फसले आणि फसवले गेलेले ‘ऑपरेशन टायगर’….पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेचे नऊ खासदार निवडून आले आहेत.
केंद्रात भाजपाला स्वबळावर बहुमत नाही. इतर पक्षांच्या कुबड्यांवर केंद्र सरकार उभे आहे. ठाकरे सेनेचे खासदार निवडून आल्यापासून त्यांना फोडण्याचे प्रयत्न भाजपा आणि शिंदे सेनेकडून सुरु आहेत. परंतु भाजपाने अचानक आपले प्रयत्न थांबविले आणि शिंदे सेनेने ते प्रयत्न जोरदार सुरु केले. शिंदे सेनेला केंद्रात आणखी दोन मंत्रीपदे हवी आहेत. शिवाय एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व वाढविण्याचे ठाकरे सेनेचे खासदार फोडणे हा सोपा पर्याय सुरु आहे. त्यातुनच परवा ठाण्यात एक बैठक पार पडली. परंतु ती बैठक फसली.
नंतर फसलेल्या आणि फसवले गेलेल्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु झाली. मिळालेल्या माहितीनसुार ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता ठाणे पोखरण रोडवरुन एका ठिकाणी ठाकरे सेनेचे काही खासदार स्वतंत्रपणे तेथे पोहचले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एक आमदार असे मोजकेच चार ते पाच जण कोणत्याही ताफ्याशिवाय कमालीची गुप्तता पाळत तेथे पोहचले. नऊ खासदारांपैकी फक्त चारच खासदार त्या बैठकीस उपस्थित होते. एका खासदार व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले. उपस्थित खासदारांनी पक्ष बदलण्याची शपथ घेतल्याचे समजते. अन्य एकाने सामील होण्यास सहमती दर्शविली. अनेक प्रयत्न करुनही पाचच्या पुढे हा आकडा सरकत नसल्याने सध्या गप्प राहण्याचा व असे काही घडलेच नसल्याचे सांगण्याचे ठरले. इकडे ठाकरे सेनेलाही या बैठकीची कुणकुण लागली. तेथूनही चक्रे फिरली.
इच्छा असूनही परभणीचे बंडू जाधव सभास्थळी पोहचू शकले नाहीत. धाराशीवचे ओम राजे निंबाळकर गोव्यात होते. त्यांच्यावर जबरदस्त दडपण आणण्यात आल्याने त्यांची दुहेरी मनोव्यथा झाली होती. नाशिकचे वाजेही त्याच स्थितीत होते. मातोश्रींने आपल्याला आमदार व दोनदा खासदार केल्याने मातोश्री सोडण्याबाबत ओमराजे द्विधा होते. परभणीचे खासदार फूटण्याची कायम परंपरा आहे. बंडू जाधव यांनी ती परंपरा मोडीत काढली असली तरीही केंद्रात मंत्रीपदाचे आमिष व भरघोस निधी समोर दिसत असल्याने तेही होय नाही मध्ये आहेत. नाशिकमध्ये निष्ठावंत म्हणून वाजेंना उमेदवारी दिली. आपल्यावर दाखविलेला विश्वास तोडायचा नाही असे ते सांगत आहेत. मुंबईचे अनिल देसाई व अरविंद सावंत काहीही झाले
तरीही मातोश्री सोडणार नाहीत अशी स्थिती असल्याने ऑपरेशन टायगर’ फसले आणि फसविले गेलेही म्हणून दोन्ही बाजूकडून असे काही घडलेच नाही असे खुलासे झाले. शिंदे सेना स्थापन झाल्यापासून ठाकरे सेनेच्या सामान्य ते अतिसामान्य कार्यकर्त्यांना खेचण्यासाठी साम-दाम-दंड भेदाचे कारनामे वापरले जात आहेत. यातून अनेकांचा प्रवेश घडला आहे. अशा वेळेस खासदारांवर गळ टाकणार नाहीत असे होणे शक्य नाही. काही खासदारांना कोट्यावधींचा निधी दिला आहे. मंत्रीपद व अखिल भारतीय स्तरावरची महामंडळे कबूल करण्यात आली आहेत. तरीही सहाचा आकडा गाठता येत नाही. त्यासाठी यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले व पुढेही होणार आहेत. कच्ची मडकी म्हणून परभणी आणि नाशिककडे पाहिले जाते. केंद्रात श्रीकांत शिंदे यांना महत्त्वाचे मंत्रीपद द्यायचे आहे. त्यासाठी आधी ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी असे दोन्ही प्रयोग केले जात आहे.
ते जर यशस्वी झाले तर चंद्राबाबू आणि नितीश कुमारांपेक्षा एकनाथ शिंदे यांचे महत्त्व वाढणार आहे. आज जरी ऑपरेशन टायगर फसले आणि फसविले गेले असले तरी ते सुरु राहणारच आहे. हे सर्व होत असतांना एकनाथ शिंदे यांचे महत्त्व वाढविण्यास भाजपाचे नेते तयार नाहीत. महाराष्ट्रात आगामी लोकसभा स्वबळावर लढविण्याची स्वप्ने भाजपा पाहत आहे. गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविषयी घेतलेली मवाळ’ भूमिका पाहता उद्याच्या राजकारणात अनपेक्षित असे काहीही घडू शकते. एकीकडे ठाकरे सेना खिळखिळी करण्यासाठी हर तर्हेचे प्रयत्न सुरु आहेत. दररोज सर्व माध्यमांमध्ये उध्दव ठाकरे यांना धक्का’ अशा बातम्या येत आहेत.
या बातम्या एवढ्या घासूनपूसुन येत आहेत की उध्दव ठाकरे `धक्का पुरुष’ या नावानेच इतिहासात ओळखले जाणार आहेत. धक्क्यावर धक्के मिळत असतांनाही ठाकरे सेनेतील अनेक नेते अजूनही जमिनीवर यायला तयार नाहीत. अनेक कार्यकर्ते प्रलोभने झुगारुन मातोश्रींशी निष्ठा ठेवून आहे. त्यांना आपल्या व्यथा पक्षप्रमुखांकडे मांडण्यासाठी भेट मिळू नये म्हणून काही नेते आजही प्रयत्नशील आहेत.
अनेक नेते कार्यकर्त्यांचे फोनही उचलत नाहीत. कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आपल्याशी इमान राखून आहेत हे एकतर्फी असता कामा नये.त्यांना वेळीच न्याय न दिल्यास फसलेले ऑपरेशन टायगर किंवा अन्य प्रकार सुरुच राहणार आहेत, याची दखल ठाकरे सेनेने घेतली पाहिजे. ही निष्ठावंतांची व्यथा आहे. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ? हाच प्रश्न आहे.







