घ्या समजून राजेहो…;रिनिकी सरमांवर आरोप करताना पवन खेरांनी वास्तवाचे भान ठेवावे….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !
!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.सध्या देशात आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकांचा माहोल अगदी रंगात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी या दोन दिग्गजांपासून सर्व लहान मोठे नेते प्रचाराच्या आगीत तेल ओतत आहेत. त्यामुळे एकूणच वातावरण तापलेले दिसते आहे.
या तापलेल्या वातावरणात काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते पवनखेरा यांनी काल आसाम मध्ये पत्र परिषद घेऊन आसाम मधील विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान सर्मा यांच्यावर दुहेरी नागरिकत्वाचा आरोप केला आहे. रिनीकी सर्मा यांच्याजवळ तीन देशांचे पासपोर्ट असून भारताबाहेर इतर देशात देखील त्यांची स्थावर मालमत्ता आहे, असा आरोप करत दुसऱ्या देशात स्थावर मालमत्ता करायची असेल तर तिथे तिथले नागरिकत्व असणे गरजेचे असते याकडे खेरांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळेच रिनिकी सर्मा यांचे भारताव्यतिरिक्त इतर देशातही नागरिकत्व आहे आणि ते नागरिकत्व कायद्याचा भंग करणारे असल्यामुळे त्यांच्यावर आणि पर्यायाने हिमंता सर्मा यांच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे. पवन खेरा यांच्या या आरोपालासर्मा पती-पत्नी लगेचच उत्तरही दिले असून या आरोपांचा इन्कार केला आहे. तसेच पवन खेरा यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा देखील दिला आहे.
जर पवन खेरा यांनी केलेला आरोप खरा असेल तर दुहेरी नागरिकत्व असणे हा गुन्हा ठरतो. मात्र माझ्या माहितीनुसार दुहेरी नागरिकत्व असताना तुम्हाला कोणतेही संवैधानिक पद स्वीकारता येत नाही. जर तसे पद तुम्ही स्वीकारले तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. इथे रिनिकी सर्मा यांनी निवडणूक लढवलेली नाही किंवा त्या सध्या तरी कोणतेही संवैधानिक पद स्वीकारणार असल्याची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने पवन खेरा यांनी बोंबाबोंब करणे आणि कारवाईची मागणी करणे हा प्रकार “आग रामेश्वरी.. बंब सोमेश्वरी” असाच म्हणावा लागेल. जर त्या निवडणुकीला उभ्या राहणार असत्या, किंवा त्यांना सरकारने कोणत्या संवैधानिक पदावर नेमले असते, तर हा प्रश्न निश्चित निर्माण झाला असता. मात्र सध्या तरी ती शक्यता नाही. इथे पवन खेरा आणि सर्वच काँग्रेसजन एक बाब विसरत आहेत,
किंवा मग ते त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष तरी करीत आहेत, असे वाटते. आज पवन खेरा ज्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, त्या पक्षाच्या एका काळच्या पक्षाध्यक्ष आणि १९९८ पासून संसद सदस्य या पदावर असलेल्या, त्यातही १९९८ ते २००४ या काळात लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून सक्रिय असलेल्या सोनिया गांधी यांचे देखील दुहेरी नागरिकत्व असल्याची माहिती आहे. सोनिया गांधी १९६८ मध्ये राजीव गांधींशी विवाहबद्ध झाल्या, आणि त्या भारतात आल्या. मात्र १९८१ पर्यंत त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले नव्हते, अशी माहिती आहे. तोपर्यंत तरी त्या इटलीच्याच नागरिक होत्या. याच कालखंडात त्यांनी इटलीत एक बेट खरेदी करून तिथे आपल्या नावावर स्थावर मालमत्ता देखील निर्माण केली होती.
माझ्या माहितीप्रमाणे अजूनही ती मालमत्ता तिथे सोनिया गांधींच्याच मालकीची असावी. १९८० मध्ये ज्यावेळी संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी राजीव सोनिया दांपत्याचा भारत सोडून इटलीला जाण्याचा इरादा होता मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळे राजीव गांधी राजकारणात आले आणि १९८१ मध्ये ते संजय गांधी यांच्या रिक्त जागी अमेठी लोकसभा मतदारसंघातून संसद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर ते हळूहळू राजकारणात सक्रिय होऊ लागले होते. म्हणून मग अडचणीचे जाऊ नये याकरिता सोनिया गांधींनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले. मात्र त्याचवेळी त्यांनी इटलीचे नागरिकत्व देखील कायम ठेवले होते अशी माहिती आहे. याचाच अर्थ भारत किंवा इटली या दोन पैकी एका देशाचे नागरिकत्व ही दुय्यम नागरिकत्व ठरते. तरीही त्या भारतातच राहत होत्या. पाच वर्ष त्या पंतप्रधान पत्नी म्हणून मिरवल्या. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काही वर्ष त्या राजकारणाबाहेर होत्या.
नंतर १९९८ मध्ये त्या राजकारणात सक्रिय झाल्या. तेव्हापासूनच त्यांच्या पक्षाने त्यांना पंतप्रधान पदाच्या भावी उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करणे सुरू केले होते. त्यामुळेच १९९९ मध्ये लोकसभेच्या झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या वेळी काँग्रेस परदेशी जन्माच्या व्यक्तीला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पुढे करते आहे, हे कारण देत शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. अर्थात पुढे जाऊन त्यांनी सत्तेसाठी काँग्रेसच्या गळ्यात हात टाकला हा भाग वेगळा. देशात १९९८ ते २००४ या कालखंडात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत होते. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी या सरकारचे पंतप्रधान होते.२००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सहित इतर विरोधी पक्षांनी एकत्र येत संयुक्त पुरोगामी आघाडीची स्थापना केली आणि निवडणुका लढवल्या. त्यात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीने आपल्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून सोनिया गांधींनाच प्रोजेक्ट केले होते.
संयुक्त पुरोगामी आघाडीला बहुमत मिळाल्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि सोनिया गांधी पंतप्रधान होणार हे जवळजवळ निश्चित झाले होते. मात्र त्याचवेळी भाजपाचे एक संसद सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे केला होता. अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीने त्याला दाद दिली नव्हती. ठरल्याप्रमाणे सोनिया गांधी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी गेल्या. मात्र राष्ट्रपतींना भेटून बाहेर आल्यावर त्यांनी पत्रकारांना सांगितले की माझा अंतरात्म्याचा आवाज मला सांगतो आहे की मी या देशाचे पंतप्रधान होऊ नये. त्यामुळे मी पंतप्रधान होणार नाही. मात्र काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान होईल आणि थोड्याच वेळात नव्या पंतप्रधानाचे नाव जाहीर होईल
. त्याप्रमाणे माझ्या आठवणीनुसार दुसऱ्याच दिवशी काँग्रेस पक्षाने राज्यसभा सदस्य डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधानपदासाठी नाव जाहीर केले आणि त्यांचे मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले होते. सोनिया गांधींनी जरी अंतरात्म्याचा आवाज पुढे केला असला, तरी आतली कथा काही वेगळीच होती असे त्या काळात बोलले गेले होते. सोनियाजी जेव्हा राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा घेऊन गेल्या, तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांचे संविधानातील अनुच्छेद १०२ कडे लक्ष वेधले. अनुच्छेद १०२ अन्वये कोणतीही व्यक्ती संवैधानिक पदावर विराजमान होण्यासाठी काही अटी घातल्या आहेत, त्यातील एका अटीनुसार त्या व्यक्तीने दुहेरी नागरिकत्व घेतलेले नसावे, असे नमूद आहे. राष्ट्रपतींनी याकडेच लक्ष वेधत तुमचे दुहेरी नागरिकत्व असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी लक्षात आणून दिले आहे ही बाब सोनिया गांधींना विशद केली. घटनेच्या १०२ कलमान्वये जर अशा संवैधानिक पदावरील नियुक्ती किंवा सदस्यत्वाबाबत जर कोणी आक्षेप घेतला तर राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो असे संविधानाच्या अनुच्छेद १०३ मध्ये म्हटले आहे, त्यानुसार आक्षेप हा येईलच आणि तसा आक्षेप आल्यास मला तुमचे सदस्यत्व रद्द ठरवावे लागेल हे देखील डॉ. कलाम यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ज्या दिवसापासून तुम्ही असे सदस्यत्व किंवा नियुक्ती ग्रहण केली आहे, त्या दिवसापासून तर राष्ट्रपतींचा निर्णय होईपर्यंत दररोज रुपये पाचशे प्रमाणे दंडही आकारला जाऊ शकेल याकडे देखील डॉ. कलाम यांनी लक्ष वेधले. राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाची अनुच्छेद १०२,१०३ आणि १०४ हे वाचून दाखवल्यावर मगच सोनियाजींना अंतरात्म्याचा आवाज ऐकु आला असावा अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती.
यातील सत्यासत्यता ही तपासण्यासाठी आज डॉ. कलाम हयात नाहीत. मात्र सोनिया गांधींचे दुहेरी नागरिकत्व आजही आहे आणि आजही त्या इटलीच्या नागरिक आहेत, ही बाब नाकारता येत नाही. हा मुद्दा लक्षात घेत पवन खेरा यांनी आपल्या पक्षनेत्या देखील अशा दुहेरी नागरिकत्व धारण करणाऱ्या आहेत ही बाब लक्षात घ्यायला हवी होती आणि विरोधकांवर टीका करताना वास्तवाचे भान ठेवायला हवे होते. जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा हाताची तीन बोटे आपल्याकडे असतात ही बाब लक्षात घ्यायला हवी. मात्र राजकारणात राजकीय नेते ही बाब पद्धतशीरपणे विसरतात. इथे पवनखेरांचे देखील तेच झाले आहे. आज रिनिकी भूयान सर्मा या कोणत्याही संवैधानिक पदावरआलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे दुहेरी नागरिकत्व तितके वादग्रस्त ठरणार नाही. मात्र जर कोणी उकरून काढायचे ठरवले तर पासून सोनिया गांधी या १९९८ पासून सातत्याने संवैधानिक पदावरच आहेत. संसद सदस्य हे संवैधानिक पदच आहे. त्यातही काही काळ त्या लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या,
तर देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्यासाठी एक वेगळे घटनाबाह्य पद देखील निर्माण केले गेले होते. त्या काळात सर्व सरकारी फाईल्स पंतप्रधान कार्यालयातून त्यांच्याकडे जात असल्याचेही बोलले जात होते. जर कोणी हे सर्व मुद्दे पुढे आणले आणि १९९८ पासून सोनिया गांधींवर दंड लावायचा ठरवला तर तो किती होईल याचाही विचार पवन खेरा यांनी करायला हवा. घटनेत नमूद केल्याप्रमाणे हा दंड सरकारी कर्ज म्हणून संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे हा मुद्दा देखील लक्षात घ्यायला हवा. वरील सर्व मुद्दे लक्षात घेता पवन खेरा यांनी आणि इतर सर्वच काँग्रेसजनांनी वास्तवाचे भान ठेवत असे वायफळ आरोप करू नये. कारण त्यामुळे ते आणि त्यांचे पक्षनेतेच अडचणीत येणार आहेत. राजकारणात विरोधकांवर आरोप जरूर करावे, मात्र त्यासाठी अभ्यास करूनच बोलावे इतकेच इथे सांगावेसे वाटते…वाचकहो पटतेय का तुम्हाला हे….? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो..






