*माझंही मत…*;*तुमच्या सत्तेच्या गुळाची गोडी आता कमी झाली आहे ममताजी..*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता गेली. तिथे भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. तृणमूल काँग्रेसचे फक्त ८० आमदार निवडून आले. स्वतः ममता बॅनर्जी सुद्धा निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. तुमची सत्ता असली की सगळेच तुमच्या जवळ असतात आणि सत्ता गेली की हळूहळू एक एक जण तुमच्या पासून दूर जाऊ लागतात.
तसे आता तृणमूल काँग्रेसचेही दोन तुकडे झाले असून ८० पैकी ५८ आमदार तृणमुल काँग्रेस सोडून बाहेर निघाले आहेत. त्यांनी वेगळा गट स्थापन केला असून त्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता देखील दिली आहे. त्यामुळे या गटाचे नेते ऋतुब्रत बॅनर्जी यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आले आहे. एकूणच २०२२ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची जशी अवस्था झाली होती, आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी अवस्था झाली होती तीच आता तृणमूल काँग्रेसची झालेली आहे. तृणमुल काँग्रेसचे ममता बॅनर्जींचे एक सहकारी ऋतुब्रत बॅनर्जी यांना पक्षातून दोन दिवसापूर्वी निलंबित केले होते.
त्यामुळे त्यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. विशेष म्हणजे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून इतर ५७ आमदार त्यांच्या सोबत आले.. यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा कुठे हात असावा असे चित्र आज तरी दिसत नाही. मात्र काहींना कावीळ झाल्यासारखा जळी स्थळी काष्टी पाषाणी भाजपच दिसतो. १९७५ पूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधींना देशात काहीही बरे वाईट घडले की त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात दिसायचा. एकदा सोनिया गांधींना पुत्ररत्न प्राप्त झाल्याची बातमी आली. तेव्हा कोणीतरी इरसाल माणसाने “आता यातही इंदिरा गांधी संघाचा हात आहे असे म्हणतील का?” असा खवचट प्रश्न विचारला होता. तसेच आज कोणताही पक्ष फुटला की भाजप विरोधकांना त्यात भाजपचाच हाच दिसतो. आताही तेच होते आहे.
आज सकाळी फेसबुक वर एका अशाच डावीकडे झुकलेल्या कथित पुरोगामी पत्रकार मित्राची एक पोस्ट वाचण्यात आली. त्यात त्याने तृणमूल काँग्रेस फोडण्यात भाजपचाच हात असल्याचा आरोप करत भाजपला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत असा दावा केला आहे. वस्तूतः आज देशात प्रादेशिक पक्षांची गरज आहे का हा देखील प्रश्न निर्माण होतो. देशात सद्यस्थितीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोनच राष्ट्रीय पक्ष राहिलेले आहेत. बाकी सर्व पक्ष हे प्रादेशिकच आहेत म्हटले तरी चुकीचे ठरू नये. राष्ट्रीय पक्ष साधारणतः राष्ट्रीय स्तरावर देशहिताचा विचार करत असतात. मात्र प्रादेशिक पक्ष हे फक्त आपल्या प्रदेशापुरताच विचार करतात.
मग त्यात परमप्रांतीयांना हुसकावून लावा, त्यांना आपलीच भाषा बोलायचा दंडक लावा, बोलले नाही तर मारहाण करा, असे प्रकार घडतात. प्रादेशिक पक्ष फक्त प्रदेशाचाच विचार करतात आणि असे पक्ष जेव्हा सात आठ पक्षांचे कडबोळे करून केंद्रात सत्तेत येतात, तेव्हा ते फक्त आपल्या भागाचा विकास कसा होईल याचाच विचार करतात. व्यापक राष्ट्रहिताचा कधीच विचार केला जात नाही. त्यामुळे असे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष हवेतच कशाला हा प्रश्न निर्माण येतो होतो. हे प्रादेशिक पक्ष निर्माण होतात आणि कालांतराने ते संपतात सुद्धा. कित्येक पक्ष तर राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयाला आले आणि कालांतराने त्यांचे अस्तित्व एका प्रदेशापुरतेच राहिलेले आहे. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर उत्तर प्रदेशातला समाजवादी पक्ष, महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, तेलंगणातला तेलगू देशम पक्ष अशी अनेक देता येतील. आजवर आपल्या देशात असे अनेक पक्ष आले आणि काळाच्या ओघात ते लुप्त देखील झाले. त्यांना कोणत्याही सत्ताधारी पक्षाने संपवायची गरज नव्हती.
ते आपापल्या मौतीनेच मेले असे म्हणता येईल. आता २०२२ मध्ये शिवसेना का फुटली आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस का फुटली याची खरी कारणे आतापर्यंत अनेकदा समोर आलेली आहेत. अर्थात जे या प्रकरणात दुखावले ते खरी कारणे कधीच मान्य करणार नाहीत. ते ‘मेरी मुर्गी की एकही टांग” या पद्धतीनेच मुजोरी करत राहतील. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे प्रवक्ते कंठेशोष करुन भाजपनेच आमचा पक्ष फोडला असे सकाळ संध्याकाळ ओरडत असता.त अर्थात जनतेने खरा पक्ष कोणता याचा निकाल २०२४ च्या निवडणुकांमध्ये दिला आहे. तरी तो मान्य न करता आम्हीच खरे महाभारतातले संजय आणि आम्हालाच दिव्यदृष्टी आहे असा दावा करत या दोन्ही पक्षांचे प्रवक्ते आपल्या वल्गना करत असतात. मात्र जनता शहाणी आहे. ती कधीच यावर विश्वास ठेवत नाही. तृणमूल काँग्रेस फुटली ती त्यांच्या कर्तृत्वाने, ममता बॅनर्जी पक्ष ही खाजगी मालमत्ता म्हणून चालवत होत्या. जोवर त्या सत्तेत होत्या तोवर आमदार त्यांना दबले. सत्ता गेल्यावर आमदार त्यांच्यापासून दुरावले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. असे प्रकार प्रत्येकच पक्षात घडतात. १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला, आणि पुढल्या दोन वर्षात खूप सारे काँग्रेसचे नेते जनता पक्षात डेरेदाखल झाले होते. १९८० मध्ये जनता पक्षाची सत्ता गेली, तसे ते सगळे हळूहळू काँग्रेसमध्ये परतही आले.
शेवटी सत्तेचा गुळ हा जास्त गोड असतो आणि सर्व मुंगळे त्याकडेच धावतात. आता ममतांच्या गुळातली गोडी कमी झाली आहे. त्यामुळे सगळे मुंगळे हळूहळू वेगळे झाले आहेत हे मान्य करायलाच हवे आणि संजय राऊत यांच्यासह इतर सर्व भाजपविरोधकांनी सुद्धा तुमचे पक्ष फुटतात तुमच्या कर्तृत्वाने त्यात कोणत्याही सत्ताधारी पक्षाचा हात नसतो हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. अर्थात हे माझे मत झाले…… तुमचे स्पष्ट आणि परखड मत तुम्ही देखील मांडू शकता. त्याचे स्वागतच होईल.




