*माझंही मत* *वाचन संस्कृती जपण्यासाठी बालवयापासूनच वाचनसंस्कार केले जावे* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.नागपुरात असलेले अनेक प्रकाशक वर्षाकाठी हजारो पुस्तके प्रकाशित करतात. मात्र गेल्या वर्षभरात बालसाहित्यावर आधारित जेमतेम ७५ पुस्तके प्रकाशित झालीत अशा आशयाचे वृत्त आज एका दैनिकात प्रकाशित झाले आहे.
या वृत्तात कोणकोणत्या प्रमुख प्रकाशकांनी किती पुस्तके प्रकाशित केली याचा आकडाही दिला आहे, आणि त्याचबरोबर लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी कमी झाली आहे का असाही प्रश्न उपस्थित केला आहे. आज एकूणच वाचन संस्कृती कमी झाली आहे असा दावा सर्वत्र केला जातो आहे. त्यातील वास्तव देखील नाकारता येत नाही. दहा वर्षांपूर्वी एखाद्या साध्या पुस्तकाची देखील प्रकाशक हजार पुस्तकांची प्रतींची आवृत्ती प्रकाशित करायचे आणि दोन वर्षात आवृत्ती संपायची. देखील आता प्रकाशक कण्हत कुथत जेमतेम ३००-४०० प्रतींची आवृत्ती प्रकाशित करतात.
ती देखील विकली जात नाही म्हणून प्रकाशक रडत असतात. हा प्रकार फक्त नागपुरातच नाही तर सर्वत्र दिसून येतो. याला कारणेही बरीच आहेत. १९८० पूर्वी देशात प्रत्येक व्यक्तीला वाचन हा एक विरंगुळा होता आणि एक मनोरंजन सुद्धा होते. या मनोरंजनातूनच विविध विषयांचे शिक्षण देखील मिळत होते. मात्र १९८० ते ९० या दशकात घरोघरी टीव्ही पोहोचले. १९९० ते २००० या दशकात टीव्हीवर विविध खाजगी वाहिन्यांची रेलचेल झाली. २००० नंतर हळूहळू लोकांच्या हातात स्मार्टफोन आले. मग युट्युब, गुगल, फेसबुक अशी मनोरंजनाची साधने उपलब्ध झाली.
त्यामुळे वाचन कमी झाले हे वास्तव नाकारता येत नाही. २००० पूर्वीच्या तुलनेत २००० नंतर प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला स्क्रीन टाईम वाढला आहे हे अभ्यासकांनी देखील सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळेच वाचन संस्कृतीला आणि पर्यायाने ग्रंथ व्यवहारांना फटका बसला आहे.मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांना देखील आता पुस्तकांव्यतिरिक्त अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध झाली आहेत. घरात २४ तासाचा टीव्ही आहे. त्याच्यावर शेकड्यांनी चॅनल्स उपलब्ध आहेत. कार्टून नेटवर्क टीव्हीवर आहेच. त्याशिवाय मूल शाळेत जाऊ लागले की त्याच्या हातात स्मार्टफोन येतो, स्मार्टफोनवर देखील युट्युब फेसबुक ही सर्व साधने त्याला उपलब्ध आहेत. मग तो पुस्तके वाचणार कशाला हा देखील प्रश्न येतो.
वाचायची झाली तर आता पुस्तके देखील ऑनलाइन उपलब्ध असतात त्यामुळे पूर्वीसारखे अंथरुणावर लोळत पुस्तक वाचत पडलो आहे हा प्रकार बंदच झाला आहे.मात्र त्यामुळे पुढच्या पिढ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे हे वास्तव देखील नाकारता येत नाही. आजपासून पन्नास वर्षांपूर्वी मुल शाळेत जाऊ लागले की घरचे लोक ऐपतीप्रमाणे त्याला गोष्टीची पुस्तके वाचायला घेऊन देत असत. त्याशिवाय मित्रमंडळी नातेवाईक यांच्याकडे देखील अशीच असलेली पुस्तके एकमेकांना देऊन वाचली जात असत. मी श्यामची आई, गोप्या, आपण सारे भाऊ, फास्टर फेणे अशी अनेक पुस्तके मित्रांकडून किंवा शेजाऱ्यांकडून आणूनच वाचलेली आहेत.
ज्यांची ऐपत नसायची त्याच्यासाठी देखील वाचनालय उपलब्ध होतीच. वाचनालयांमध्ये विविध विषयांची पुस्तके उपलब्ध असायची. त्यात कथा होत्या, कादंबऱ्या होत्या, इतिहासावरची पुस्तके होती, तर वैज्ञानिकांची आणि थोरांची चरित्र देखील असायची. ही वाचूनच बालवयात मुलांची मने संस्कारित केली जायची. या वाचनामुळे त्यांचे मनोरंजन तर व्हायचेच पण ज्ञानात भर पडायची आणि भाषा देखील सुधारायची. अनेक कुटुंबांमध्ये अगदी घरी येणारे वृत्तपत्र सुद्धा मुलांना रोज वाचायला सांगितले जायचे. त्या काळात लहान मुलांसाठी विविध पुस्तके सुद्धा प्रकाशित व्हायची.
लहान मुलांसाठी लिहिणारे खूप सारे साहित्य देखील होते. नागपूर शहरातच सांगायचे झाले तर शुभांगी भडभडे, दिनकरराव देशपांडे, मालती निमखेडकर, आकाशानंद अशी अनेक नावे घेता येतील. या पुस्तकांशिवाय लहान मुलांसाठी विविध मासिके देखील प्रकाशित व्हायची त्यात चांदोबा, फुलबाग, कुमार, मुलांचे मासिक, गंमत जंमत अशी अनेक नावे आठवतात. बा. रा. मोडक हे संपादक कित्येक वर्षांपासून नागपुरात मुलांचे मासिक प्रकाशित करत होते. आज त्यांची तिसरी पिढी सुद्धा हे मासिक निष्ठेने प्रकाशित करते आहे. याशिवाय अनेक वृत्तपत्रे मासिके आणि नियतकालिके आपल्या अंकांमध्ये नियमित बालविभाग प्रकाशित करायचे. आमच्या लहानपणी सह्याद्री अनुराधा वाङ्मय शोभा अशा मासिकांमधले बालविभाग आम्ही नियमित वाचायचो. त्याशिवाय नागपूरच्या तरुण भारत मध्ये प्रभाकर पुराणिक नियमितपणे बालविभाग प्रकाशित करायचे. तर लोकमत मध्ये शुभांगी भडभड्यांचे संयोजन असायचे. या सर्वांमुळे लहान मुलांना त्या वयात देखील विपुल बालसाहित्य वाचायला मिळायचे. विशेष म्हणजे त्यावेळी मुलांसाठी इतर मनोरंजनाची साधने नव्हती.
नाही म्हणायला एक रेडिओ होता. मात्र रेडिओवर सुद्धा आठवड्यातून दोन दिवसच लहान मुलांसाठी कार्यक्रम लागायचे. त्यामुळे मुले मोठ्या प्रमाणात वाचनाकडे वळत होती. त्यातूनच काही पिढ्या या संस्कारित होत गेल्या आणि त्यांच्यासाठी तसे साहित्य देखील निर्माण होत गेले. साने गुरुजींनी लिहिलेली श्यामची आई आणि इतर कादंबऱ्या, गिरीजा कीरांनी लिहिलेले बालसाहित्य, शिवाय फास्टर फेणे सारखी पुस्तके ही तर होतीच. त्याचबरोबर इंद्रजाल कॉमिक्स सारखी दर पंधरा दिवसाला प्रकाशित होणारी कॉमिक्स सुद्धा मुलांसाठी उपलब्ध होते. आता मात्र मुलांसाठी फारसे वाचनीय साहित्य काही प्रकाशित होत नाही ही सर्वांचीच तक्रार आहे. मात्र प्रकाशकांच्या मते आम्ही पुस्तके काढायला तयार आहोत, पण ती विकली जायला हवीत. विकली गेली नाहीत, तर ती नुसती गठ्ठे बांधून ठेवून काय करायचे? प्रकाशाकांचाही हा मुद्दा बरोबरच म्हणावा लागेल.
कारण ते शेवटी व्यवसाय करण्यासाठी मैदानात आले आहेत. मग यावर उपाय काय माझ्या मते अगदी लहान वयापासून वाचन संस्कृती वाढवणे हा एकमेव उपाय म्हणता येईल. मात्र त्यासाठी फक्त सरकारवर जबाबदारी आणि दोष ढकलून होणार नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला प्रयत्न करावे लागणार आहेत. मला आठवते, माझ्या लहानपणी अशी बाल वाङ्मयाची विविध पुस्तके वाचूनच आमचे बालपण संपन्न झाले होते. त्यावेळी घरी फिरत्या वाचनालयाच्या मार्फत पुस्तके यायची. ती आम्ही वाचायचो. शिवाय जवळच्या एखाद्या वाचनालयात जाऊनही पुस्तके वाचली जायची. प्रत्येक शाळेत तेव्हाही वाचनालये असायची. मी शिकलो त्या हडस हायस्कूलमध्ये मधल्या सुट्टीत वाचनालयाच्या हॉलमध्ये मुलांना वाचण्यासाठी पुस्तके काढून ठेवलेली असायची.
मुलांनी तिथेच बसून ती वाचायची अशी पद्धत होती. त्याशिवाय घरी न्यायला सुद्धा पुस्तके दिली जायची. नंतर प्रत्येक वर्गासाठी आठवड्यातला एक दिवस एक तास हा वाचनालय तास म्हणून असायचा. या एक तासात विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन आवडीचे पुस्तक वाचायचे. मग काही वेळा लायब्ररीतल्या शिक्षिका सोमण बाई त्या मुलांना त्यातल्याच गोष्टी सांगायला प्रवृत्त करायच्या. त्यातून एक संस्कारित वर्ग तयार होत होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले राजा शिवछत्रपती त्यावेळी छोट्या छोट्या खंडांमध्ये प्रकाशित झाले होते. ते सर्व खंड मी त्या काळात मधल्या सुट्टीतच वाचले होते. आता चौकशी केली तर शाळांमध्ये वाचनालय आहे, पण अनेक शाळांमध्ये त्या कपाटातली धूळ देखील झटकली जात नाही हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे आजही प्रत्येक शाळेत जर ग्रंथालयामध्ये लहान मुलांनी वाचण्याजोगी पुस्तके आणून ठेवली आणि मुलांना दर आठवड्याला एक तास त्या ग्रंथालयात बसायला प्रवृत्त केले आणि तिथेच त्यांना पुस्तके वाचायला सांगितली तर हळूहळू मुलांची आवड विकसित होऊ शकते. मात्र आज कोणत्याही शाळेत असे प्रयोग करावे असे का वाटत नाही हा देखील प्रश्न आहेच. आज सकाळी वर नमूद केलेले वृत्त मी वृत्तपत्रात वाचल्यावर नागपुरात सक्रिय असणाऱ्या चार प्रमुख वांङमयीन संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मुलांमध्ये सकस साहित्य वाचण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी या संस्थांनी प्रयत्न करावे असे मी सुचवले. मात्र कोणीही फारसा उत्साह दाखवला नाही. वस्तुतः विदर्भ साहित्य संघासारख्या शंभर वर्ष जुन्या साहित्य संस्थेने पुढाकार घेऊन विदर्भातील प्रत्येक शाळेत मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळा स्तरावर प्रयत्न व्हावेत असा आग्रह धरायला काय हरकत आहे. विदर्भ साहित्य संघाने आग्रह धरल्यास शासन स्तरावर तसा आदेश देखील निर्गमित केला जाऊ शकतो. पूर्वी साहित्य प्रसार केंद्राचे राजाभाऊ कुलकर्णी हे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांची वाचन स्पर्धा आयोजित करत असत. त्यासाठी मुलांना विविध पुस्तके उपलब्ध करून दिली जात असत, आणि ती वाचून त्यावर लेखन करायला सांगितले जात असे. विद्यार्थ्यांचे ते लेखन तपासून त्यांना त्यावर बक्षिसे दिली जात असत.
असे उपक्रम विदर्भ साहित्य संघ, साहित्य भारती, अभिव्यक्ती किंवा पद्मगंधा प्रतिष्ठान या संस्थांनी राबवायला हवेत. त्याशिवाय नवे बालसाहित्यिक शोधून २१ व्या शतकाला अनुसरून नवे बालसाहित्य कसे निर्माण होईल यासाठी लेखकांच्या कार्यशाळा आयोजित करून त्यातून लेखक निवडून चांगले साहित्य कसे निर्माण होईल आणि प्रकाशाकांशीही संपर्क साधून ते प्रकाशित होऊन वितरित कसे केले जाईल याकरिता प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी मुलांबरोबरच पालकांच्याही कार्यशाळा आयोजित केल्या जायला हव्यात. याशिवाय इतरही वेगवेगळे प्रयोग करून वाचन संस्कृती वाढवता येईल आणि अशा वाचकांना नवे समृद्ध साहित्य सुद्धा उपलब्ध करून देता येईल. मला आठवते नागपूरच्या शासकीय ग्रंथालयाबाहेर “वाचाल तर वाचाल” अशी एक घोषणा लिहिली गेली होती.
हीच बाब आजच्या पिढीला समजावून देत त्यांच्या गळी देखील उतरवली जायला हवी. त्यासाठी फक्त शासन किंवा साहित्य संस्थाच नाही तर समाजातील सुसंस्कृत नागरिकांनी देखील पुढाकार घ्यायला हवा. तरच चांगले साहित्य निर्माण होईल आणि ते वाचले जाऊन उद्याचे चांगले नागरिक देखील घडवले जाऊ शकतील.







