१२ गावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी, 4 मार्च ला लिंगिवरेत होणार विजय मेळावा….
लेखी पत्रानंतर पाणी संघर्ष चळवळीचे आंदोलन स्थगित
आटपाडी
श्रमिक मुक्ती दल व समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळ यांच्या वतीने डॉ. भारत पाटणकर,आनंदराव पाटील, जनार्धन झिंबल,हणमंतराव देशमुख,साहेबराव चवरे, सादिक खाटीक,नाना दाजी मोटे,नंदकुमार चवरे,गजानन जाविर,मनोहर विभुते व इतर सर्व प्रमुख चळवळीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्यातील वंचित १२ गावातील बंद पाइपलाईनचे काम तातडीने होण्यासाठी निविदा काढाव्यात व कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात,या मागणीसाठी दि. २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी आंदोलनाचे नियोजन केले होते.
याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री तसेच आटपाडी तहसीलदार आणि अधिकारी यांना दिले होते. या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने सर्व मागण्या पूर्ण करून कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. आज रोजी जलसंपदा विभागाने डॉ. भारत पाटणकर यांना लेखी पत्र देऊन मागणी मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली आहे. आज दिलेल्या शासनाच्या लेखी पत्रामुळे आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. टेंभू योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाल्यामुळे आटपाडी तालुक्यातील वंचित बारा गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे.
वंचित १२ गावातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांचे अभिनंदन करण्यात आले. सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या प्रांगणात शेतकऱ्यांचा विजयी मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे.
शेतकरी बांधवांनी या विजयी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आनंदराव पाटील जनार्धन झिंबल यांनी केले आहे.