पेट्रोल आणि गॅससाठी जनसामान्यांनी इतके अस्वस्थ का व्हावे?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.इराण आणि इस्त्रायल चे युद्ध सुरू झाले आणि भारतात बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसू लागला. सर्वात आधी तर स्वयंपाकाला लागणारा गॅस आणि पेट्रोल तसेच डिझेल यांचा तुटवडा होणार म्हणून बोंबाबोंब सुरू झाली, आणि मग जनसामान्य अस्वस्थ झाले.
भरीस भर काही उद्योगी व्यक्तींनी सोशल मीडियावर आता या सर्व वस्तू मागणार आणि संपणार सुद्धा अशा अफवा पसरवायला सुरुवात केली. परिणामस्वरूप पेट्रोल पंपावर आणि गॅस एजन्सीसमोर मोठ मोठ्या रांगा दिसू लागल्या. त्याचवेळी प्रशासन काहीही काळजी करू नका, आपल्याजवळ पुरेसा साठा आहे, असे ओरडून सांगत होते. अफवा पसरवल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देखील देत होते. मात्र तरीही जनसामान्य अस्वस्थ होतच होते. परिणामी एरवी पेट्रोल पंपावर दर दोन दिवसांनी आपल्या दुचाकी मध्ये लिटरभर पेट्रोल केव्हा डिझेल भरणारा ग्राहक एकदम पाच लिटर भरून आपली टाकी फुल करून घेऊ लागला. तोच प्रकार गॅसच्या बाबतीतही झाला.
आज-काल बहुतेक कुटुंबामध्ये गॅसचे एक कनेक्शन असले तरी त्यांच्याकडे एक अतिरिक्त सिलेंडर उपलब्ध असतोच. तशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिला संपला की लगेच दुसरा लावता येतो, आणि मधल्या काळात ऑर्डर करून रिकामा सिलेंडर भरून घेता येतो. मात्र ग्राहक इतके अस्वस्थ होते, की आजच आपल्या घरचा गॅस संपला आहे आणि आता काहीच मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे, असे समजून स्वतः सिलेंडर घेऊन तासचे तास उन्हातान्हात लाईन मध्ये उभे राहत होते. अकोल्यात अशाच दीर्घकाळ उन्हात उभे राहिलेल्या एका वृद्ध नागरिकाचा हृदयविकाराचा झटका येऊन रांगेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील ऐकण्यात आली.
एकूणच लोक प्रचंड पॅनिक झाले होते. जनसामान्यांच्या या अस्वस्थ होण्यामुळेच अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला. जर जनसामान्य अस्वस्थ झाले नसते, तर कदाचित ही परिस्थिती आली नसती. दोन-तीन दिवसांनी सर्वांना लाईन लावून पुरेसे पेट्रोल मिळाल्यावर मग हळूहळू पेट्रोल पंपांवरील रांगा कमी झाल्या. पाच दिवसानंतर तर अनेक पेट्रोल पंप अगदी रिकामे दिसत होते. या गोंधळात अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा देखील संपून गेला होता.इथे गॅसच्या बाबतीत माझाच स्वतःचा अनुभव मला सांगावसा वाटतो. ज्यावेळी तुटवडा होणार अशी आवई उठली त्यावेळी माझ्याकडे सिलेंडर बदलून आठ दहा दिवस झाले होते. प्रशासनाने जुने सिलेंडर मिळाल्यापासून २५ दिवस तुम्हाला नवीन सिलेंडरचा नंबर लावता येणार नाही असे जाहीर केले असल्यामुळे तेवढे दिवस थांबणे भाग होते.
२५ दिवस उलटल्यावर मी ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक केले आणि शांतपणे वाट पाहत थांबलो. आठ दिवस उलटल्यावर मी गॅस एजन्सीला फोन केला, तेव्हा बुक केल्यापासून पंधरा दिवसात आम्ही सिलेंडर देऊ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पंधरा दिवस वाट बघायची असे आम्ही निश्चित केले. मग रिकामे सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीकडे जावे आणि सिलेंडर घेऊन यावे असा अनेकांनी सल्ला दिला. मात्र आम्ही वाट पाहायचे ठरवले. बरोबर बाराव्या दिवशी घरची बेल वाजली, तर गॅस एजन्सीचा माणूस नवे सिलेंडर घेऊन उभा होता. आम्ही लगेच सिलेंडर घेतले. जे काही बिल त्याने आणले होते त्यानुसारच त्याला पैसे दिले. कोणतेही वर पैसे त्याने मागितले नाहीत, आणि आम्ही दिलेही नाहीत. इतक्या सहजपणे या तणावाच्या स्थितीतही आमच्याकडे गॅस सिलेंडर येऊन पोहोचले होते. इथे मला २९६५ च्या आणि १९७१ च्या युद्धजन्य परिस्थितीची आठवण झाली. दोन्ही वेळी भारतावर पाकिस्तानने आक्रमण करून युद्ध स्थिती निर्माण केली होती. त्यावेळी देशात घरोघरी गॅस सिलेंडर नव्हते. अनेक कुटुंबांमध्ये रॉकेल वापरून स्टोव्हवर स्वयंपाक केला जात होता. त्या काळातही युद्धामुळे आता रॉकेलचा तुटवडा होणार असे बोलले जाऊ लागले. मग जनसामान्य रॉकेलची गाडी रस्त्यात दिसली की लगेच थांबवायचे. एकाने थांबवली की आजूबाजूला बातमी पसरायची आणि लगेच त्या घरातली पोरं बाळं किंवा माऊली हातातले काम सोडून रॉकेलचा डब्बा घेऊन लाईन लावायला धावायची. परिस्थिती पाहून तो गाडीवाला मग प्रत्येकाला मोजकेच पेट्रोल द्यायचा.
त्यासाठी मग भांडणे व्हायची. प्रसंगी प्रकरणे हात घाईवरही येत होती. त्या काळात जनसामान्यांना सगळेच धान्य रेशनवर मिळायचे. खुल्या बाजारात फारसे धान्य मिळत नव्हते. त्यामुळे युद्ध सुरू झाले म्हणजे धान्याचाही तुटवडा होणार असे बोलले जाऊ लागले. मग प्रत्येक जण हातातले काम सोडून पिशव्या आणि रेशन कार्ड घेऊन रेशनच्या दुकानात लाईन लावायला धावत होता. तिथे तास ते तास लाईट उभा राहून जे काही धान्य झोळीत पडेल ते घेऊन युद्ध जिंकल्याच्या समाधानात घरी परतत होता. तशीच काहीशी परिस्थिती यावेळी देखील बघायला मिळाली. प्रत्येक जण अस्वस्थ होऊन पेट्रोल डिझेलचा साठा करून ठेवायला धडपडत होता.
अनेकांनी एकदा टाकी फुल करायची, घरी येऊन ते पेट्रोल कॅन मध्ये काढून ठेवायचे, आणि पुन्हा टाकी फुल करायची, असेही प्रकार केले. तोच प्रकार गॅस सिलेंडर बाबतही झाला. चक्क जास्त पैसे देऊन जास्तीचे सिलेंडर घरात आणून ठेवले गेले. गॅस सिलेंडरचा परिणामी काळाबाजार देखील मोठ्या प्रमाणात झाल्याच्या बातम्या आल्या.इथे मनात विचार असा येतो की जनसामान्यांनी इतके अस्वस्थ का व्हावे? मान्य आहे आज स्वयंचलित वाहने चालवायची तर पेट्रोल डिझेल लागणारच आहे. मात्र त्याशिवाय देखील आम्ही काही काळ काढू शकणार नाही का? प्रसंगी थोडी काटकसर करून जिथे शक्य आहे तिथे पायी जाऊन पेट्रोल वाचवू शकणार नाही का? तोच प्रकार गॅस सिलेंडरचा देखील आहे. आता राज्य सरकारने जनसामान्यांना पुन्हा रॉकेल उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे.
अनेकांच्या घरी जुने स्टोव्ह पडलेलेही असतील. ते भंगारत टाकले असले तर दुकानात नवीनही मिळू शकतील. जुन्या स्टोव्हला देखील आता भाव येईल. ते चालू करता येणार नाहीत का? काहींनी इलेक्ट्रिकच्या शेगड्या हा पर्याय शोधला? तोही पर्याय इतरांनी शोधायला काय हरकत आहे? शेवटी गरज ही प्रत्येकाला असते आणि जीवनावश्यक वस्तू पासून प्रत्येकाचे अडते हे मान्य. मात्र त्याला प्रसंगी पर्याय शोधून मार्ग काढायला काय हरकत आहे? तसा मार्ग प्रत्येकानेच काढायला हवा, इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.





