माझंही मत;मादक पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत
!!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.मुंबईतील गोरेगाव परिसरात एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचे अति सेवन केल्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक गंभीर अवस्थेत इस्पितळात मृत्यूची झुंज देतो आहे.
या प्रकरणावरून जोरदार राजकारण सुरू झालेले दिसत असून विरोधी पक्षाचे नेते राज्य आणि केंद्र सरकारवर तुटून पडत असलेले दिसून येत आहे. ड्रग्स सारखे मादक पदार्थ इतक्या सहज उपलब्ध होतात कसे त्यावर पोलीस काहीच कसे करत नाहीत असा विरोधकांचा सवाल आहे. काल एका वृत्तवाहिनीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यादेखील तावातवाने बोलत राज्य आणि केंद्र सरकारवर दुगाण्या झाडताना दिसून येत होत्या.
सुप्रिया सुळे देखील तितक्याच तावातवात बोलताना दिसत होत्या. इथे वर्षा गायकवाड, सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या समस्त काँग्रेसजनांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. आपल्या देशात ड्रग्स, चरस, गांजा, अफू, मेफेड्रॉन, गर्द हे पदार्थ काही केल्या दहा वर्षात म्हणजेच भाजपचे सरकार आल्यावर उपलब्ध होत आहेत असे नाही, तर गेल्या जवळजवळ ६०-७० वर्षांपासून या देशात या सर्वच नशा आणणाऱ्या आणि माणसाचे जीवन संपवणाऱ्या पदार्थांची रेलचेल आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
सिगारेट, चिलीम किंवा हुक्का यांच्या माध्यमातून नशा आणण्याचे प्रकार अगदी१९६० नंतर या देशात सर्रास सुरू झाले होते. हरे रामा हरे कृष्णा या नावाने कथित परदेशी भक्तांचा गोतावळा या काळात भारतात आला आणि त्यांनी या मादक पदार्थांच्या सेवनाची सवय अनेकांना लावली होती. त्यावरूनच १९७० मध्ये “हरे राम हरे कृष्ण” हा गाजलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातले “दम मारो दम, मिट जाये गम, बोलो सुबह शाम, हरे कृष्ण हरे राम” हे गीत प्रचंड गाजलेही होते. हे त्या काळात तारुण्यात असलेले लोक आजही सांगतील.
म्हणजे त्याच काळापासून हे नशा आणणारे पदार्थ देशात मुबलक उपलब्ध होत होते. त्यावेळी तर काँग्रेसचेच सरकार होते. मग त्यावेळी काँग्रेसने या सर्व प्रकारांना विरोध का केला नाही आणि सत्तेचा वापर करून प्रतिबंध का घातला नाही याचे उत्तर वर्षा गायकवाडांनी आपल्या पूर्वासुरींना विचारायला हवे. (कारण १९७० मध्ये वर्षा गायकवाड यांचा जन्मही झाला नव्हता)१९८०च्या दरम्यान या देशात गर्द हा प्रकार सुरू झाला. या नशा आणणाऱ्या गोळ्या होत्या असे बोलले जात होते. यालाच ड्रग्स असेही म्हटले जात होते.
या गोळ्या किंवा याची पावडर ही कॉलेजच्या आसपास विकली जायची आणि तरुणाईला त्याचे व्यसन लावले जायचे. माझ्या आठवणीनुसार याच प्रकारावर प्रकाश टाकणारे ख्यातनाम पत्रकार आणि नंतर झालेले काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांचे “गर्द अंधार” हे पुस्तक १९८५ च्या दरम्यान प्रकाशित झाले होते. त्याच काळात मुंबईतील मोठ्या इमारतींच्या भिंतीवर गर्दचे दुष्परिणाम सांगणाऱ्या घोषणा रंगवून ठेवलेल्या दिसायच्या. मात्र त्यापलीकडे हे पदार्थ मिळूच नयेत यासाठी सरकारी स्तरावर कोणतेही प्रयत्न का झाले नाहीत हा देखील प्रश्न उपस्थित होतो. त्याचेही उत्तर काँग्रेसने द्यायला हवे. त्या काळात सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार हेच सत्तेत होते.
त्यामुळे हे प्रकार वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावरही निश्चित करता येते. आज सर्वात जास्त ड्रग्ज हे पंजाब मध्ये पुरवले जातात. त्यामुळेच पंजाबला उडता पंजाब असे बोलले जाते. पंजाब मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचेच राज्य आहे. तिथे म्हणे पाकिस्तान मधून या ड्रग्सचा पुरवठा केला जातो. तिथूनच हे ड्रग्स देशातही इतरत्र पाठवले जातात. मग पंजाब मधील काँग्रेसचे सरकार याला प्रतिबंध का घालू शकले नाही हेही उत्तर वर्षा गायकवाड यांनी द्यायला हवे. त्याचप्रमाणे १९९९ पासून २०१४ पर्यंत महाराष्ट्रात शरद पवारांचीच सत्ता होती. तर २००४ ते २०१४ शरद पवार केंद्रात मंत्री देखील होते. मग त्यांनी या प्रकाराला प्रतिबंध का घातला नाही याचे उत्तर सुप्रिया सुळे यांना विचारायला हवे.हा लेख लिहीत असतानाच वृत्तवाहिनीवर बातमी बघण्यात आली की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. फडणवीस यांना गृहखात्याचा भार सांभाळत नसेल तर त्यांनी गृह खाते सोडावे आणि महाराष्ट्राचा कार्यभार सांभाळत नसेल तर मुख्यमंत्रीपद देखील सोडावे. महाराष्ट्राची त्यांनी वाट लावू नये,
अशी मागणी सपकाळांनी ट्विटरवर केलेली आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे देशात हे मादक पदार्थ प्रकरण वाढायला खरी कारणीभूत काँग्रेसी राजवटच राहिलेली आहे, आणि अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून हे प्रकार सुरू झाले आहेत. आज इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी व्ही नरसिंहराव तसेच डॉ. मनमोहन सिंग या माजी काँग्रेसी पंतप्रधानांवर या पापासाठी कोणती कारवाई करायची याचा खुलासा देखील सपकाळ यांनी करायला हवा. आज त्यातील जे हयात नाहीत, त्यांच्या पापांसाठी काँग्रेस पक्ष कोणते प्रायश्चित्त घेणार ते देखील सपकाळ यांनी स्पष्ट करावे.आज देशात तरुणाई बरबाद करणाऱ्या या मादक पदार्थांची रेलचेल झाली आहे. त्याला सर्वच राजकीय पक्ष आणि सर्वच सरकारे जबाबदार आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. मात्र विरोधी पक्ष कायम कोणत्याही गोष्टीसाठी सरकारला जबाबदार धरत असतो. त्यावेळी हा पक्ष विसरतो की आपल्या काळात आपण काय दिवे लावले होते? म्हणूनच मग वर्षा गायकवाड आणि सुप्रिया सुळे शिरा ताणून सत्ताधारी पक्षावर बिनधास्त आरोप करून मोकळ्या होतात. आपण जेव्हा समोरच्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा आपल्याच हाताची तीन बोटे आपल्याकडे असतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. मात्र राजकीय पक्षाचे नेते हे सोयीस्करपणे विसरतात आणि मग फक्त विरोधासाठी विरोध करत असतात.
वर्षा गायकवाड आणि सुप्रिया सुळे सुद्धा तेच करत आहेत. देशात उपलब्ध होणारे असे मादक पदार्थ आणि त्यामुळे बरबाद होणारी तरुणाई या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येऊन मार्ग शोधायला हवा. तरच या संकटातून देशाची सुटका होऊ शकेल. अन्यथा हे प्रकरण असेच चिघळत जाईल हे निश्चित. अर्थात हे माझे मत झाले….. तुमचे मत काही वेगळेही असू शकते…







