माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागा येत्या १३ मे रोजी रिक्त होत आहे. त्यामुळे या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १२ मे रोजी मतदान होणार ही घोषणा झाली आहे.
या नऊ जागांवर विधानसभा सदस्यांनी प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे सहाजिकच विधानसभेत ज्यांचे बहुमत आहे त्यांच्याच जास्त जागा निवडून येणार हे स्पष्ट आहे. सध्याची आकडेवारी बघता नऊ पैकी आठ जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील हे चित्र स्पष्ट आहे. या निवडणुकीत प्राथम्यक्रमाने मते द्यायची असतात. त्यामुळे त्यात मतांचा कोटा ठरलेला असतो. यावेळी २९ मतांचा कोटा निश्चित केला जाईल. सद्यस्थितीत विरोधी महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी एकाही पक्षाजवळ २९ आमदार नाहीत सर्वात मोठा पक्ष असलेला शिवसेना उबाठा गटाजवळ २० आमदार आहेत.
काँग्रेस जवळ १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाजवळ १० आमदार आहेत. त्यामुळे एक जागा जरी निवडून आणायची तरी या तिन्ही पक्षांना आपापसात तडजोड करावी लागणार आहे. सध्या या तीनही पक्षात जे काही वादविवाद सुरू आहेत, ते लक्षात येतं घेता तीन पक्ष एकत्र येतील का ही देखील शंकाच आहे. रिक्त होणाऱ्या ९ जागांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही जागा आहे. उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषदेत अविरोध निवडून गेले होते. त्या आधीच त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्यातरी सभागृहात निवडून येणे गरजेचे होते. म्हणून मग त्यांनी ही तडजोड केली.
मात्र या सहा वर्षात त्यांनी सभागृहात फार कमी सहभाग नोंदवला हे वास्तव नाकारता येत नाही. वस्तुतः विधान परिषद सदस्य म्हणून तुम्हाला खूप काही करता येते. तुम्हाला जनसामान्यांचे प्रश्न सोडवता येतात. मात्र उद्धव ठाकरे सभागृहात फार कमी वेळा आले आणि फार कमी वेळा त्यांनी संसदीय आयुधांचा वापर करून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते पुन्हा सभागृहात जाऊन करणार काय हा देखील प्रश्न विचारला जातो आहे.
शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक पथ्य जरूर पाळले होते. त्यानुसार त्यांनी स्वतः कोणतेही शासकीय पद घेतले नाही. तसेच आपल्या कुटुंबातील कोणालाही शासकीय पद दिले नाही. त्याचवेळी त्यांनी सामान्य शिवसैनिकांना पदे देऊन त्यांना मोठे केले. तीच परंपरा उद्धव ठाकरे यांनी चालू ठेवावी अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी आपला मुलगा आदित्य याला वरळीतून उमेदवारी दिली. नंतर भाजपशी पंगा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अभद्र शय्यासोबत करून सत्ता मिळवली. नंतर काय काय गोंधळ झाले तो इतिहास उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यामुळे त्या विषयावर मी सविस्तर लिहिणार नाही.
मात्र या प्रकारात पुढे जाऊन उद्धव ठाकरेंचा पक्षच फुटला आणि शिवसेनेची आजची दयनीय अवस्था झाली आहे हे वास्तव नाकारता येत नाही.या प्रकारात शिवसेना फुटली, तसेच स्वतः उद्धव ठाकरे देखील बदनाम झाले आहेत. शिवसेनेला मानणारा एक फार मोठा वर्ग शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी केल्यामुळे आणि इतर शिवसैनिकांना टाळून स्वतः मुख्यमंत्रीपद घेतल्यामुळे त्यांच्यापासून दूर गेला आहे. त्याचे परिणाम २०२४ ची विधानसभा निवडणूक आणि आता २०२६ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यात दिसून आले आहेत. तरीही उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत पुन्हा जावे असा त्यांच्याच शिवसेनेतील काही मंडळींचा आग्रह असल्याचे शिवसेनेचे सकाळी नऊचा भोंगा म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत वारंवार सांगत असतात. पण उद्धव ठाकरे सभागृहात जाऊन असे काय करणार की त्यांना विधान परिषदेची उमेदवारी सर्व पक्ष एकत्र येऊन देतील, आणि त्यांना निवडून देतील?
गेल्या सहा वर्षात दोन वर्ष मुख्यमंत्रीपदाची सोडली तरी उरलेली चार वर्ष ते सभागृहात फिरकले देखील नाहीत. कधीतरी प्रत्येक अधिवेशनात एखाद दोन दिवस ते तोंड दाखवायला म्हणून आले. बाकी त्यांचे योगदान शून्य होते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. थोड्या दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेने ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी सोडली. ही जागा शरद पवारांना द्यावी आणि त्यांना राज्यसभेत पाठवावे यासाठी शिवसेनेचे संजय राऊत आग्रही होते. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे हे मात्र या निर्णयावर नाराज होते.
आता यावेळी ही एकच जागा कोणाकडे जाईल हे ठरवताना तिन्ही पक्षात भांडण होणार हे निश्चित आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला तर वाद अधिकच होतील त्यातही काँग्रेस पक्षाचा ठाकरेंना विरोधच राहील असे चित्र आज तरी दिसते आहे. जर उमेदवारी कोणाला द्यावी या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस आहे असे जाणवले, तर सत्ताधारी भाजप त्याचा निश्चित फायदा घेईल, आणि ही एक जागाही विरोधकांना मिळू देणार नाही याबाबत कोणाच्याही मनात शंका नसावी.
विशेष म्हणजे या निवडणुकीतील निकालानंतर विधान परिषदेत सत्ताधारी आघाडीचे महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे, तर महाविकास आघाडीचे संख्याबळ बरेच घटणार आहे. त्यामुळे जर भांडणे झाली तर एक जागा देखील त्यांच्या हातात राहणार नाही.हे सर्वच मुद्दे लक्षात घेत उद्धव ठाकरे यांनी आता विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये. ज्याप्रमाणे त्यांचे तीर्थरूप बाळासाहेब ठाकरे कोणतेही पद न घेता शिवसेनेवर अंकुश ठेवून होते, तसेच यांनी करावे. त्यातच त्यांचे आणि शिवसेनेचेही हित राहील हे निश्चित. अर्थात हे माझं मत झालं…. तुमचं मत काय ते जरूर कळवा…







