: सिडकोच्या 50 वर्षातही नवी मुंबईतील एकाही रेल्वे स्टेशनला लिफ्ट नाही – ज्येष्ठ आणि दिव्यांग उपेक्षित*
“जगातील सर्वोत्तम नियोजित शहर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईला 4 एप्रिल 2026 रोजी 50 वर्षे पूर्ण झाली. मात्र सुवर्ण महोत्सवी वर्षातच सिडकोच्या नियोजनातील सर्वात मोठी त्रुटी उघड झाली आहे. नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, बेलापूर, पनवेल, खारघर, कोपरखैरणे, ऐरोलीसह एकाही रेल्वे स्टेशनवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी लिफ्ट किंवा सरकते जिने नाहीत.
25 लाखांहून अधिक लोकसंख्या आणि रोज 15 लाख प्रवासी असलेल्या या शहरात व्हीलचेअरवर असलेली व्यक्ती किंवा गुडघेदुखी, हृदयरोग, दम्याने त्रस्त असणारा ज्येष्ठ नागरिक सन्मानाने लोकल पकडूच शकत नाही, असा आरोप फेस्कॉम मुंबई-नवी मुंबई प्रादेशिक विभागाने केला आहे.*मुंबई-ठाण्याच्या तुलनेत नवी मुंबई मागे* मुंबई उपनगरातील 90% पेक्षा जास्त स्टेशनवर आणि ठाण्यातील बहुतेक स्टेशनवर लिफ्ट सुविधा आहे.
मात्र 1971 मध्ये शून्यातून उभारलेल्या “नियोजित” नवी मुंबईत 50 वर्षांनंतरही ही मूलभूत सुविधा नाही. पावसाळ्यात निसरड्या झालेल्या उंच पायऱ्यांवरून पडून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत.फेस्कॉमचे अध्यक्ष सुरेश ईश्वर पोटे म्हणाले, “सिडकोने इमारती, रस्ते आणि बगीचे आखले. पण शहरात राहणारा माणूस विसरला. ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली आहे. स्मार्ट सिटीचा दावा करायचा असेल तर आधी शहर सर्वांसाठी सुलभ करा.”*फेस्कॉमच्या 3 ठाम मागण्या*
1. *30 दिवसांची मुदत*: सिडकोने 30 दिवसांच्या आत प्रत्येक स्टेशनवर लिफ्ट बसवण्याचा टप्पेवार कृती आराखडा आणि निधी जाहीर करावा.
2. *विशेष निधी*: यासाठी रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारसोबत समन्वय साधून विशेष निधी उपलब्ध करावा.
3. *सुलभता हा अधिकार*: लिफ्ट ही दया नसून दिव्यांग कायदा 2016 आणि ज्येष्ठ नागरिक धोरणांतर्गत मिळणारा अधिकार आहे, याची अंमलबजावणी करावी.सिडकोच्या 50 वर्षांच्या उत्सवात जर खरोखरच “नवी मुंबईकरांचा सन्मान” करायचा असेल, तर सर्वात आधी त्यांना पायऱ्या चढल्याशिवाय स्टेशनवर जाता येईल, हे पाहणे गरजेचे आहे.







