येत आहेत. खाते उघडल्यानंतर दहा दिवसांच्या आत सीकेवायसी केलेली माहितीही संकेतस्थळावर अपलोड करणे गरजेचे आहे.
सर्वच बँकांमध्ये केवायसीसाठी रांगा
आरबीआयच्या निर्देशामुळे त-हाडीसह परिसरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँका, सार्वजनिक बँकांमध्ये सीकेवायसीची कामे करण्यात येत आहेत. यासाठी एसबीआय बँकेमध्ये मोठी गर्दी होत आहे. सर्वाच्या खात्यासाठी ही केवायसी आवश्यक असल्याने बँकांमध्ये गर्दी होत आहे. काही ठिकाणी कुटुंबचे कुटुंबच येत आहे. एक व्यक्तीच्या सीकेवायासीसाठी २० मिनिटे ते अर्ध्या तासाचा अवधी लागत आहे. यात ज्येष्ठांची मोठी परवड होताना दिसून येत आहे. पेन्शनधारक असलेल्या ग्राहकांना आधी हायात प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी चकरा माराव्या लागल्या. त्यानंतर आता सीकेवायसीसाठी बँकेत यावे लागत आहे.
आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व बँकांमध्ये सध्या सीकेवायसीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये गर्दी होत आहे. आता बँक खात्यावर सरकारी योजनेतील पैसे थेट जमा होत असल्यामुळे ग्राहकांना ही केवायसी करणे सक्त्तीचे आहे. ग्राहकांच्या दृष्टीने ही सुरक्षिततेची व फायद्याची आहे. त्यामुळे थोडा वेळ जाईल, पण सीकेवायसीतून तुम्ही सुरक्षित व्हाल.
भुषण बागुल,
कर सल्लागार शिरपूर







