*माझंही मत…*;*राष्ट्रवादीचा अर्थखात्यासाठी हट्ट*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या जरा कुरकुर सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्याला कारण झाले आहे म्हणे अर्थमंत्रीपदाचे. आधी फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यावेळी अर्थमंत्रीपद अजितदादांकडे सोपवले गेले होते.
मात्र अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर अर्थ खाते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे म्हणजेच भाजपाकडे ठेवून घेतले. अर्थखाते आपल्यालाच परत मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सर्वांचीच इच्छा असल्याची बातमी सध्या प्रसारित होते आहे. कोणत्याही राज्याच्या कारभारात अर्थ खाते, गृह खाते, महसूल खाते, आणि सामान्य प्रशासन खाते ही अत्यंत महत्त्वाची खाती मानली जातात. त्यामुळे साधारणपणे जबाबदार आणि अनुभवी आमदारांकडेच मंत्रिपद देऊन ही खाती सोपवली जात असतात. अजित पवार हे एक अनुभवी मंत्री म्हणून ओळखले गेले होते. जवळजवळ २५ वर्षाहून अधिक काळ त्यांनी विविध मंत्रिपदे भूषवली होती. प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव होता. त्यातही अर्थमंत्रीपद हे महत्त्वाचे असते.
आपल्या आमदारांना विकासासाठी निधी देऊ खुश करून ठेवता येते. त्यामुळे महायुती गठीत झाली तेव्हाच अजित दादांनी अर्थमंत्रीपद आपल्याकडे ठेवून घेतले होते. त्यांचा अनुभव लक्षात घेत त्यांना ते देण्यातही आले होते. अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यावेळी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपले होते. सुनेत्रा पवारांना प्रशासनाचा काहीच अनुभव नव्हता.
त्यात अर्थखात्याचा तर बिलकुलच नव्हता. त्यामुळेच त्यांचे हाती अर्थमंत्रीपद सोपवणे मुख्यमंत्र्यांना जोखमीसे वाटले असावे. त्यामुळेच फडणवीसांनी ते खाते आपल्याकडे ठेवले आणि उर्वरित खाती सुनेत्रावाहिनींकडे सोपवली.मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते आपल्याकडे परत हवे आहे, अशा बातम्या आहेत. त्या खऱ्या असतील तर सुनेत्रा पवार राज्याचे अर्थ खाते सांभाळायला सक्षम आहेत का हा देखील प्रश्न निर्माण होईल.
जर सुनेत्रा पवार सक्षम नसतील तर त्यांच्या पक्षात सध्याच्या आमदारांमध्ये तितके सक्षम कोण आहे त्याच्याकडे ते सोपवता येईल. तसा सक्षम कोण हे जर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीतील इतर नेतेमंडळी मुख्यमंत्र्यांचा पटवून देऊ शकले तर अर्थखाते त्याच्याकडे सोपवता येईलही. मात्र प्रशासनाचा काहीच अनुभव नसलेल्या सुनेत्रावहिनींकडे हे खाते सोपवणे थोडे धाडसाचेच ठरू शकते. त्यामुळेच फडणवीस निर्णय घेत नसावेत.तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला ते खाते आपल्याच पक्षाकडे हवे आहे.
त्याला कारणही आहे. तसेच झाले तर आपल्या पक्षाच्या आमदारांना अर्थसंकल्पात झुकते माप देता येईल. म्हणूनच हा आग्रह असू शकतो. मात्र इथे राष्ट्रवादीच्या आमदार मंडळींनी एक आठवण ठेवायला हवी. २०२२ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारच अर्थमंत्री होते. त्यावेळी शिवसेनेतून एक गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडला. त्यावेळी त्यांची तक्रार अजित पवारांविरोधातही होती. अजित पवार फक्त आपल्या पक्षातल्या आमदारांनाच निधी वाटपात झुकते माप देतात. शिवसेनेच्या आमदारांना अंगठा दाखवतात असा आरोप त्यांच्यावर केला गेला होता.
जर राष्ट्रवादीने पुन्हा अर्थखाते आपल्याकडे घेतले आणि तोच प्रकार परत झाला, तर महायुतीसाठी तो घातक ठरू शकतो याची जाणीव अर्थमंत्री पदासाठी आग्रह धरणाऱ्यांनी ठेवायला हवी. अर्थात हे माझं मत झालं….. तुमचं स्पष्ट आणि परखड मत तुम्हीही मांडू शकता….त्याचे स्वागतच होईल.




