माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या निवडणुकीत अखेर शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात काँग्रेसने आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्थात तरीही अजून २२ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेतच त्यामुळे निवडणूक होणार हे नक्की आहे. मात्र सध्या स्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित झाला आहे.
मात्र आपले उमेदवार आकाश मोरे हे अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा करताना पत्र परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी काही कारणे दिले ती बघता “बूंदसे गई वह वह हौदसे नही आती” असेच म्हणावे लागते.अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत आहे. म्हणून आमचा त्यांना विरोध आहे असे सपकाळ यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू बद्दल सत्ताधारी भाजपने साधा एफ आय आर सुद्धा पोलिसात नोंदवला नाही
याबद्दल देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरीही सर्वांनी आग्रह केल्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्यासाठी आपण अर्ज मागे घेण्यासाठी आपल्या उमेदवाराला सूचना दिल्या असल्याचे सपकाळ यांनी जाहीर केले आहे. वस्तूतः महाराष्ट्राची संस्कृती जपण्याची इतकीच काळजी होती, तर सपकाळांनी आधीच उमेदवार उभा करण्याची धडपड करायला नको होती. साधारणपणे पदावर असताना अशी कोणी व्यक्ती मृत्युमुखी पडली तर तिथे निवडणूक बिनविरोध कशी होईल हाच प्रयत्न केला जातो. ती प्रथा महाराष्ट्रात काँग्रेसनेच सुरू केली, आणि विरोधकांना समजावून निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विरोधक समजदार होते.
आता मात्र काँग्रेस नेत्यांनी समजूतदारपणा पूर्णतः सोडला असेच दिसून येत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, तसेच रोहित पवार यांनी आधीच सुनेत्रा पवार निवडणूक लढवणारच तर आम्ही उमेदवार देणार नाही असे जाहीर केले होते. आणि हा पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिला होता. मात्र काँग्रेसने इथे अडेलतट्टू धोरण स्वीकारलेले दिसून आले. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा यांची मिळून महाविकास आघाडी आहे. या आघाडीत कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवायची हे आधीच ठरलेले होते. त्यानुसार बारामतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे होती. त्यांनी आपण उमेदवार देणार नाही असे जाहीर केल्यावर काँग्रेसने हा उतावळेपणा करायला नको होता. मात्र हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्रातील इतर नेत्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस लढवत नसेल तर आम्हीच लढवू असा अनाठायी हट्ट धरला. त्यामुळे गेला जवळ जवळ आठवडाभर महाराष्ट्रात अकारण राजकारण तापवले गेले. जर काँग्रेसने आधीच उमेदवार दिला नसता तर त्यांची शान राहिली असती. मात्र त्यांनी उमेदवार जाहीर केला. जाहीर केल्याप्रमाणे उमेदवाराने अर्ज देखील भरला. मग दररोज सर्वपक्षीय मनधरणी सुरू झाली. हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळपासून सपकाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार, शरद पवार, अशा मान्यवरांचे फोन आले. रोहित पवार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही नेते त्यांना प्रत्यक्ष भेटायला गेले आणि त्यांच्याशी चर्चा केली. तरीही आपण निवडणूक लढवण्यावर ठामच आहोत असे ते सांगत होते. नंतर मात्र अचानक चमत्कार झाला आणि त्यांनी आकाश मोरे उमेदवारी मागे घेतील असे जाहीर केले. या पोटनिवडणुकीत मतदान झाले असते तरी काँग्रेसचा उमेदवार हा दणदणीत बहुमतांनी पराभूत झाला असता, यात कोणाच्याही मनात शंका नाही. त्याला कारणही तशीच होती एक तर आज एकूणच काँग्रेसला जनाधार राहिलेला नाही. त्याचबरोबर बारामतीत आधीच पवार कुटुंबीयांचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यात शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला होता. सोबतच अजित पवारांचे नुकतेच अपघाती निधन झाल्यामुळे एक सुप्त सहानुभूतीची लाट देखील राहणार होती. भरीस भर भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे देखील त्यांच्याबरोबर होते. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन आपल्या उमेदवाराचा दारुण पराभव झालेला बघण्यापेक्षा त्याला माघार घ्यायला सांगितली तर आपली “झाकली मूठ सव्वा लाखाची” राहील असा विचार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला असावा. त्यामुळे पक्षाची थोडी इज्जत राहील असेही त्यांना वाटले असावे. मात्र झाल्या प्रकारात काँग्रेस पक्षाची बारामतीत सोबतच्या पुणे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त नाचक्कीच झालेली आहे. त्यांनी जर आधी आपला उमेदवार जाहीर करून अर्जच दाखल केला नसता आणि नंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लोकांना आपल्या नाकदुऱ्या काढायला लावल्या नसत्या तर त्यांची इज्जत, प्रतिष्ठा निश्चितच वाढली असती. या सर्व प्रकारात त्यांची अप्रतिष्ठाच झाली आहे असे म्हणता येते. या प्रकारातून काँग्रेस नेते आता काहीतरी शहाणपणा शिकतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण शहाणपणा शिकतील ते काँग्रेस नेते कसले?” गिरे तो भी टांग उपर” अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे ते मुजोरी करत राहणारच. म्हणूनच २०2९ मध्ये आम्ही पुन्हा बारामतीत लढणार आणि त्यावेळी आमचाच आमदार असेल अशी दर्पोक्ती हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अर्थात ती फालतू आहे असे माझे तरी मत झाले आहे.





