सदगुरू श्री. श्री. साखर कारखान्याने जलप्रदूषण व हवाप्रदूषण थांबवावे अन्यथा आंदोलन..
राजेवाडी ग्रामपंचायतीचा विशेष ग्रामसभेत ठराव
आटपाडी प्रतिनिधी
राजेवाडी ता. आटपाडी येथील सद्गुरु श्री. श्री. साखर कारखान्यातून होत असलेल्या प्रचंड जलप्रदूषण व हवाप्रदूषण त्वरित थांबवावे अन्यथा आटपाडी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा विशेष ग्रामसभेमध्ये देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की राजेवाडी येथील सद्गुरु श्री. श्री. साखर कारखाना व डिस्टलरी बाबत ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने ग्रामपंचायत राजेवाडी कडून वरील विषया संदर्भात निर्णय घेण्यासाठी दि. ०५/०१/२०२४ रोजी ग्रामसभा बोलवण्यात आली होती, त्या ग्रामसभेत कारखाना व डिस्टलरीमुळे राजेवाडी गावात व गावलगतच्या परिसरामध्ये प्रचंड जलप्रदुषण व हवाप्रदूषण होत आहे.
त्यामुळे शेतीचे पाणी, पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. तसेच ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होऊन वेगवेगळे गंभीर आजार झाले आहेत .तसेच कारखान्याच्या काजळीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे. तसेच गावातील नागरिकांना स्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. दुषित पाण्यामुळे गावातील शेळ्या मेंढ्या व जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.
तरी याबाबत कारखाना प्रशासनाने पुढील आठ दिवसात त्वरित उपाययोजना करावी. किंवा सद्गुरु श्री. श्री. साखर कारखाना व डिस्टलरी बंद ठेवण्यात यावी असा ठराव 5 जानेवारीच्या ग्रामसभेत ठराव घेणेत आला आहे.
तरी याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास गावातील ग्रामस्थांकडून सद्गुरु श्री. श्री. साखर कारखाना व डिस्टलरी राजेवाडी येथे व तहसील कार्यालय आटपाडी येथे आंदोलन करणेत येईल असा ठराव करण्यात आला आहे.
या बाबत जिल्हाधिकारी सांगली.तहसीलदार आटपाडी.गटविकास अधिकारीसो पंचायत समिती आटपाडी. पोलीस निरीक्षक आटपाडी.उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, सांगली / कोल्हापूर. साखर सहसंचालक कोल्हापूर. अध्यक्ष वेस्ट इंडियन शुगर मिल असोसीएशन साखर संकुल पुणे.यांना ग्रामसभेच्या ठरावाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
चौकट
साखर कारखान्यापासून पाणी दुषित होत आहे,धुराटी मुळे पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे शेतीचे उत्पन्न घटत आहे.दुषित पाण्यामुळे जनावरे आजारी पडत आहेत अनेक जनावरे दगावली आहेत.तर पिण्याचे पाणीही दूषित होत असल्याने अनेक नागरिकांना कॅन्सल सारखे आजार जडू लागले आहे.
प्रतिक्रिया
साखर कारखान्याने जलप्रदूषण व हवाप्रदूषण त्वरित थांबवावे अन्यथा आटपाडी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा विशेष ग्रामसभेमध्ये देण्यात आला आहे. याबाबत निवेदनाच्या प्रती कारखाना, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. कारखान्याने त्वरित उपाययोजना करून दूषित पाणी व प्रदूषण थांबवावे अन्यथा ठरलेल्या तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे.
…… प्रशांत शिरकांडे .सरपंच राजेवाडी







